४ जागांवरून ५० च्यावर जाणाऱ्या भाजपच्या नैतिक विजयाची ही आहेत कारणे..

हैद्राबादच्या महानगरपालिकेचे निकाल अंतीम टप्यात आले आहेत. शेवटची माहिती हाती आली होती तेव्हा टीआरएस ५८, भाजप ४९ आणि MIM ४१ जागांवर आघाडीवर आहेत.

चार नगरसेवकांवरून ४९ इतक्या नगरसेवकांवर झेप घेणं ही साधी गोष्ट नाही. तुम्ही म्हणाल काय एका महानगरपालिकेची तर निवडणूक आहे, त्यात काय इतकं.

तर भिडूनों ही फक्त एक साधी महानगर पालिका नाहीए तर,

साडे पाच हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प, एक कोटी पेक्षा जास्त लोकसंख्येचे शहर, ८२ लाख मतदार, ५ लोकसभेच्या जागा, २४ विधानसभेच्या जागा.

हा सगळा अवाढव्य पसारा आहे,

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेचा.

हैद्राबादच्या निवडणूक प्रचारात केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यापासून युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेत वेगवेगळ्या राज्यातले भाजपचे मुख्यमंत्री, आमदार, खासदार सहभागी झाले होते.

इतकच नाही तर अनेक नेते हैद्राबादमध्ये तळ ठोकून होते.

हे सगळं कशासाठी हे पाहण्यापुर्वी हैद्राबादमध्ये गतवर्षी पक्षीय बलाबल काय होतं ते पाहण्याची गरज आहे.

स्थानिक पातळीवर देखील राज्यातील सत्ताधारी पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीचे वर्चस्व आहे.

मागच्या निवडणूकीत १५० पैकी ९९ जागा टीआरएसला मिळाल्या होत्या. तर ४४ जागांवर एमआयएमने विजय मिळवला होता.

तर भाजपला ४ जागांवर समाधान मानावे लागले होते.

आत्ता ४ ते ४९ इतक्या संख्येवर भाजपने कशी झेप घेतली हे पाहुया.

१) बडे नेते प्रचारात आणि हिंदूत्ववादी राजकारण 

महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रचार हा कायमच स्थानिक पातळीवरील मुद्द्यांवर होत असतो. आपण देखील रस्ते, पाणी, वीज, कचरा या अशांच मुद्द्यांवर आजपर्यंत निवडणूका झालेल्या बघितल्या.

त्यामुळे अशा निवडणूकांमध्ये स्थानिक नेतृत्व, नगरसेवक, आमदार आणि तिथले खासदार असे सगळे प्रचारात असतात. तिथे जर राज्यातील मुख्यमंत्री, किंवा एखादा मोठा नेते प्रचाराला गेले तरी आपल्या भुवया उंचवतात.

पण भाजपने हैदराबाद महानगरपालिका निवडणूकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, दुसरे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी, उत्तरप्रदेशचे फायरब्रॅन्ड मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अनेक आमदार-खासदार यांना प्रचारात उतरवल होतं

योगी आदित्यनाथ यांनी तर

‘हैदराबादला भाग्यनगर बनवायला आलोय…’

या एका वाक्यातच आपला इरादा स्पष्ट केला.

अमित शहा यांनी देखील निझाम संस्कृती नष्ट करण्यासाठी आपण इथे आलो असल्याचे स्पष्ट केले होते. या मुद्यावरून निवडणूक हिंदू मुस्लीम टोनवर लढवली जाणार हे स्पष्ट झाले होते.

२) राज्याची रणनिती तयार करणाऱ्यांना महानगरपालिकेची जबाबदारी.

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपची रणनिती तयार करणारे भुपेंद्र यादव यांच्याकडे हैदराबाद महापालिका निवडणुकांची जबाबदारी पक्षाने दिली होती. बिहारमधील एनडीएचा विजय आणि भाजपची उत्तम कामगिरी निश्चित करण्यासाठी भुपेंद्र यादव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

भाजपने ही निवडणूक किती प्रतिष्ठीची केली होती याविषयी हैदराबादच्या डेक्कन क्रॉनिकलचे निवासी संपादक श्रीराम कर्री सांगतात,

हैदराबाद महानगरपालिकेसाठी एवढ्या वरच्या पातळीवर जावून अशा प्रकारचा प्रचार यापुर्वी कधीच झालेला नाही.

