मल्हारराव आया… इतकचं ऐकू आलं की मुघल सैन्य भितीनं पळत सुटायचं

सुभेदार मल्हारराव होळकर हे मराठ्यांच्या इतिहासातील अजरामर असं नाव आहे. पेशवेकाळात मराठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार लावण्यात मल्हारराव होळकरांचा सिंहाचा वाटा आहे.

स्वत:च्या कर्तृत्वाने, बुद्धीचातुर्याने आणि मनगटाच्या जोरावर मल्हारराव होळकरांनी उत्तरेत मराठा साम्राज्याचा विस्तार केला. स्वबळावर त्यांनी आपलं कर्तृत्व घडवलं. मुघलांची झोप उडवली.

मराठा साम्राज्याच्या सीमा विस्तारल्या.

मराठा साम्राज्याचा गाडा खऱ्या अर्थाने चालवणाऱ्या शुर, पराक्रमी आणि धुरंधर असे म्हणजे सरदार मल्हारराव होळकर.

सुभेदार मल्हारराव होळकरांचा जन्म १६९३ साली पुण्याजवळील होळ या गावी झाला.

मल्हारराव होळकरांचे वडिल हे जेजुरीच्या खंडेरायाचे निस्सीम भक्त होते. त्यामुळे त्यांनी आपल्या पुत्राचं नाव मल्हारराव ठेवलं. मात्र लहान असतांनाच मल्हारराव होळकरांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर मल्हाररावांची जडणघडण मामा भोजराज बारगळ यांच्याकडे झाली.

दाभाड्यांच्या सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीत मल्हाराव शिपाई म्हणून काम करू लागले. मात्र थोड्याच दिवसात मल्हाररावांनी आपल्या मनगटाच्या जोरावर आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. नावलौकीक मिळवला. याच काळात मल्हाररावांची आणि बाजीराव पेशव्यांची मैत्री झाली.

मल्हाररावांनी शौर्य आणि पराक्रमाच्या जोरावर मावळ प्रांताची सुभेदारी मिळवली.

मात्र या नंतर मल्हारराव होळकरांनी पाठीमागं वळून पाहिलंच नाही.

त्यांनी आपली तलवार सातत्याने गनिमांवर तेवतच ठेवली. अनेक लढाया जिंकल्या, मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार केला.

बाजीराव पेशवा आणि सरदार मल्हारराव होळकरांच्या पराक्रमाच्या जोरावर मराठा साम्राज्य विस्तारत होतं. मात्र तिकडं उत्तरेत मुघलांचा अंमल होता. तिकंड मराठा फौजा घुसवायच्या आणि तिथं मराठ्याचां भगवा फडकावयाचा असा बेत होता. या उत्तरेची जबाबदारी सरदार मल्हारराव होळकरांवर दिली गेली.

मल्हारराव होळकरांनी आपल्या फौजा उत्तरेत घुसवल्या. इंदौर शहरावर कब्जा मिळवला. मुघलांना नेस्तनाबुत केलं आणि उत्तरेतील इंदौर भाग मराठ्याच्या साम्राज्यात आणला.

इंदौरमध्ये सरदार मल्हारराव होळकरांचा दबदबा वाढला होता.

मल्हार आया… मल्हार आया… म्हणलं की मुघल सैन्य नुसतं पळत सुटायचं

मराठा साम्राज्य अबाधित राखण्यासाठी आणि साम्राज्याचा विस्तार वाढवण्यासाठी मल्हाररावांनी १७४७ मध्ये तिथं होळकर राजघराण्यांची स्थापना केली. राजवाडे, राजमहल बनवला. इंदौर भागाची पाय़ा उभारणी केली. आणि याच होळकराच्या इंदौरची ख्याती जगभर सरदार मल्हाररावांची सुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी मल्हाररावांच्या नंतर पसरवली.

मराठा साम्राज्याचा विस्तार होत होता. दिल्लीच्या बादशहानं सु्द्धा मराठ्यांचा आणि मल्हारावांचा धसका घेतला होता. मात्र,१७५८ साली मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले यामध्ये सरदार मल्हाररावांचा सिंहाचा वाटा आहे.

पानिपतचं युद्ध आणि मल्हारराव होळकर-

१७६१ सालच्या पानीपतच्या युद्धात मराठ्याचा पराभव झाला. मात्र या लढाईमधून सुभेदार मल्हारराव होळकर पळून गेले असा त्यांच्यावर ठपका ठेवला जातो. मात्र काही इतिहासकारांच्या मते या युद्धात पराभव दिसू लागल्यामुळे सदाशिवराव पेशव्यांनी आपली पत्नी पार्वतीला सुरक्षित ठिकाणी नेण्याची जबाबदारी मल्हारराव होळकरांकडे सोपविली होती.

मात्र, पानिपतच्या पराभवानंतर मराठा साम्राज्याची घडी विस्कटली होेती. ती बसवण्याचं काम माधवराव पेशव्यासोबत त्यांनी पुढाकारानं केलं. अनेक मोहिमा आखल्या. दगदग वाढली. प्रकृती बिघडत गेली.

त्यामुळे २० मे १७६६ रोजी आलमपुर येथे या पराक्रमी सरदाराला, शिवरायांच्या निष्ठावान मावळ्याला मृत्युनं गाठलं.

मल्हाराव होळकरांनी अनेक युद्धे पाहिली. लाखो- हजारो रूपयांनी मराठा साम्राज्याची तिजोरी भरली. राजकारणाचे धागे दोरे उलगडले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य निष्ठेनं आणि जबाबदारीनं वाढवलं.

मराठा साम्राज्याच्या सिमा सिंधू नदीपर्यंत वाढवल्या. मराठा साम्राज्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं, अशा धुरंधर, पराक्रमी, शुरवीर सरदारास आमचा मानाचा मुजरा!!!!

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.