धर्मवीर सिनेमात या तीन नेत्यांना चांगलच प्रोमोट करण्यात आलं होतं, आज त्यांच्या भूमिका..
धर्मवीर सिनेमा या बंडासाठीच रिलीज करण्यात आला होता का? असा प्रश्न सोशल मिडीयावर विचारला जात आहे. कारण एकनाथ शिंदे यांच बंड आणि सिनेमा रिलीज करण्याचं टायमिंग. सिनेमा थिएटरमध्ये आला, लोकांच्यात रुजला, अगदी शेवटच्या ठिकाणापर्यन्त पोहचला तेव्हाच एकनाथ शिंदे यांच बंड सुरू झाला.
एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या बातम्या जेव्हा टिव्हीवर दाखवण्यात येत होत्या तेव्हा देखील न्यूज चॅनेलवरून धर्मवीरचं प्रमोशन चालूच होतं.
सिनेमा आणि सध्याचं राजकारण याचा ताळमेळ घालण्याची काही प्रमुख दोन कारण सांगितली जात आहेत.
- आनंद दिघे हे कितीही मोठ्ठ नाव असलं तरी ठाण्याच्या व मुंबई उपनगराच्या बाहेर ते तितके परिचित नव्हते. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या योगदानाची चर्चा नव्हती. पण सिनेमाच्या माध्यमातून आनंद दिघे, त्यांचे विचार व हिंदूत्ववाद पोहचवण्यात आला.
- याच विचारांचे पाईक म्हणून आज एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या बंडाला एक नैतिक अधिष्ठान पोहचवणं सोप्प जातय
असो हा लेख सिनेमातले मुद्दे आणि तो राजकीय हेतूसाठी प्रदर्शित करण्यात आला होता का नाही यावर नाही. तर सिनेमात प्रकर्षाने एकनाथ शिंदे यांच्यासोबत दाखवण्यात आलेले नेते, त्यांच्या जवळचे नेते कोण आहेत व त्यांची सध्याची भूमिका काय आहे ही आहे हे सांगणारा आहे. हे सांगताना काही स्पायलर्स येतील त्यामुळे सिनेमा पाहिला नसल्यास लेख वाचावा की न वाचावा हे तुम्हीच ठरवा..
पहिला क्रमांक आहे एकनाथ शिंदे यांचा..
ज्यापद्धतीने हिरोची एन्ट्री होते तशीच एन्ट्री एकनाथ शिंदे यांची दाखवण्यात आलेली आहे. डान्सबारच्या दाक्षिणात्य लॉबीला नडण्यासाठी कोणीतरी उलट्या खोपडीचा माणूस लागेल असा डॉयलॉग येतो तेव्हा एकनाथ शिंदेंची एन्ट्री होते. एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंसाठी काहीही करण्यासाठी तयार असतात, अगदी शेवटच्या प्रसंगात एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंच शव जळत्या हॉस्पीटलमधून खांद्यावर घेवून बाहेर पडतात..
एकनाथ शिंदे सध्या काय करत आहेत, त्यांनी काय वेगळं केलं हे सांगण्याची गरज नाही. आज ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान आहेत.
दूसरा क्रमांक आहे तो राजन विचारे यांचा..
एकनाथ शिंदे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभारलेले व्यक्ती म्हणून राजन विचारे दाखवण्यात आलेले आहेत. ठाण्याचा उद्याचं भविष्य म्हणून दिघे बाळासाहेबांना त्यांची ओळख करुन देतात.
सध्या राजन विचारे ठाण्यातून खासदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत त्यांनी अजूनतरी जाहीर भूमिका घेतलेली नाही, पण ZEE न्यूजने बातमी दिली होती की राजन विचारे हे गुवाहाटीमध्ये आहेत. मात्र या बातमीला कोणताही दुजोरा नाही. राजन विचारे देखील नॉटरिचेबल झाल्याच्या बातम्या होत्या.
पण राजन विचारे हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत जातील अशी शक्यता आहे. अजूनही त्यांनी थेट भूमिका जाहीर केली नसली तरी ते निवडणूकीच्या राजकारणात राजन विचारेंना एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगण्यात येत.
तिसरे आहेत ते दादा भूसे…
सिनेमात नाशिकवरून द्राक्षे घेवून एक तरुण आनंद दिघेंना भेटायला येतो. आपल्या भागातल्या समस्या सांगण्यासाठी तो दिघेंना भेटायला आलेला असतो. तो सांगतो की आमच्याकडे पडिक जमीन शेतकरी विकू लागलेत. यातून आलेले पैसे ठाण्यात येवून डान्सबारवर उधळले जातात.
पुढे दादा भुसे या तरुणाचं आणि आनंद दिघेंच चांगल जमतं. फक्त एका फ्रेमपुरतं दादा भुसे मर्यादित राहत नाहीत तर अधूनमधून ते दिसत राहतात. आनंद दिघे त्याला म्हणतात जेव्हा शिवसेनेची सत्ता येईल तेव्हा तू कृषीमंत्री होशील.
सुरवातीला दादा भुसे हे मी कट्टर शिवसैनिक आहे म्हणत उद्धव ठाकरेंसोबत राहिले पण वेळ मिळाताच त्यांनी गुवाहाटीला प्रस्थान केलं. दादा भुसे सुरवातीच्या काळात ठाणे शहरात नोकरीला होते. त्यानंतर गावाकडे जावून त्यांनी जाणता राजा मंडळ स्थापन केलं होतं. निवडणूक न लढता समाजकार्य करण्याच्या हेतूने सुरू झालेला प्रवास जाणता राजा मंडळ शिवसेनेत विलीन करुन थांबला.
आत्ता जे राजन विचारे आहेत त्यांच्या मुलीचा विवाह दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार यांच्यासोबत झालेला आहे.
दूसरी गोष्ट म्हणजे आनंद दिघेंना हॉस्पीटलमध्ये राज ठाकरे, नारायण राणे भेटायला येतात. उद्धव ठाकरे अगदी दिघेंचा मृत्यू झाल्यानंतर राज ठाकरेंच्या मागे ओझरते दिसून जातात. पण या सर्वात एक उल्लेख करण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे आनंद दिघे गणपतीच्या आरतीसाठी कार्यकर्त्यांच्या घरी जात असतात. असाच एक कार्यकर्ता असतो ज्याला आनंद दिघे म्हणतात तुमच्या बुद्धीचा पक्षाला वापर होईल त्या कार्यकर्त्याच्या दारावर नेमप्लेट असते मिलींद नार्वेकर…
हे ही वाच भिडू
- धर्मवीर आनंद दिघे यांना एकनाथ शिंदे एवढं का मानतात?
- धर्मवीर आनंद दिघे यांच्या अफाट लोकप्रियतेचं काय कारण होतं?