मागील निवडणूकीत तर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव देखील प्रचारासाठी आलेले नव्हते. त्यांच्या मुलानेच सगळी रणनिती तयार केली होती. पण यंदा भाजपने आक्रमक प्रचाराची अवलंबलेली रणनिती बघता त्यांना स्वतः या प्रचारात उतरण भाग होतं. असे ही कर्री सांगतात.

३) महानगपालिका नाही तर राज्याच्या राजकारणात घुसण्याची संधी म्हणून इलेक्शनकडे पाहिलं.

तेलंगणा राज्यात २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ११९ पैकी टीआरएसला ८८, कॉंग्रेस १९, एमआयएमला ७ आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला होता.

चंद्रशेखर राव हे दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले.

यात सर्वाधिक ४६ टक्के मत टीआरएसला, २८ टक्के कॉंग्रेसला, भाजपला ७ टक्के आणि एमआयएमला २.७ टक्के मत मिळाली होती.

तर गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही १७ पैकी ९ टीआरएसने आणि तर ४ जागा भाजपने जिंकल्या होत्या.

अशा टीआरएसचे प्राबल्य असलेल्या या राज्यात सध्या महानगरपालिका निवडणूकीच्या माध्यमातुन भाजप इथे उभे राहण्यासाठी जागा करत आहे. फक्त एक महानगरपालिका म्हणून नाही तर राज्यात शिरण्याची संधी म्हणून त्यांनी या निवडणूकीकडे बघितलं, याचचं हे यश म्हणावं लागेल.

४) दुबक्का जागेवरच्या विजयाने आत्मविश्वास वाढला….

गेल्या चार वर्षात भाजपची स्थिती किती बदलली आहे? याचे उत्तर म्हणजे राज्यातील दुबक्कामध्ये अलिकडेच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने मिळवलेला विजय.

हा भाग मुख्यमंत्र्यांचा म्हणजेच केसीआरचा ‘गड’ मानला जातो.

इथल्या शेजारच्याच गजवेल मतदारसंघातुन ते स्वतः निवडून जातात. पण दुबक्का या जागेवर भाजपने १००० मतांनी विजय मिळवला. हा विजय राज्यातील स्थिती बदलण्याचा संकेत म्हणून भाजप पाहात आहे.

दुबक्कातील पोटनिवडणुकीत राज्याचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे पुतणे हरीश राव यांच्यावर टीआरएसची जबाबदारी होती. राव यांची प्रतिमा उत्तम निवडणूक रणनीतिकार म्हणून आहे. पण असे असूनही त्यांच्या पक्षाला दुबक्कामध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

या पोटनिवडणूकीत भाजपच्या मतांची टक्केवारी १३.७५ वरुन वाढून ३८.५ झाली.

यामुळेच राज्यात आणि स्थानिक पातळीवर स्ट्रॉंग नसलेल्या भाजपचा आत्मविश्वास वाढल्याचे राजकीय जाणकार सांगतात. आणि याच आत्मविश्वासातुन त्यांनी महानगरपालिका निवडणूक प्रतिष्ठेची करत भाजपने डाव साधला.

याचसोबत अन्य मुद्याकडे देखील पहायला हवं.

त्यातील पहिले आणि सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे ग्रेटर हैदराबादचे तेलंगणामधील महत्व. महानगरपालिका क्षेत्रात जवळपास विधानसभेच्या २४ जागा येतात. तर बजेट साडेपाच हजार कोटी इतके आहे. तेलंगणाच्या जीडीपीचा सगळ्यात मोठा हिस्सा याच शहातुन येतो. त्यामुळे इथे सत्तेत येवून भाजप एक प्रकारे आपल्यासाठी राज्यातील सत्तेचे दार उघडू पाहत होतं.

