हे नऊ जण टिमकी वाजवत होते, “पहिल्या पराभवानंतर भारतीय टीम पालापाचोळ्याप्रमाणे उडून जाईल “
आज एक चमत्कार घडून आला. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताने सलग दुसऱ्यांदा कसोटी सिरीज विजय मिळवला. यात चमत्कार असा कि पहिल्या कसोटीत आपला लाजिरवाणा पराभव झाला होता. या डावातल्या दुसऱ्या इनिंग मध्ये आपण ३६ धावांवर ऑल डाऊन झालो होतो. आजवरचा हा सर्वात मोठा पराभव होता. अशातच भारताचा कप्तान विराट कोहली परत आला.
गेली काही वर्ष कोहली भारतीय टीमचा कणा बनला आहे. फक्त भारताचा नाही तर जगातला तो बॅट्समन आहे. पत्नीच्या बाळंतपणामुळे त्याला ऑस्ट्रेलियन दौरा अर्ध्यावर टाकून परतावे लागले. भारतासाठी संकटाचा पहाडच होता. अनेक खेळाडू जखमी झाले होते. अजिंक्य राहणेच्या कप्तानीखाली नवीन खेळाडूंना घेऊन लागणार होते.
ऑस्ट्रेलिया सुरवातीपासून आपल्या स्लेजिंग साठी फेमस आहे. फक्त मैदानातील खेळाडूच नाही तर मैदानाबाहेर प्रेक्षक, कॉमेंट्री करणारे, पत्रकार, माजी खेळाडू देखील स्लेजिंगमध्ये सहभागी असतात. माईंड गेम खेळून समोरच्या टीमचा आत्मविश्वास घालवणे हा ऑस्ट्रेलियाच्या गेम प्लानचाच एक भाग आहे.
१९ डिसेंबर २०२० रोजी बॉर्डर गावस्कर सिरीजमध्ये पहिल्या कसोटीचा निकाल लागल्यावर आलेल्या काही निवडक प्रतिक्रिया.
१)मायकल क्लार्क (माजी कप्तान ऑस्ट्रेलिया )-
विराट कोहली नसताना पुढच्या दोन सामन्यासाठी भारताच्या बॅटिंग लाईनअपची कल्पनाही करू शकत नाही. ते खूप मोठ्या संकटात आहेत. जर भारताने विराटशिवाय ऑस्ट्रेलियाला हरवलं तर त्यांनी वर्षभर सेलिब्रेशन करावं.
२)रिकी पॉंटिंग (माजी कप्तान ऑस्ट्रेलिया)-
कोहली नसल्यामुळे भारताचा व्हाइटवॉश होण्याची जास्त शक्यता आहे. अशा या पराभवानंतर पुढे त्यांना सावरणारा कोणीही नाही.
३) शेन वॉर्न (माजी खेळाडू ऑस्ट्रेलिया)-
ऑस्ट्रेलियन टीम भारताला उडवून लावेल. ऍडलेडमधल्या पराभवाच्या शॉकमधून बाहेर येणे त्यांना जमलेलं नाही.
४) मायकल वॉन (माजी इंग्लंड कप्तान )-
आधीच सांगितलं होतं कसोटी सिरीजमध्ये भारतावर मोठा घणाघात होणार आहे. भारताचा ४-०ने कसोटी पराभव होणार आहे.
५)मार्क वॉ (माजी खेळाडू ऑस्ट्रेलिया)-
ऍडेलेडमध्ये तिसऱ्याच दिवशी व्हाईटवॉश मिळलेली भारतीय क्रिकेट टीम पुनरागमनकरेल याची मी कल्पनाही करसु शकत नाही. ऑस्ट्रेलिया चारही सामने जिंकणार आहे.
६)ब्रॅड हॅडीन (माजी विकेटकिपर ऑस्ट्रेलिया)-
मला वाटतं भारतीय टीमला कसोटीत जिंकण्याचा एकमेव चान्स ऍडेलेडमध्ये होता. पण तिथेच त्यांनी मोठा पराभव स्विकारला. आता त्यांच्या परतीची शक्यता नाही.
७)ब्रॅड हॉग (ऑस्ट्रेलिया)-
ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे कारण वेगवान गोलंदाजी हेच आहे. याच बॉलिंगच्या जोरावर हि टीम जागतिक क्रिकेटवर राज्य करत आहे आणि असंच पुढं चालत राहणार. मला वाटते या सिरीजमध्ये देखील ऑस्ट्रेलियाला अपर हॅन्ड राहणार आहे.
८)स्टीव्ह वॉ (माजी कप्तान ऑस्ट्रेलिया)
इतक्या महत्वाच्या सिरिजवेळी भारतीय टीममधून विराट कोहलीच परत जाणं माझ्यासाठी निराशाजनक आणि धक्का देणारे ठरले आहे. पण भारतीय टीम ही धोकादायक आहे आणि ते सिरीजमध्ये पुरागमन करतील यावर कितीही अशक्य असलं तरी मला विश्वास ठेवू वाटतो.
९)टीम पेन (सध्याचा कप्तान ऑस्ट्रेलिया)
मागच्या मॅचवेळी जेव्हा अश्विन बॅटिंग करत होता तेव्हा त्याचा आत्मविश्वास कमी व्हावा म्हणून ऑस्ट्रेलियन कप्तान आणि विकेटकिपर टीम पेन दिवसभर बोलून बोलून त्याला त्रास देत होता. जेव्हा अश्विनने त्याला प्रत्युत्तर दिले तेव्हा टीम पेन ओव्हर कॉन्फिडन्समध्ये म्हणाला गब्बा वर भेटू. आजवर भारतालाच काय कित्येक दिग्गज टीमना या पिचवर ऑस्ट्रेलियाला हरवणं शक्य नाही.
हे सगळं झालं आणि आजचा फायनल निकाल आला. भारतीय टीमने गब्बावर विजय मिळवला. सलग तिसऱ्या कसोटी सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले . विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य आणि टीमने चमत्कार घडवत २-१ ने कांगारूला धूळ चारली.
या मॅचनंतर जगभरातल्या फॅन्सनी या दिग्गज खेळाडूंना त्यांच्या पहिल्या मॅचनंतरच्या वक्तव्यांबद्दल खरपूस समाचार घेतला. इतका अतिआत्मविश्वास कामाचा नाही हेच यातून अधोरेखित होत होत.
या मॅचनंतर ऑस्ट्रेलियाकडून आलेली एकमेव रिऍक्शन या सर्वांचे उत्तर ठरेल.
१०)जस्टिन लँगर (सध्याचे ऑस्ट्रेलियाचे कोच )-
सर्वप्रथम कोणतीही गोष्ट गृहीत धरू नये हे मी या सिरीजमध्ये शिकलोय .दुसरी गोष्ट मला या निमित्ताने शिकायला मिळाली ती म्हणजे कधीही भारतीय टीमला कमी समजू नये. कारण जर तुम्ही १३० कोटी लोकसंख्येच्या देशात पहिल्या ११ मध्ये समावेश होत असाल तर तुम्ही खूपच कणखर असणार नाही का?
हे ही वाच भिडू.
- भारत आणि ऑस्ट्रेलिया स्लेजिंगचं वॉर
- ऑस्ट्रेलियाने आजवर भारताविरुद्ध जिंकण्यासाठी केलेला रडीचा खेळ
- बोल्ड झालेल्या सचिनने त्याला लिहून दिलं, “असं पुन्हा कधीही होणार नाही.”