बेंजो पार्ट्यांनी सुपरहिट केलेल्या गाण्यामुळे पहिल्यांदाच भीमगीते टीव्हीवर झळकू लागली..

राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला….

प्रत्येक आंबेडकर जयंतीला हे गाणं मोठ्या जल्लोषात महाराष्ट्रातल्या गल्लोगल्लीत वाजतं. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाची महती सांगणारं हे गीत. आंबेडकरी चळवळीतील गाणी जितकं वास्तव मांडतात तितकंच समाज प्रबोधनही करतात.

लाल दिव्याच्या गाडीला या गाण्याबद्दलची विशेषता म्हणजे आजवरच्या भारताच्या इतिहासात टीव्हीवर झळकलेलं हे पहिलंच भीमगीत.

या गाण्याबद्दलचा आजचा किस्सा :

सगळ्यात आधी आपण हे गाणं कसं बनलं गेलं आणि टीव्हीवर कसं आलं याबद्दल माहिती करून घेऊ.

महागायक आनंद शिंदे हे आंबेडकरी चळवळीतील मोठं नाव. अनेक विद्रोही आणि बाबासाहेबांची गाणी त्यांनी महाराष्ट्रभर जलसे करून पोहचवली. समाजातील अनेक कवींना गाणी लिहायला सांगून ते  गाण्यांना चाली लावून स्वतःच्या आवाजात किंवा त्यांचे बंधू मिलिंद शिंदे यांच्या आवाजात गाणी रेकॉर्ड करत असत. महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत हे भीमगीतांचे जलसे या दोन भावांनी पोहचवले.

एके दिवशी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गाण्यांची तालीम चालू असताना आनंद शिंदे यांचे मित्र अशोक बाराते त्यांना भेटले. आनंद शिंदेंना त्यांनी विनंती केली कि माझे सासरे रामचंद्र जानराव हे कवी आहेत, त्यांचं एखाद गाणं तुम्ही कराल का ? त्यांची खूप इच्छा आहे कि त्यांच्या लेखणीतून आलेलं गाणं तुम्ही गावं म्हणून.

आनंद शिंदेंनी त्यांच्या मित्राला होकार कळवला. दुसऱ्या दिवशी कवी रामचंद्र जानराव आले. ७० वर्षांचे ते गृहस्थ होते. वय झाल्याने ते थकले होते. त्यांनी त्यांच्या कवितेच्या वह्यांचं गठुडं आनंद शिंदेंसमोर ठेवलं. त्यातून त्यांनी दोन ओळींचा मुखडा निवडला आणि पुढे अंतरे जोडत जोडत ते गाणं पूर्ण केलं. अवघ्या तीन मिनिटात आनंद शिंदेंनी त्या गाण्याला चाल लावली. आणि गाणं रेकॉर्डिंगही केलं. 

ज्यावेळी हे गाणं कॅसेट स्वरूपात बाजारात आलं तर ते गाणं प्रचंड गाजलं. सगळीकडे हेच गाणं वाजत होतं. बँजो पार्ट्यांनी या गाण्यावर सगळा लग्नाचा सीजन काढला होता. इतकी लोकप्रियता एखाद्या भीमगीताला मिळणं तसं दुर्मिळचं होतं. म्हतारपणात या गाण्याचे कवी रामचंद्र जानराव फेमस झाले.

आनंद शिंदे या गाण्याबद्दलची आठवण सांगतात कि, ज्यावेळी हे गाणं तयार होत होतं तेव्हा हे कवी धोतरावर आले होते मात्र जेव्हा गाणं हिट झालं आणि त्यानंतर त्यांना पाहिलं तेव्हा ते जीन्स पॅन्टवर मला भेटायला आले होते.

खुद्द आनंद शिंदेंनाही विश्वास नव्हता कि हे गाणं इतकं लोकप्रिय होईल.दुर्दैवाने रामचंद्र जानराव यांचं हे पहिलं आणि शेवटचंच गीत ठरलं.

पुढे रियालिटी शोजचं वारं महाराष्ट्रात आलं. गाणी ,नृत्य अशा अनेक प्रकारचे रिएलिटी शोज टीव्हीवर येऊ लागले. शाहिरी, जलसे, सामने अशा प्रकारांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गाणी गायली जात होती मात्र टीव्हीवर एकदाही गाण्यांच्या शोजमध्ये भीमगीतं गायली जात नव्हती.

गौरव महाराष्ट्राचा हा रिएलिटी शो त्यावेळी तुफ्फान लोकप्रिय होता. त्या कार्यक्रमाचे प्रशिक्षक आनंद शिंदे, वैशाली सामंत अशी मोठी मंडळी होती. त्यावेळी स्पर्धक कौस्तुभ गायकवाड याने पहिल्यांदा राजा राणीच्या जोडीला हे गाणं गायलं. आजवरच्या टीव्ही इतिहासातील सादर केलं गेलेलं हे पहिलं भीमगीतं अशी या गाण्याची ओळख निर्माण झाले. 

या गाण्याचे मूळ गायक आणि संगीतकार म्हणून आनंद शिंदेंनीहि या गाण्याचा एक भाग गायला. इतकी वर्ष लोटली पण या गाण्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. अजूनही त्याच जोशात हे गाणं वाजतं. गाण्यातून मांडलेली वास्तविकता आणि डॉ. बाबासाहेब यांचं योगदान किती मोलाचं आहे याविषयी हे गाणं होतं.

या गाण्याचा शेवटचा अंतरा..

तुला भीमानं माणूस केलं तुझ्यासाठीचं श्रम वेचीलं

नको विसरू भीमाचे मोल बोल गर्वानं जय भीम बोलं

भीमकार्यात जानराव कधी वेळ न दवडीला

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला …….

  • दुर्गेश काळे

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.