दुसरे कारण,

२०१७ मध्ये पक्षाध्यक्ष असताना अमित शहा यांनी  ठेवलेले लक्ष. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपची पंचायत ते पार्लमेंट अशी सत्ता आणण्यासाठी मैदानात उतरा असे म्हंटले होते. त्यामुळे हे लक्ष्य गाठण्यासाठी ते प्रयत्न करत होते व त्यामुळेच निवडणूक प्रतिष्ठेची करत भाजप पहिल्या क्रमांकावर आले.

भाजपच्या या विजयात टीआरएस मधल्या अंतर्गत राजकारणाचा देखील प्रभाव राहिला आहे.

चंद्रशेखर राव यांचा पुतण्या हरिश राव आणि मुलगा के टी रामा राव यांच्यातील विसंवाद. आजपर्यंत पुतण्या हरिश राव यांना पक्षाचे निवडणूक रणनितीकार मानले जात होते. पण मागील काही दिवसांपासून केटी रामा राव यांच पक्षातील वजन वाढलं आहे.

हैदराबाद महानरपालिकेची मागील निवडणूक केटी रामा राव यांच्याच नेतृत्वात टीआरएसने जिंकली होती. तर चंद्रशेखर राव यांनी देखील मुलालाच झुकत माप दिल्याचे दिसून येते.

चौथी गोष्ट म्हणजे अनेक प्रयत्नानंतर दुब्बाकच्या पोटनिवडणूकीत कॉंग्रेस तिसऱ्या स्थानावर राहिली आहे. आजपर्यंत तेलंगणामधील पक्षीय रचनेत भाजप चार नंबरला होती. पण कॉंग्रेस पक्षाची खराब कामगिरी बघता स्ट्रॉंग पार्टी म्हणून भाजप वर येवू शकली.

महानगरपालिका निवडणूकीत धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण…

राजकीय विश्लेषक जिनका नागाराजू या ध्रुवीकरणाच्या राजकारणाबद्दल सांगतात, आजपर्यंत रस्ते, वीज, पाणी याच्या पलिकडे न गेलेली ग्रेटर हैदराबादची निवडणूक यंदा पहिल्यांदाच मुसलमान, सर्जिकल स्ट्राइक, बांग्लादेश, आणि पाकिस्तान या प्रश्नांकडे गेली होती

राज्यात सगळ्यात जास्त प्राबल्य टीआरएसच आहे. तर हैदराबादमध्ये एमआयएमचा प्रभाव जास्त आहे. जवळपास ४० टक्के शहर हे मुस्लीम बहुल आहे. आणि असदुद्दीन औवेसी खासदार देखील इथूनच आहेत. 

नागाराजू पुढे सांगतात, भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी या निवडणूकीत रोहिंग्या मुस्लीमांचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच अकबरुद्दीन ओवैसी आणि असदउद्दीन ओवैसी यांनी रोहिंग्या मुस्लीमांचा विकास करण्याचे काम केल्याचा आरोप केला.

त्यामुळेच ओवेसींना वोट म्हणजे भारतविरोधी वोट असल्याचा प्रचार भाजपकडून करण्यात आला. सोबतच भाजप सत्तेत आल्यानंतर रोहिंग्या मुस्लीम आणि इथे अवैध राहणारे पाकिस्तानी नागरीक यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.

स्मृती इराणी देखील या मुद्द्यावर बोलण्यात मागे नव्हत्या.

याचे उत्तर देताना औवेसी म्हणाले, जर रोहिंग्या मुस्लीम आणि पाकिस्तानी इथे राहतात तर सिकंदराबादचे खासदार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी अजून शांत कसे काय आहेत? असा सवाल त्यांनी केला होता.

या सगळ्या गोष्टीमुळे भाजप या निवडणूकीत सेंटर स्टेजला गेले. आक्रमक प्रचार यंत्रणा राबवून एकप्रकारे ‘साइकोलॉजिकल वॉर’ जिंकण्यात भाजपला यश आले.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.