विप्रोत ३ टक्के म्हणजेच ५ हजार कोटींचे शेअर्स अमळनेर गावचे आहेत

महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात गुंठा गुंठा जमिन विकून किलोने सोने करणारे मंत्री आहेत. तर दूसऱ्या कोपऱ्यात शे-दोनशे रुपयांसाठी आत्महत्या करणारे शेतकरी आहेत.

संपुर्ण महाराष्ट्रात अस चित्र असताना महाराष्ट्रात काही अशी गावे आहेत ज्या गावांचा विकास एकत्रित असण्याने झाला. सामाजिक, राजकिय बाबतीत हिवरे बजार, राळेगणसिद्धी, पाटोदा अशी गावांची यादी आहे तर उद्योगिक क्रांन्तीमुळे विकास झालेली वालचंदनगर, किर्लोस्करवाडी अशी गावे आहेत.

अशाच यादीत वरचा नंबर लागतो तो अमळनेर गावाचा. अमळनेर जळगाव जिल्ह्यातलं गाव. या गावचं वैशिष्ट म्हणजे गावातले बहुतांश लोक आज कोट्याधीश आहेत.

रस्त्यांवरून चालत जाणारा एखादा साधा माणूस देखील तब्बल पाच, दहा कोटींचा मालक आहे. ते विप्रो सारख्या बलाढ्य कंपनीत समभागधारक आहे. गावाचं सांगायचं झालं तर,

संपुर्ण गावात मिळून कंपनीच्या एकूण शेअर्सपैकी तीन टक्के शेअर्स आहेत व याची आजची मार्केट प्राईज ४,८०० कोटींहून अधिक आहे.

पण या गोष्टीची सुरवात झाली ती खूप खूप वर्षांपुर्वी.

अजिम प्रमेजी यांचे वडिल मोहम्मद हुसेन हाशन प्रेमजी हे बर्माचे प्रिन्स ऑफ राईस म्हणून ओळखले जात.  त्यानंतर प्रेमजी कुटूंब गुजरातच्या कच्छला आले. मात्र इंग्रजांच्या व्यापारी धोरणांना कंटाळून त्यांनी वनस्पती तूप अर्थात डालडा तयार करण्यास सुरवात केली.

२९ डिसेंबर १९५४ साली वेस्टर्न इंडिया वेजिटेबल प्रोडक्टस् लिमिडेट या कपंनीची स्थापना करण्यात आली. आज आयटी क्षेत्रात बाप असणाऱ्या कंपनीची सुरवात डालडा कंपनी म्हणून झाली होती.

जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर परिसरात भूईमुगाच्या शेंगाच उत्पादन होत असल्याने या कंपनीची प्लॅन्ट इथे टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. डालड्याचे उत्पादन वाढू लागले, आणि कंपनी भारतातल्या नामांकित कंपन्यामध्ये गणली जावू लागली.

भारताची फाळणी झाली तेव्हा हा मोठ्ठा उद्योगपती पाकिस्तानात यावा म्हणून मोहम्मद अली जिना यांनी जोरदार प्रयत्न केले. त्यांना पाकिस्तानचे अर्थमंत्रीपद देखील देवू केले. मात्र मोहम्मद प्रेमजी पाकिस्तानात गेले नाहीत.

त्यानंतरच्या काळावधीत म्हणजे ६०-७० च्या दशकात अमळनेर गावातील अनेक लोकं कंपनीत कामगार म्हणून लागले. कंपनी तेल आणि साबणाचे उत्पादन करु लागली होती. विप्रोच्या शेअर्सची किंमत तेव्हा १०० रुपये होती. शंभर रुपये देखील सर्वसामान्य गोष्ट नव्हती. मात्र गावात एक चर्चा सुरू झाली, ती म्हणजे कंपनी फायद्यात आहे शेअर्स घेवू.

अस सांगतात की प्रेमजींनी देखील त्या काळात शेअर्स घ्यावेत म्हणून चांगल मार्केटिंग केलं होतं. दरवर्षी शेअर्सच्या किंमतीवर चांगला लाभांक्ष देण्यात येत होता. कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येकानेच शेअर्स घेतले.

लोक म्हणत की,

पोरगी जन्मली तर तिच्या नावाने शेअर्स घ्या तिचं लग्न होईल.

१९८० च्या सुमारास एका व्यक्तीने २ लाख रुपयांचे शेअर्स विकत घेतले होते. आज त्यांची किंमत ४० कोटींच्या दरम्यान आहे. ते सांगतात की या शेअर्सच्या फक्त लाभांक्षातून मी माझ्या मुलीचं लग्न आणि मुलाचं शिक्षण करु शकलो.

सुरवातीला १०० रुपयांना असणारे हे शेअर्स एकाने घेतल्याने दूसऱ्याने घेतले आणि दूसऱ्याने घेतल्याने तिसऱ्याने घेतले. असं करत करत गावातील अनेकांकडे कंपनीचे शेअर्स आले.

काही लोकांना हे ही माहिती नव्हतं की त्यांच्या नावाने कंपनीत शेअर्स आहेत. वडिलांच्या पश्चात आपलं कंपनीच्या शेअर्सहोल्डरमध्ये आलेलं नाव पाहून आपण कोट्याधीश असल्याचं या मुलांना कळालं. पण याचा फायदा असा झाला की, या मुलांना गुंतवणूकीची भाषा कळली त्यामुळे शेअर्स विकून पैसा करण्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही.

११ ऑगस्ट १९६६ चा कंपनीला कलाटणी देणारा दिवस. 

मोहम्मद प्रेमजी हे काळाच्या पुढे जाणारे व्यक्ती होते. अजीम प्रेमजी या त्यांच्या मुलाचं वय तेव्हा फक्त २१ वर्ष होतं. तो स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकायचा. त्या दिवशी टॅंन्ककॉलच्या जमान्यात त्यांच्या आईने त्यांना फोन करुन वडिल वारल्याची बातमी दिली. सर्वकाही सोडून २१ वर्षाच्या या मुलाला कंपनीचा कारभार हाती घ्यावा लागला.

२१ व्या वर्षी कंपनी हातात घेतल्यानंतर अजिम प्रेमजी यांनी कंपनीला जागतिक स्तरावर घेवून जाण्याचा प्रयत्न चालू केला. भारतातील लालफितशाही कारभाराला कंटाळून IBM कंपनीने भारतातून काढता पाय घेतला.

याच क्षणाचा पुरेपुर फायदा घेवून प्रेमजी यांनी पर्सनल कॉम्प्युटरच्या क्षेत्रात पाय रोवला.

वेस्टर्न इंडिया वेजिटेबल प्रॉडक्ट लिमेटेड या नावातून वेजिटेबल हटवण्यात आलं. कंपनी आत्ता इतर गोष्टींचे प्रॉडक्शन करु लागली. त्यानंतर वेस्टर्नचा W आणि प्रोडक्ट पासून प्रो करण्यात आलं. अशा प्रकारे कंपनीचं नाव विप्रो झालं.

आज आयटी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून विप्रोचं नाव घेण्यात येतं. २००२ साली न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीची लिस्टिंग झाली. अनेक प्रोडक्ट कंपनीमार्फत करण्यात येतात आणि या सर्वात महाराष्ट्राचं एक गाव ३ टक्यांच मालक असतं…!

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.