युपी सोडा मायावती पंजाब जिंकायची तयारी करतायत..
पंजाबमध्ये पुढल्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत, पण आतापासूनच तिथं राजकीय हालचाली सुरु झाल्यात. राज्यात एकीकडे काँग्रेसमध्येच खलबत सुरु असताना शिरोमणि अकाली दल (SAD) आणि मायावतींची बहुजन समाज पार्टी (BSP) एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.
अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी या युतीची घोषणा करत म्हंटले कि,
पंजाबच्या राजकारणाचा हा एक नवीन दिवस आहे, शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पक्ष २०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणुका आणि भविष्यातील निवडणुका एकत्र लढतील.
अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल आणि बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा यांनी या युती संबंधित कराराला अंतिम रूप दिलं. या करारानुसार येत्या विधानसभा निवडणुकीत ११७ जागांपैकी बहुजन समाज पार्टी २० जागा तर शिरोमणि अकाली दल ९७ जागांवर निवडणूक लढवेल.
दोन दशकानंतर एकत्र येणार दोन मित्र
बीएसपी – अकालीने १९९६ मध्ये एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळी या युतीने १३ पैकी १२ जागा जिंकल्या होत्या. मात्र नंतर या दोन्ही पक्षांनी आपली वेगळी वाट धरली. अकाली दल भाजपाला जाऊन मिळालं होत.
मात्र गेल्या वर्षी अकाली आणि भाजपची २३ वर्षांची युती तुटली. त्याच कारण होत कृषी कायदा.
अकाली दल मोदी सरकारनं आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात होत. पक्षाचे जेष्ठ नेते प्रकाश सिंह बादल त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहीत केंद्राचा प्रतिष्ठित मानला जाणारा ‘पद्म भूषण’ पुरस्कार परत दिला होता. पक्षाच्या या आक्रमक भूमिकेमुळे अखेर अकाली दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीतनं (एनडीए) बाहेर पडलं. आणि आता आपल्या जुन्या मित्राकडं परत आलंय.
हि युती अश्या वेळी झालीये जेव्हा बसप आपल्या सर्वात महत्वाच्या राज्य उत्तर प्रदेशात अस्तित्वासाठी लढतय. त्यात पंजाबबरोबर उत्तर प्रदेशात सुद्धा पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत.
जुने सोबती
१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्याच प्रयत्नानं अकाली आणि बसपा यांच्यात युती झाली होती. याच निवडणुकीत बसपा सुप्रीमो कांशीराम यांनी पंजाबच्या होशियारपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. दरम्यान या जुन्या मित्रांच्या एकत्र येण्यानं पंजाबच्या राजकीय समीकरणात अनेक बदल होण्याचे अंदाज बांधले जात आहेत.
तसं पाहायचं झालं तर हि युती राजकीय बरोबरच सामाजिक आघाडीचेही प्रतिनिधित्व करते. कारण अकाली दलावर जाट शीख आणि बसपावर दलितांचे वर्चस्व आहे. महत्वाचं म्हणजे कोणत्याही राज्यपेक्षा पंजाबात दलितांचे प्रमाण सर्वाधिक ३२ टक्के आहे. ज्यात जाटव हे समाजाचा महत्त्वपूर्ण भाग आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष शीख पंथ आणि आंबेडकरी विचाराच्या मदतीनं युती समोर आणणार.