सावित्रीबाई फुले यांच्या अमेरिकन शिक्षिका त्यांच्याएवढ्याच क्रांतिकारी होत्या ..
सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून आपल्याला माहीतच आहेत. पण त्याचबरोबर एक स्त्रीवादी कार्यकर्त्या, जातिव्यवस्था निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक,भ्रूणहत्या विरोधी कार्यकर्त्या आणि कवयित्री अशी अनेक बिरुदं लावली तरी सावित्रीमाईंच्या कार्याची व्याप्ती संपत नाही.सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव गावात झाला.
स्त्री आणि त्यातही माळी समाजातील जन्म यामुळं सावित्रीबाईंचा शिक्षणाचा हक्क डावलण्यात आला. अवघ्या दहा वर्षांच्या असताना महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यावेळेस ज्योतिबा नुसत्या तेरा वर्षांचे होते. ज्योतीबांनाही सुरवातीला शिक्षण मिळाले नव्हते, परंतु नंतर ते स्कॉटिश मिशनरी शाळेत इयत्ता सातवीपर्यंत शिकले होते.
ज्योतिबांनी सावित्रीबाईंचे प्राथमिक शिक्षण घरीच पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली आणि ती यशस्वीरीत्या पार ही पाडली.
सावित्रीबाईंच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी ज्योतिबांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर यांनी घेतली होती.
मात्र स्त्री शिक्षणासाठी आग्रही असणारे ज्योतिबा आणि सावित्रीमाई एवढ्यावरच थांबणारे नव्हते. पुढे जाऊन सावित्रीबाईंनी अध्यापन शिक्षण घ्यावे असा निर्णय झाला.
सावित्रीबाईंनी मग दोन अध्यापन अभ्यासक्रम पूर्ण केले.
म्हणजे शिक्षक होण्यासाठी प्रशिक्षण घेतले. सावित्रीबाईंनी स्वतःला दोन शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमातही सहभागी करून घेतले होते. पहिली अहमदनगरमधील अमेरिकन मिशनरी सिंथिया फर्रार यांनी चालवलेल्या संस्थेत होती. दुसरा अभ्यासक्रम पुण्यातल्या नॉर्मल स्कूलमध्ये.
त्यापैकी अहमदनगरमध्ये टिचर ट्रेनिंग कॉलेज चालवणाऱ्या सिंथिया फर्रार यांचं सावित्रीबाईंच्याच नाहीतर एकूण महाराष्ट्राच्या स्त्रीशिक्षणात मोठे योगदान आहे.
१८२६ मध्ये, अमेरिकन बोर्ड ऑफ कमिशनर्स फॉर फॉरेन मिशन्सच्या मराठी मिशनने विनंती केली की एका महिला मिशनरीला बॉम्बे, भारत येथे मुलींसाठी शाळेत शिकवण्यासाठी पाठवावे. याआधी त्यामुळे पुरुष मिशनऱ्यांच्या बायका मुलींना शिकवत असत. जर या कामात एकादी स्त्री आली तर या बायकांची या कामातून सुटका होईल असं मिशनरीजना वाटत होतं.
मात्र अमेरिकन बोर्ड आणि इतर अमेरिकन मिशनरी सोसायट्या पूर्वी सिंगल महिला मिशनरींना परदेशात पाठवण्यास तयार होत नव्हत्या. परंतु सिंथिया फर्रार एकल असूनही मुलींच्या शिक्षणासाठी असलेली त्यांची तळमळ पाहून त्यांना मुलींच्या शाळांच्या अधीक्षक पदासाठी भरती करण्यात आली.
५ जून १८२७ रोजी भारतासाठी मिशनरी गटाचा एक भाग म्हणून त्यांनी बोस्टनहून यूएस सोडले. आणि त्यांनतर त्या भारतात आल्या त्या कायमच्याच. भारतात स्त्रीशिक्षणाच्या कामासाठी त्यांनी मग स्वतःला वाहूनचं घेतलं.
मुलींना शिक्षण देण्यास विरोध करणाऱ्यांनी सिंथिया फर्रार यांच्या कामालाही विरोध केला.
तरीही १८२९ पर्यंत सिंथिया यांच्या शाळेने ४०० पेक्षा जास्त भारतीय मुलींना प्रवेश दिला होता.
फर्रार यांनी १८३७-१८३८ मध्ये आरोग्याच्या कारणास्तव अमेरिकेत दोन वर्षांची सुट्टी घेतली. मात्र १८३९ मध्ये त्या भारतात परतल्या.पुढे मुलींसाठी शाळा चालवण्यासाठी मग त्यांची अहमदनगर येथे बदली करण्यात आली.
१८६२मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांनी अहमदनगर हीच आपली कर्मभूमी केली होती.
दुर्दैवानं सिंथिया आणि सावित्रीबाई यांच्या संबंधांबद्दल माहिती मिळत नाहीए मात्र सावित्राईबाईनी जे क्रांतिकारी कार्य केलं तेच सिंथिया फारर्रार यांच्या कार्याची पोचपावती मानता येइल.
पुढे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांनी सगुणाबाईंसोबत पुण्यात मुलींना शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर या तिघांनी तात्यासाहेब भिडेंचे घर असलेल्या भिडे वाड्यात शाळा सुरू केली. सरकारी शाळांपेक्षा फुले दाम्पत्याची शिकवण्याची पद्धती क्वालिटी होती.असं म्हणतात की त्यामुळंच फुलेंच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या संख्येपेक्षा जास्त होती.
हे ही वाच भिडू :
- सावित्रीबाईंची पहिली विद्यार्थिनीसुद्धा क्रांतिकारकच होती…..
- युपीची सावित्रीबाई फुले
- शनिवारवाड्यात महात्मा फुले यांना न मिळालेले बक्षीस