देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या मदनलाल धिंग्रांना मायदेशात मरण्याचं भाग्य मिळालं नाही..

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात शौर्य गाजवणाऱ्या अनेक वीर गड्यांची नाव आपल्याला माहिती असतात.  पर्वा न करता या शूरवीरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद या क्रांतिकारी मंडळींनी ब्रिटिश सैन्याला सळो कि पळो करून सोडलं. पण याच आक्रमक क्रांतिकारकांच्या यादीतील एक नाव म्हणजे मदनलाल धिंग्रा. या क्रांतिकारकाविषयी बऱ्याच लोकांना माहिती नाही तर जाणून घेऊया.

मदनलाल धिंग्रा यांना ब्रिटिश अधिकारी कर्झन वायली याची हत्या केल्याच्या आरोपात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. देशासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या मदनलाल धिंग्रा यांना मायदेशात मारण्याचं भाग्य मिळालं नाही. १८ सप्टेंबर १८८३ रोजी मदनलाल धिंग्रांचा जन्म एका सधन कुटुंबात झाला. घरात पैशांचा पूर वाहत होता आणि सोबतच शिक्षणासाठी अनुकूल वातावरण होतं. 

मदनलाल धिंग्रा यांना घरातल्यांबद्दल चीड होती कारण ती सगळी मंडळी इंग्रजांची वाहवा करण्यात मग्न होती. मदनलाल यांनी कॉलेज काळात भारताच्या स्वातंत्र्य संबंधी मुद्द्यावर क्रांती घडवण्याचा निश्चय केला पण त्यांना कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं. मग कुटुंबानेसुद्धा त्यांना घरातून बाहेर काढलं. क्लर्क, टांगेवाला, मजुरी अशी काम करून मदनलाल आपलं आयुष्य जगू लागले. इथेही त्यांनी संघटना बनवण्याचं ठरवलं पण इथूनही त्यांना काढून टाकण्यात आलं.

मोठ्या भावाच्या सल्ल्यामुळे ते इंग्लंडला उच्चशिक्षणासाठी गेले. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमध्ये मदनलाल यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. इंडिया हाऊस या संघटनेशी त्यांचा संपर्क आला आणि इथे त्यांना सावरकर आणि श्यामजी कृष्णवर्मा भेटले. सावरकरांनी तेव्हा आक्रमक धोरण स्वीकारलं होतं, त्यावेळी सावरकर बॉम्ब आणि सशस्त्र क्रांतीसाठी लागणाऱ्या हत्यारांची जमवाजमव करत होते. 

सावरकर मदनलाल धिंग्रांच्या क्रांतिकारी वेडाने प्रभावित झाले आणि त्यांनी अभिनव भारत मंडळ सदस्य बनवून मदनलाल यांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण दिलं. यानंतर मदनलाल आणि सावरकर एकत्र काम करू लागले. असं म्हटलं जात कि दोघांनी मिळून लॉर्ड कर्झनच्या हत्येचा प्लॅन बनवला पण त्यात ते अयशस्वी ठरले. यानंतर मात्र कर्झन वायलीला ठार करण्याचा त्यांनी बेत आखला.

१ जुलै १९०९ रोजी संध्याकाळी इंडियन नॅशनल असोसिएशनच्या वार्षिक समारंभात अनेक भारतीय आणि इंग्रज अधिकारी सामील झालेले होते. यात कर्झन वायलीसुद्धा आलेला होता.

मदनलाल काहीतरी बोलण्याच्या हेतूने त्याच्याजवळ गेले आणि त्याला गोळी मारून बाजूला झाले. यात वायलीला वाचवायला आलेल्या पारसी डॉक्टरची सुद्धा हत्या झाली.

मदनलाल यांनी पळून जाण्याऐवजी तिथेच आत्महत्येचा प्रयत्न केला पण ते पोलिसांच्या हाती लागले.

मदनलाल धिंग्रा यांना हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, खटला भरला.  मदनलाल धिंग्रा यांनी स्वतःहून फाशीची शिक्षा मागितली आणि सांगितलं कि मला माझ्या देशासाठी प्राणाची आहुती द्यायला मिळतेय यातच मी खुश आहे. एक दिवस तरी आमचा असेल.

१७ ऑगस्ट १९०९ रोजी मदनलाल धिंग्रा यांना फाशी देण्यात आली. भारतासोबतच लंडनमध्येसुद्धा मदनलाल यांच्या समर्थनार्थ बाजू मांडली गेली मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. इंग्रजांनी मदनलाल यांचं पार्थिव शरीर त्यांच्या कुटुंबालासुद्धा दिलं नाही.

स्वतःच्या देशासाठी लढलेल्या मदनलाल धिंग्राना मायदेशात मरण्याचं भाग्य मिळालं नाही. १३ डिसेम्बर १९७६ रोजी उधमसिंग यांचं पार्थिव सापडायला आलॆल्या भारतीयांनी मदनलाल धिंग्रा यांचं शरीर ताब्यात घेतलं आणि भारतामध्ये त्यावर विधिवत सोपस्कार पाडण्यात आले. 

अशा मदनलाल धिंग्रांनी आपल्या आक्रमक धोरणामुळे ब्रिटिश सत्तेची झोप उडवली होती. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मदनलाल धिंग्रा यांचं नाव कायमच अजरामर झालं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.