मुंडे-महाजन यांना रामजन्मभूमी आंदोलनात हिरा सापडला: मनोहर पर्रीकर

शेकडो वर्ष गोव्यावर पोर्तुगीजांनी राज्य केलं. स्वातंत्र्यानंतरही गोवन संस्कृतीवर त्यांची छाप कायम राहिली. ठिकठिकाणी असलेले चर्च ख्रिस्ती बांधवावर व एकूणच गोव्याच्या राजकारणावर पकड ठेवून होते.

भारतीय जनता पार्टी सारख्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पक्षाला येथे आपली जागा निर्माण करणे हे देखील एक दिवास्वप्न मानले जायचे. पण एक नेता असा होऊन गेला ज्याने या स्वप्नाला प्रत्यक्षात आणलं,

“मनोहर पर्रीकर”

मनोहर पर्रीकर यांचा जन्म उत्तर गोव्याच्या म्हापसा या गावी एका मराठी कुटुंबात झाला.

लहानपणापासून शाळेत हुशार होते. वडीलांचं छोटसं दुकान होत. मात्र त्यांची इच्छा होती की मुलाने डॉक्टर अथवा सीए बनावं. पण मनोहर यांचा ओढा इंजिनियरिंग कडे होता. जेईईची परीक्षा चांगल्या मार्काने पास होऊन आयआयटी मुंबईमध्ये मेटलर्जी इंजिनियरिंगमध्ये प्रवेश केला.

आंदोलनाशी त्यांचा संबंध आयआयटीमध्येच आला.

अन्याय सहन करण्याची सवय पूर्वीपासूनच नव्हती. तिथल्या होस्टेल मेसच्या जेवणावरून एकदा विद्यार्थ्यांनी जोरदार वाद झाले. मनोहर पर्रीकर यांनी विद्यार्थ्यांना गोळा करून मेसवाल्या विरुद्ध जोरदार आंदोलन केलं व आपला हक्क मिळवला. पर्रीकर पुढे कॉलेजचे जनरल सेक्रेटरी देखील झाले.

आयआयटी मध्ये असतानाच यांच्यातील नेतृत्व गुण सामोरे आले. तिथे एक प्रचंड लोकप्रिय विद्यार्थी नेता म्हणून त्यांना ओळख मिळाली.

पुढे पासआउट झाल्यावर गोव्याला परत आले. एक नोकरी करून पाहिली पण त्यात मन रमले नाही. पुढे स्वतःचा व्यवसाय सुरु केला. त्यात चांगला जम बसला. पण सामाजिक कार्याची ओढ शांत बसू देत नव्हती.यातूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सुरु केले.

शालेय वयात असल्यापासून मनोहर पर्रीकर यांच्यावर संघ संस्कार झाले होते. दत्ता खोलकर, संजय वालावलकर आणि मनोहर पर्रीकर या तरुण मित्रांनी गोव्यात संघप्रसाराच काम जोरात सुरु केलं. अनेक तरुण त्यांच्याकडे आकर्षित झाले. संघटना मजबूत होऊ लागली.

पोर्तुगीजांचा छाप असलेल्या गोव्यात आरएसएसला रुजवण्यात मनोहर पर्रीकर यांचा मोठा वाटा आहे.

याच काळात गोव्यात भाजपची देखील स्थापना झाली होती. आरएसएसशी जोडलेले तरुण त्यांचे राजकीय युनिट असलेल्या भाजपमध्ये देखील काम करू लागले.पर्रीकर देखील संघ प्रसाराच्या कामाबरोबर भाजपच्या छोट्या मोठ्या आंदोलनात सहभागी होऊ लागले.

गोवा भाजपचे प्रभारी होते प्रमोद महाजन. ते पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील नेते होते. 

मनोहर पर्रीकर सांगतात,

त्याकाळी आम्हाला कोणतेही काम पडले, महाजनांना काही सांगावेसे वाटले तर आम्ही गोपीनाथ मुंडे यांची मदत घ्यायचो. मुंडे आमच्या साठी मार्गदर्शक होते.

१९८९ सालच्या पालमपूर अधिवेशनात भाजपने विश्व हिंदू परिषदेच्या रामजन्मभूमी आंदोलनात उडी घ्यायचा निर्णय घेतला. प्रमोद महाजन यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या रामरथात स्वार होऊन लाकृष्ण अडवाणी यांनी अख्खा देश हलवून सोडला.

