काँग्रेसच्या या उपक्रमाची चेष्टा करताय पण तळागाळात लोकं त्याला प्रतिसाद देत आहेत
आज दूपारनंतर सोशल मिडायावर एक फोटो व्हायरल होवू लागला. आधी तो फोटो दाखवतो मग त्यावर मनसोक्त चर्चा करूया.
फोटोवर मॅटर असाय की पुणे शहर कॉंग्रेस पक्षाने मोफत छत्री दुरूस्त करण्याचा उपक्रम राबवला आहे.
लोकं म्हणतात कॉंग्रेस पक्ष मागे राहिला. हा फोटो बघून तर पुरेपुर पटलं. म्हणजे आजकाल ग्रामपंचायतीच्या मतांचा दर देखील ५ हजारांच्या घरात आहे. मोफत वाटायचंच म्हटलं तर तिकडे तीन हजाराच्या रेमडेसिवीर इंजेक्शनपासून ते पाच सहा महिन्याचा किराणा माल मोफत वाटणारे पक्ष आहेत. कॉंग्रेसने किमान मोफत छत्री तरी द्यायची होती…
पण नाही, कॉंग्रेसने चक्क मोफत छत्र्या दुरूस्त करुन देण्याची गोष्ट केली आणि तुमच्यासहीत आमच्या फ्यूजा उडाल्या..
मग म्हटलं अशी उगी टिका करून चालणार नाही. मॅटर समजून घेतला पाहीजे. तर झालय अस की पुणे शहर कॉंग्रेसकडून ‘ही मोहीम’ १४ जून पासून राबविण्यात येत आहे. आता पर्यंत या योजनेचा शेकडो जणांनी फायदा घेतला आहे, अस सांगण्यात येतय. सध्या ही मोहीम पुण्यातील कॉंग्रेस भवन मध्ये राबविण्यात येत आहे. पुढील काही दिवसात ही संकल्पना पुण्यातील ८ विधानसभा मतदार संघात राबविण्यात येणार आहे.
आत्ता असा अभिनव उपक्रम राबवण्यामागचं कारण काय तर सांगण्यात येतय तर छत्री दुरुस्त करणारे कारागीर दुर्मिळ झाले आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना नादुरुस्त छत्री दुरुस्त करण्यासाठी कष्ट पडत आहेत. म्हणून असा उपक्रम राबवण्याचा विचार कॉंग्रेसने केला.
यासाठी तीन कारागिरांची नेमणूक करण्यात आली आहे.
ही संकल्पना प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या सुपीक डोक्यातून आली आहे.
नवीन छत्री घेण्यासाठी खर्च होतो. त्यापेक्षा नागरिकांच्या घरात नादुरुस्त असेलेली छत्री का मोफत दुरुस्त करून देवू नये असे डोक्यात आली आणि ही संकल्पना राबविली असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितली आहे. कॉंग्रेस भवन येथे १९ जून पर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सकाळी ११ ते सायंकाळी ६ यावेळेतचं नादुरस्त छत्री मोफत दुरुस्त करून देण्यात येते.
छत्री दुरुस्ती उपक्रम का राबविण्यात आला
पुणे शहराची ओळख ही पेठांच शहर म्हणून ओळख होती. त्यामुळे छत्री दुरुस्त करणारे उपलब्ध असायचे. मात्र आता अशी परिस्थिती नाही. नवीन छत्री घेणे काही जणांना परवडत नाही. नागरिकांना केवळ पावसाळ्यात छत्र्यांची जुन्या आठवण येते.
१० महिने एकाच जागी छत्री ठेवून नादुरुस्त होते. कोणाच्या छत्री फाटते, बटन खराब होते, तार तुटतेली असते. हे काम नागरिकांचे करून द्यावे अशी डोक्यात कल्पना सुचली आणि कामाला सुरुवात केल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.
कोरोनामुळे गरीब, मध्यमवर्गीय नागरिक आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यांना मदत होईल या हेतून १४ जून पासून उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
या तीनही कारागिरांना प्रती दिन एक हजार ते बाराशे रुपये देण्यात येत आहे. यातून कारागिरांना तर पैसे मिळत आहेतच पण ज्यांची परिस्थिती नसते अशा लोकांना याचा चांगला फायदा होतोय.
थोडक्यात काय तर आत्ताच्या काळात छत्रीसाठी शे-दिडशे रुपये नव्या छत्रीसाठी किरकोळ वाटणारे लोकं असले तरी असेही लोक आहेत ज्यांना ५ रुपये देवून छत्री दुरूस्त करणं देखील जमत नाही. अशा लोकांसाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं सांगण्यात येतय.
थोडक्यात काय तर वरकरणी चेष्टा करण्यासारखी गोष्ट वाटत असली तरी ही चांगलीच गोष्ट आहे हेच म्हणावे लागेल, फक्त कस होतं अशा वेळी राष्ट्रकुल स्पर्धांसाठी पाच दहा हजारांच्या छत्र्या आणलेल्या देखील विसरलं जात नाही इतकच..
हे ही वाच भिडू
- भाजपच्या होर्डिंग्सवर कॉंग्रेस, सेना, MIM ; पुण्यातला पॅटर्न देशात गाजला पाहीजे भिडू
- पुणेकरांनी नाद केला. लुनाला थेट डेक्कन क्वीन बरोबर रेससाठी उतरवलं!
- कॉंग्रेस गवताला “कॉंग्रेस गवत” का म्हणतात..?