पथ नाट्य सादर करणाऱ्या नाटककाराची काँग्रेस नेत्यांनी भररस्त्यात हत्या केली होती.
सफदर हाश्मी. जो अन्यायाने पिचलेल्या लोकांचा आवाज बनत होता. तो राजकारणापासून दूर पळणाऱ्या, राजकारणाला नाकं मुरडणाऱ्या लोकांना जागवण्याचं काम करत होता.तो नाटकाच्या माध्यमातून समाजातील वाईट प्रवृत्तींना तोंड देण्याबाबत जागृत करत होता. ज्याने राजकारणातील नीच प्रवृत्तींना ठेचून काढण्याचा प्रयत्न केला त्याच सफदर हाश्मीला भर चौकात नाटक सादर करत असताना त्याची हत्या करण्यात आली.
१२ एप्रिल १९५४ साली जन्मलेला सफदर हाश्मी गीतकार, नाटककार, दिग्दर्शक,अभिनेता असा सर्वगुणसंपन्न कलाकार होता. याच सफदर हाश्मीची २ जानेवारी १९८९ साली ऐन नाटकाच्या प्रयोगात हत्या करण्यात आली. भारताच्या नाट्यक्षेत्राच्या इतिहासात सफदर हाश्मीचं नाव हे एका अढळ ध्रुव ताऱ्यासारखं होतं. ज्यावेळी त्यांची हत्या करण्यात आली त्यावेळी त्यांचं वय केवळ ३४ वर्ष होतं.
साल १९८९. वर्षाचा पहिला दिवस. गाझियाबादमध्ये जन नाट्य मंच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया [ मार्क्झिस्ट ] चे नेते रामानंद झा यांच्या समर्थनार्थ पथनाट्य सादर करत होते. नाटकाचं नाव होतं ‘ हल्ला बोल ‘. सकाळच्या अकराची वेळ. गाझियाबाद्च्या झंदापूर मध्ये आंबेडकर पार्कच्या नजीक चौकात हल्ला बोल नाटकाचा प्रयोग जोरात सुरु होता.
त्याच वेळी तिथे मुकेश शर्मा हा प्रवेश करतो , मुकेश शर्मा हा काँग्रेस पक्षाचा उमेदवार होता. तो नाटक थांबवून सफदर हाश्मीला रस्ता मोकळा कर म्हणून धमकी देतो. सफदर त्याला अत्यंत नम्रपणे सांगतो कि नाटक असं एकदा चालू केल्यावर बंद करता येत नाही, तुम्ही थोडावेळ थांबा किंवा दुसऱ्या रस्त्याने जा. यावर चिडलेल्या विरोधी पक्षाच्या लोकांनी सफदर आणि नाटकातल्या कलाकारांवर हल्ला चढवला. रॉड आणि इतर काही शस्रांनी त्यांनी लोकांना मारायला सुरवात केली. रामबहादूर शास्त्री नावाचा मजूर जागेवरच ठार झाला.
सफदर मात्र गंभीर जखमी झाला, सगळ्या शरीरावर जखमा झाल्या होत्या,अंगातून रक्त वाहत होतं तेव्हा त्याला सी-टु नावाच्या हॉस्पिटलात नेण्यात आलं, मात्र मुकेश शर्माचे लोकं तिथंही येऊन पोहचले आणि त्यांनी परत सफदरवर हल्ला चढवला. यातून मात्र सफदर वाचू शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
शालेय आणि महाविद्यालयीन काळातच सफदर मार्क्सवादाकडे आकर्षित झाला होता. दिल्ली युनिव्हर्सिटीतून त्याने इंग्रजी विषयात पदवी मिळवली. पदवीचं शिक्षण घेत असताना एस एफ आय या संघटनेसोबत काम करण्याचा योग आला. या संघटनेत कार्यरत असताना नाटक लेखनापासून ते प्रयोग पार पाडण्यापर्यंतची कामे तो करू लागला. जेव्हा तो १९ वर्षाचा होता तेव्हा त्याने जन नाट्य मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून त्याने अनेक पथनाट्ये सादर केली. पथनाट्याच्या वापर त्याने सामान्य माणसाचा आवाज म्हणून केला.
