आजचे चाणक्य स्वप्नात पण विचार करणार नाहीत अशी गोष्ट महाजनांनी शक्य केली होती…

प्रमोद महाजन. भारतीय जनता पक्षातील एक वादळी व्यक्तीमत्व. महाराष्ट्राचे जे काही मोजके पंतप्रधान पदाला धडक देऊ शकत होते असं म्हणतात यात प्रमुख नाव येत प्रमोद महाजनांचं. संघाच्या मुशीत तळागाळातून तयार झालेलं त्यांचं नेतृत्व होतं. आपलं अफाट वक्तृत्व, संघटन शक्ती, करिष्माई व्यक्तिमत्व यामुळे महाजन अगदी कमी वयात भाजपच्या मोठ्या पदावर जाऊन पोहचले.

फक्त दोन खासदारांचा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहचवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.

भाजपमध्ये सरसंघचालकापासून ते मराठवाड्यातील एखाद्या साध्या कार्यकर्त्यापर्यंत आणि अडवाणींपासून ते अटलजींपर्यंत सगळ्यांशी त्यांचे चांगले नाते होते. भाजपच्या दुसऱ्या फळीचे सर्वात आघाडीचे नेते म्हणून त्यांना ओळख मिळाली होती.

प्रमोद महाजनांची आणखी एक अत्यंत महत्वाची ओळख होती ती म्हणजे चाणक्य.

ते भाजपचे आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या विश्वासातील चाणक्य म्हणून ओळखले जात होते. शिवसेनेसह अनेक मित्रपक्षांना महाजनांनी भाजपसोबत जोडलं होतं. त्यामुळे आघाड्यांचं आणि तडजोडीचा राजकारण करणारा आधुनिक युगातील नेता त्यांना म्हंटलं जायचं.

अटलजींच्या या चाणक्यने एकदा असाच एक मित्रपक्ष भाजपसोबत जोडला होता, ज्याचा विचार आजचे चाणक्य स्वप्नात देखील करणार नाहीत. तो पक्ष म्हणजे,

तामिळनाडूमधील द्रमुक अर्थात द्रविड मुन्नेत्र कळघम.

१९९८ साली निवडून आलेले केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार सुरळीत चालू होतं. पण अन्ना द्रविड मुन्नेत्र कळघमच्या सर्वेसर्वा जयललिता आपल्यावरील केस मागे घ्यावी आणि तामिळनाडूमधील द्रमुकच सरकार बरखास्त करावे म्हणून वाजपेयी सरकारवर दबाव ठेऊन होत्या.

याच दरम्यानच्या काळात अचानक एक दिवशी सोनिया गांधी आणि जयललिता यांच्यातील ती प्रसिद्ध अशी चहा पार्टी झाली आणि दुसऱ्या दिवशी जयललिता यांनी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. वाजपेयी सरकार पडलं. पण विरोधकांकडे पुरेसं संख्याबळ नसल्याने अटलबिहारी वाजपेयी हेच काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यरत राहिले.

१९९९ च्या अगदी सुरुवातीलाच केंद्रीय निवडणूक आयोगाने १३ व्या लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा केली,

१८२ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपचं पुढे आला. पण सरकार स्थापनेसाठी अजूनही जवळपास ९० जागा कमी पडत होत्या. अशावेळी वाजपेयींचें विश्वासू चाणक्य कामाला लागले.

एका बाजूला जयललिता यांचा विषय भाजपसाठी संपला होता. कारण त्यांनी पाठिंबा काढल्यामुळेच नव्यानं निवडणूका घ्याव्या लागल्या होत्या. मात्र यामुळे भाजपपासून दक्षिणेतील एक सर्वात मोठा मित्र पक्ष दुरावला होता. त्यावेळी महाजनांच्या डोक्यात दक्षिणेतील दुसऱ्या मोठ्या पक्षाबाबत म्हणजे द्रमुक बद्दल विचार घोळत होता.

त्यावेळी महाजनांनी तात्काळ हा विचार कोणाला बोलून दाखवला असता तर बाहेरच्यांनी सोडा आधी पक्षातील अनेकांनी त्यांना वेड्यात काढलं असतं. कारण भाजपची ओळख ही हिंदुत्वावादी, शेठजी – भटजींचा पक्ष अशी होती. तर त्याच्या अगदी विरुद्ध टोकाची विचारसरणी द्रमुकची होती. द्रमुकच राजकारण देखील भाषिक अस्मितेभोवती फिरत होते. सोबतच द्रमुकला दक्षिण भारतात बेस होता तर भाजपला उत्तर भारतात.

पण. इथ त्यावेळी पण खूप महत्वाचा होता. कारण महाजनांसाठी आणि भाजपसाठी त्यावेळी एक न् एक खासदार महत्वाचा होता. प्रमोद महाजनांनी द्रमुकला आपला विचार सांगितला. पण विषय पुढे सरकत नव्हता. अशावेळी महाजनांनी द्रमुकमधील तडजोडीच राजकारण करु शकणाऱ्या नेत्याला गाठलं.

नाव होतं मुरासोली मारणं.

दक्षिणेच्या राजकारणात महत्वाचं वजन प्राप्त असलेला नेता. सोबतचं चित्रपटात देखील स्क्रिप्ट रायटर, पत्रकार आणि यापलिकडे म्हणजे करुणानिधींचे जवळचे नातेवाईक होते. महाजन आणि मारण यांच्यातील बोलणी पुढे सरकली. यशस्वी झाली. करुणानिधींनी आपला होकार कळवला आणि भारतातील दोन विरुद्ध टोकाच्या विचाराचे पक्ष एकत्र आले.

अटलबिहारी वाजपेयी यांचं पंतप्रधान म्हणून पुनरागमन झालं. द्रमुकला तीन मंत्रीपद मिळाली. यात मारण यांना वाणिज्य मंत्रालय, तर टीआर बाळू आणि ए. राजा यांना पण मंत्रीपद मिळाले. या युतीनंतर भाजप आणि द्रमुकचे खूप चांगले संबंध तयार होण्यास सुरुवात झाली.

इतकचं काय तर मारणं आजारी असताना त्यांना अनेक दिवसं बिनखात्याचं मंत्री बनवण्यात आलं होतं. जेव्हा नोव्हेंबर २००३ मध्ये त्यांचं निधन झालं तेव्हा स्वतः वाजपेयी अंत्यविधीसाठी उपस्थित होते.

मात्र या दरम्यानच्या काळात म्हणजे २००२ मधील गुजरात दंगलीनंतर द्रमुकला मुस्लिम आणि ख्रिश्चन मतांची काळजी वाटायला लागली होती. या काळजीचा शेवट झाला डिसेंबर २००३ मध्ये. करुणानिधी यांनी सरकारमधील आपल्या उरलेल्या दोन्ही मंत्र्यांचे राजिनामे घेतले.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.