रामजन्मभूमी आंदोलनामागे प्रमोद महाजन यांनी आपली सारी चाणक्यनिती पणाला लावली होती. अटलबिहारी वाजपेयी यांचा विरोध असूनही हे आंदोलन सुरु झाले. महाजन यांच्या नियोजनामुळे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या आंदोलनाशी जोडले जाऊ लागले.

गोव्यात देखील रामजन्मभूमीचे आंदोलन पेटले. मनोहर पर्रीकर हे यादेखील आंदोलनात पुढे होते.

त्यांनी गोव्याच्या घराघरात जाऊन राममंदिरचे महत्व पटवून दिले. त्यांनी १९८९ साली गोव्यातून ८० जणांची पहिली कारसेवकांची बॅच अयोध्येला पाठवली. इतर राज्यांच्या तुलनेत आपण मागे पडत आहे असे वाटून पुढच्या वर्षी कारसेवा करायला जवळजवळ ३५० जण गोव्यातून निघाले.

यात मनोहर पर्रीकर व त्यांची आई राधाबाई देखील होती.

हे कारसेवक अयोध्येला पोहचले तेव्हा रात्रीच्या वेळी रेल्वे स्टेशनवरच मुक्काम केला होता. साधारण मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता या झोपलेल्या कारसेवकांच्या जथ्थ्यावर लाठीहल्ला केला.

कोणालाही काहीही सुचेना. अचानक धावपळ सुरु झाली, चेंगराचेंगरी झाली. अशातच पोलिसांनी क्रूरपणे लाठीचार्ज सुरूच ठेवला होता. अनेकांची डोकी फुटली,  मनोहर पर्रीकर यांनाही लाठ्या खाव्या लागल्या. पण त्यांना चिंता आपल्या वयस्कर आईची होती. गर्दीत ती हरवून गेली होती.

सगळ शांत झाल्यावर मनोहर पर्रीकर यांनी आईना शोधून काढले.

त्यांच्यावरही निर्दयी पोलीस शिपायांनी लाठी हल्ला केला होता. पण त्याला त्यांनी धैर्याने सामना केला होता.

पुढे अयोध्येतून परत आल्यावर देखील अनेक दिवस वृद्ध राधाबाई आपल्या जखमेची खून सगळ्यांना दाखवायच्या व रामासाठी रक्त सांडल असल्याचं अभिमानाने सांगायच्या.

गोव्याच्या कारसेवकांचे बलिदान वाया गेले नाही.

प्रमोद महाजन यांनी ओळखल की या तरुणांना प्रोत्साहन दिल तर गोव्यात राजकीय चमत्कार घडू शकतो. रामजन्मभूमीच्या आंदोलनात काम जीव तोडून करणाऱ्या, गोव्याच्या कानाकोपऱ्यात भाजपला पोहचवणाऱ्या मनोहर पर्रीकर यांच्यातील क्षमतेचा प्रत्यय आला होता. महाजन व गोपीनाथ मुंडे यांनी गोव्यात सरकार भाजपचे स्थापन करण्यासाठी सर्वपरीचे प्रयत्न सुरु केले.

मनोहर पर्रीकर यांना पाठींबा दिला व पक्षातर्फे लागेल ती सगळी मदत पुरवली गेली.

याचाच परिणाम गोव्यात येत्या दहा वर्षात भाजपच सरकार आलं व मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री बनले. आपल्या साधेपणा व सच्चेपणासाठी ओळखले जाणारे मनोहर पर्रीकर पुढे जाऊन देशाचे संरक्षणमंत्री देखील बनले. सर्जिकल स्ट्राईकसारखे मोठे ऑपरेशन त्यांच्याच कारकिर्दीत घडले.

रामजन्मभूमी व रथयात्रा आंदोलनाने फक्त २ खासदारांचा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीला देशात  सत्तेपर्यंत पोहचवल पण त्या पेक्षाही महत्वाच म्हणजे लाखो कार्यकर्ते या आंदोलनात घडले. नरेंद्र मोदी, मनोहर पर्रीकर यांच्यासारखे हिरे देखील पक्षाला याच आंदोलनात मिळाले.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.