शाळाबाह्य मुलांना परत आणण्यासाठी टाटांचं बालरक्षक ॲप मदत करणार आहे..!

दरवर्षी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा मोठा आकडा समोर येत असतो. शिक्षणाचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियमानुसार ३० दिवसापेक्षा जास्त दिवस विद्यार्थी शाळेत उपस्थित नसेल तर तो ‘शाळाबाह्य’ ठरतो. शिक्षणासाठी लागणार पैसा, किंवा कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, म्हणून त्यांना बाहेर कामासाठी पाठवलं अश्या अनेक कारणांनी दरवर्षी हजारो मुलं शाळा सोडतात.

अशाच बालकांना शोधून काढण्याचा प्रयत्न दर वर्षी शिक्षण विभागामार्फत केला जातो. यातल्या बऱ्याच जणांना शाळेत परत आणायला शिक्षकांना यश येत, पण तरीही संपूर्ण आकडा कव्हर करताना अडचणी येतात. या मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी ९ जानेवारी २०१७ मध्ये तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमार यांनी राज्यात ”एक गाव, एक बालरक्षक’ मोहीम राबवण्यात आली होती. 

त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीने शाळाबाह्य मुलांसाठी काम करण्याची तळमळ असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला बालरक्षक म्हणून नियुक्त केलं जायचं. या मोहीमेअंतर्गत ३-४ वर्षातचं जवळपास ५० हजार विद्यार्थ्यांना शाळेत परत आणण्यास यश आल होत.

याच साखळीत यंदाच्या वर्षी राज्यातील शाळाबाह्य मुलांसाठी मोहिमेत बालरक्षक अॅपची मदत घेतली जाणार आहे.

खरं तर गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. यामुळे बरेचसे विद्यार्थी आपल्या गावी किंवा परराज्यात निघून गेलेत, त्यात लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट ओढवले आहे. अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. अश्या परिस्थितीत शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.

यासाठी यंदा टाटा ट्रस्टच्या बालरक्षक अॅपच्या माध्यमातून स्थलांतर झालेले, परराज्यातून आलेले, अनियमित विद्यार्थी आणि नव्याने सापडलेले अशा चार गटांत मुलांचा शोध घेण्यात येणार आहे.

सर्व शिक्षा अभियानांतर्गत एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, असा प्रयत्न करण्यात येतो.

हे बालरक्षक अॅप गुगल स्टोरवर देखील उपलब्ध आहे. जे इन्स्टॉल करताच लॉग इन केल्यानंतर शिक्षण विभागातर्फे एक फॉर्म समोर येतो. यात जिल्हा, विद्यार्थ्यांचे नाव, मोबाईल नंबर सोबतच संपूर्ण माहिती घेतली जाते. आणि फॉर्म सबमिट केला जातो. पुढे शिक्षण विभाग विद्यार्थ्याला शाळेत आणण्याची संपूर्ण प्रक्रिया करत.  

या अॅपच्या मदतीनं झोपडपट्ट्यांमधील शाळाबाह्य मुले, स्थलांतरित मुले, चौकात भिक्षा मागणारी, रेल्वे फलाटावर फिरणारी अशा विविध प्रकारच्या मुलांची माहिती सर्वेक्षणामध्ये गोळा केली जाणार आहे.

पुढच्या महिनाभरात हे अॅप कार्यान्वित केले जाणार आहे. हे सर्वेक्षण यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाच्या सरल प्रणालीशी संबंधित पोर्टलला बालरक्षक अॅप जोडले जाणार आहे. प्रत्येक मुलं शाळेपर्यंत कसं येईल आणि त्यांच्या शाळा सोडण्याच्या अडचणी कळाव्यात आणि या अडचणी दूर करून ही मुले शिक्षणाच्या मुळ प्रवाहात परत यावीत असा सर्वेक्षणाचा उद्देश आहे.

एससीईआरटीच्या समता आणि भाषा विभागाच्या उपसंचालक कमलादेवी आपटे यांनी एका मुलाखतीत सांगितले कि, प्रत्येक मुलाचा शोध घेणे आणि शिक्षकांचा त्रास थोडा कमी करण्याच्या उद्देशाने अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.