iPhone च्या मॅन्यूफॅक्चर कंपनीचं एक वेगळंच सत्य बाहेर आलं आणि राडा सुरु झाला
आजकाल आयफोन, वॉच, मॅकबुक इत्यादी ॲपल कंपनीचे गॅजेट्स वापरणे म्हणजे स्टेट्स सिम्बॉलच झालंय…थोडक्यात जगातला सर्वात महागडा स्मार्टफोन बनविणाऱ्या कंपनीच्या संबंधित एक माहिती समोर आली आहे, ज्यामुळे लोकं आंदोलनं करतायेत..पण विषय फक्त आयफोन कंपनीचा नाहीये तर आयफोन साठी असेंबल पुरवणाऱ्या कंपनीचा आहे. बघूया काय आहे मुद्दा…
तर आपण बोलतोय ते म्हणजे फॉक्सकॉन कंपनीच्या बाबत.
चेन्नई, श्रीपेरंबदुर जवळ एक शहर आहे, तेथे एक इंडस्ट्रियल एरिया आहे, अर्थातच तेथे अनेक कारखाने आहेत जे सॅमसंग सारख्या कंपन्यांसाठी उत्पादने बनवतात. तामिळनाडूच्या श्रीपेरुम्बुदूर भागात फॉक्सकॉन या कंपनीचा एक प्लांट आहे. फॉक्सकॉन ही तैवानची कंपनी आहे ज्या कंपनीने २०१९ मध्ये हा प्लांट सुरू केला. हि कंपनी Apple साठी iPhone असेंबल करते. आता हि कंपनी भारतात आणण्यामागे ॲपलची महत्वाची भूमिका आहे. फॉक्सकॉन भारतात आणण्यामागे ॲपलचा हेतू असा होता कि, चीन आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे ॲपलचे उत्पादन थांबू नये.
मग काय हि कंपनी भारतात आली, या प्लांटमध्ये फॉक्सकॉनने कामगारांना कामावर ठेवण्याची, त्यांच्या राहण्याची व्यवस्थेची जबाबदारी काही ब्रोकर कंपन्या आणि कंत्राटदारांना दिली होती. तसेच हे ब्रोकर लोकं फॉक्सकॉनसाठी मध्यस्थ म्हणून काम करत होते. कंपनीला मनुष्यबळ देणे, कामगारांकडून पैसे घेऊन त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था आणि कंपनीकडून कमिशन घेणे.
या प्लांटमध्ये सुमारे १७ हजार लोकं काम करत असायचे पण आता हेच कामगार रस्त्यावर उतरले आहेत.. कारण काय तर इतक्या महागड्या मोबाईलच्या कंपनीत तेथील वर्कर्सची अवस्था मात्र वाईट आहे. यामागचे कारणे काय पैशाच्या कमतरतेची नाहीये तर लोकं इथं काम करायलाच तयार नाहीयेत. कारण आयफोन बनवणाऱ्या कामगारांची अवस्था वाईट आहे.
काही माध्यमांनी फॉक्सकॉनच्या प्लांटमध्ये काम करणाऱ्या काही महिलांशी संवाद साधला. या महिलांनी प्लांटमधील कामगारांच्या स्थितीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या कामगारांना पगार म्हणून सरासरी साडे दहा हजार प्रति महिना द्यायचे. या पगारातून कामगारांना दिल्या जाणाऱ्या जेवणासाथीचे आणि राहण्यासाठीचे पैसेही कापत असायचे, या कारखान्याचे कर्मचारी जमिनीवर झोपत असायचे आणि प्रत्येक खोलीत ३०-३० महिलांना ठेवण्यात आले होते. ते राहत असलेल्या वसतिगृहातील स्वच्छतागृहात पाणी नसल्याचेही या कामगारांनी सांगितले. तसेच त्यांना पुरवल्या जाणाऱ्या अन्नात किडे आढळत असायचे. पण हे सगळं होत असतांना हे सगळे वर्कर्स गप्प होते कारण त्यांचे मजबुरी होती. नोकरी करायची असेल तर या सगळ्याचा सामना करावाच लागेल असेल मनस्थिती झाली होती.