कुर्सी कुर्सी कुर्सी हे त्याच नाटक जितकं गाजल तितकंच बदनामही झालं. या नाटकात त्याने त्यावेळचं सरकार असलेल्या इंदिरा गांधींच्या अलोकतांत्रिक गोष्टींवर आधारित होतं. आणीबाणीच्या काळात जेव्हा पथनाट्याच्या प्रयोगालाही परवानगी नव्हती तेव्हा त्यांनी काही ठिकाणी लेक्चरर म्हणून काम केलं.
जनसामान्यांचा प्रक्षोभ मांडण्यासाठी त्याने पथनाट्याच्या मार्ग अवलंबला कारण ते कमी खर्चिक आणि जास्त लोकप्रियता मिळवणारं माध्यम होतं. मशीन नावाच्या पथनाट्यात सफदरने फक्त सहा जण आणि १३ मिनिटांचं नाटक असा प्रयोग केला. या प्रयोगात कामगार लोकांची होणारी पिळवणूक आणि शोषण त्याने इतक्या प्रभावी पद्धतीने दाखवले कि कामगार संघटनांचा त्याला पाठिंबा मिळाला.
नाटकाची साधी सरळ भाषा आणि थेट मुद्द्यावर केलेला प्रहार त्यामुळे हे नाटक भरपूर लोकप्रिय झालं. सफदरच्या या मशीन नाटकाचे अनेक भाषेत अनुवाद होऊन त्याचे प्रयोगही झाले.
राजकारणात तो सक्रिय राहूनही त्याने नाटककार असल्याची ओळख जपून ठेवली, त्याने लहान मुलांसाठी गाणी लिहिली, पोस्टर्स बनवले, फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले ,लेख लिहिले , कामगारांच्या मागण्यांचं समर्थनही केलं.
सफदरच्या अंत्ययात्रेवेळी इतकी लोक जमली होती कि स्वातंत्र्यानंतरच्या भारतात हि दुर्मिळ अंत्ययात्रा होती की ज्यात लोकांना पूर्वसूचना न मिळताही लोकं हजर होती.
सफदरच्या मृत्यूच्या तीन दिवसानंतर त्यांची पत्नी मलेश्री यांनी गाझियाबाद्च्या त्याच ठिकाणी तो अर्धवट झालेला प्रयोग पूर्ण करून आपल्या पतीला श्रद्धांजली वाहिली.
सफदरच्या आईने एका पुस्तकात त्याचा उल्लेख केला कि ,
कॉम्रेड सफदर आम्ही तुझ्या गेल्याचा शोक नाही व्यक्त करत, तर तुझ्या आठवणींचा जल्लोष साजरा करतो.
पुढे सफदरच्या जयंती दिनी भारतभरात राष्ट्रीय पथनाट्य दिवस साजरा केला जाऊ लागला.
पुढे सफदरची हत्या करणाऱ्या मुकेश शर्मासह १० जणांना शिक्षा ठोठावण्यात आली.
हे हि वाच भिडू.
- गांधींचा कॉम्रेड व टाटांचा भाच्चा ब्रिटनचा पहिला कम्युनिस्ट खासदार होता
- विनोबांनी खरंच आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ म्हंटलं होतं का..?
- दोन वेळा गिनीज बुक रेकॉर्ड केलेलं एकमेव नाटक म्हणजे “वऱ्हाड निघालं लंडनला”
आजच्या पीढ़ी ला सफदर काय होता हे समजेल??
अश्याच एकाद दूसर्या लेखातून जागवला जातो. सफदर चे जीवन आनखी विस्तृत पने मांडा वे ही विनंती!
Laal salam Comrade
Durdaiv he aahe ki, aaj chya pidhi la mahit nahie ki Kon aahe Safdar Hashmi. Bol Bhidu che dhanyavad ki ha lekh lihla