पण जेंव्हा मोठ्या प्रमाणात लोकांना अन्नातून विषबाधा होऊ लागली, लोकं आजारी पडू लागले तेंव्हा या हजारो महिला-पुरुष कामगारांनी १७ डिसेंबर २०२१ रोजी आंदोलन केले. या दिवशी सुमारे २००० महिला कामगार रस्त्यावर आल्या आणि त्यांनी प्लांटजवळील महामार्ग रोखला. या महिला फॉक्सकॉन प्लांटमध्ये काम करत होत्या, दुसऱ्या दिवशी आजूबाजूच्या इतर कारखान्यांतील कामगारही आले आणि एका प्लांटपासून सुरू झालेल्या या आंदोलनाचे मोठ्या आंदोलनात रूपांतर झाले. त्यांच्या आंदोलनात सहभागी झालेले स्थानिक युनियन नेत्यांच्या मते, आंदोलनाच्या दिवशी पोलिसांनी कामगारांना अटक करून मारण्यास सुरुवात केली. काही महिलांचाही बळी गेला. आणि ६७ महिलांना ताब्यात घेतले, त्यांचे फोन जप्त केले.
तर यातल्या आंदोलकांनी देखील असं सांगितलं आहे कि, या आंदोलना दरम्यान आंदोलक महिलांना स्थानिक पोलिसांनी अटक केली आणि त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून कामगारांचे आंदोलन सुरू असून कारखाना सध्या ठप्प आहे.
तिरुवल्लूर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, फॉक्सकॉन प्लांटच्या वसतिगृहात राहणाऱ्या २५० हून अधिक महिलांना अन्नातून विषबाधा झाली होती, त्यापैकी १५९ महिलांना रुग्णालयात पाठवावे लागले. असे बरेच कामगार होते जे आजारी होते आणि काम करण्याची त्यांच्यात ताकद नव्हती.
जेव्हा वाद वाढत गेला तेव्हा शेवटी हा ॲपलचा फॉक्सकॉन प्लांट बंद करावा लागला.
बरं ॲपलच्या बाबतीत अशी प्रकरणे बाहेर येणे काय पहिलीच वेळ नाहीये, ॲपलसाठी सुटे भाग बनवणाऱ्या दुसऱ्या कंपनीच्या प्लांटमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. आणखी एक कंपनी, विस्ट्रॉन, जी भारतात ॲपलचे भाग बनवत होती, ती कंपनी देखील ॲपलने २०२० मध्येच बंद केली होती.
फॉक्सकॉनचा प्लांट बंद होणे हा रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या या कामगारांचा विजय म्हणता येईल. पण अशा घटना घडणे, कामाच्या ठिकाणी अशा समस्या निर्माण होणे हे किती व्यापक आहे, याचा अंदाज सहज बांधता येतो. देशात शेकडो विदेशी कॉर्पोरेट प्लांट्स आहेत आणि सातत्याने परकीय गुंतवणूक वाढत आहेत त्यामुळे अशा कंपनींच्या अत्याचाराला आवर घालणे हे कामगारांना जमलं पाहिजे.
हे हि वाच भिडू :
- राष्ट्रवादी-सेनेत ज्या मुक्ताईनगरवरून वाद सुरुये त्याचं नेतृत्व माजी राष्ट्रपतींनी केलंय
- वैष्णोदेवीच्या घटनेप्रमाणेच महाराष्ट्रातही चेंगराचेंगरीची सर्वात भयंकर घटना घडली होती
- क्षेपणास्त्रं झाली, बंदुका झाल्या आता भारतीय सैन्याचा युनिफॉर्मही चेंज होणार आहे