आयोगानं काहीही करावं, पण आमचं वय संपण्याआधी एकदा तरी परीक्षा घ्यावी….
पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केली. मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही दोन वर्षांपासून स्वप्निल मुलाखतीच्या प्रतिक्षेत होता. पण मुलाखतच झाली नसल्यामुळे तो प्रचंड तणावाखाली गेला व त्याने आत्महत्या केली.
गेल्या काही काळापासून स्पर्धा परीक्षा पास झालेल्या मुलांच्या नियुक्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. रद्द झालेलं मराठा आरक्षण आणि कोरोना यामुळे राज्य सरकारने या विद्यार्थ्यांच्या अद्याप नियुक्त्या केलेल्या नाहीत. खासदार संभाजीराजेंनी या नियुक्त्या व्हाव्या यासाठी सातत्यानं आग्रही मागणी लावून धरली आहे.
मात्र दुसऱ्या बाजूला जे विद्यार्थी अद्याप अजून अभ्यास करत आहेत त्यांचा देखील प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
कोरोना काळात मागच्या २ वर्षांपासून जाहिरात नसल्यानं हे विद्यार्थी सध्या आक्रमक झाल्याचं बघायला मिळतं आहे. त्यातुन पुण्यासारख्या काही ठिकाणी मोर्चे देखील काढण्यात आले. यात या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी एकचं आहे, ती म्हणजे काही ही करा पण जाहिरात काढून आमची परीक्षा लवकर घ्या…!!!
आमचं वय संपल्यावर तुम्ही परीक्षा घेणार आहेत का? असा उद्विग्न प्रश्न या विद्यार्थी वर्गाने उपस्थित केला आहे. गेल्या दोन वर्षात ३ वेळा राज्यसेवा आणि ६ वेळा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली. मग आम्ही किती दिवस वाट पाहत अभ्यास करायचा? आमचं वय संपायच्याआधी सरकारने एकदा तरी परीक्षा घ्यावी, अशी विनंती आणि मागणी या विद्यार्थांनी सरकारला केली आहे.
याच बाबत या विद्यार्थ्यांचं नेमकं मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी ‘बोल भिडू’ने काही दिवसांपूर्वी थेट या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला होता.
मूळची सोलापूरची आणि सध्या पुण्यात असलेल्या अनुजा खटके हिने ‘बोल भिडू’शी बोलताना सांगितले,
गावाकडे मुलींचे पदवीपर्यंत शिक्षणचं खूप समजलं जातं, अशा परिस्थितीमध्ये माझी पदवी पूर्ण होऊन आता ३ वर्ष झाले. या काळात परीक्षा होईल या आशेवर घरी जाणे देखील टाळत होते. पण सध्या परीक्षेचा कालावधी अनिश्चित असल्यामुळे आता प्रचंड हतबलता आली आहे. घरी निरुत्तर असते पूर्णपणे.
सरकार सतत तारखा देत, पण त्यातून किती आणि कशी मानसिकता होतीय हे माझं मलाच माहित.
तर सचिन बापूराव चव्हाण यांनी ‘बोल भिडू’शी बोलताना सांगितले कि,
सध्याच्या कोरोना काळात सर्वाधिक नुकसान जर कोणाला सहन करावं लागत असेल तर ते म्हणजे विद्यार्थ्यांना. त्यातही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना जास्तचं. कारण दिवसेंदिवस वय वाढत आहे, वयोमर्यादा निघून जात आहे. पण त्याच वेळी मागच्या २ वर्षांपासून परीक्षा नाही. जाहिरात निघालेली नाही.
याही पेक्षा जास्त त्रास होतो म्हणजे सरकारकडून काही आश्वासन पण मिळतं नाही कि वयोमर्यादा वाढवून मिळेल. तसेच अनेक जागा आज रिक्त पडून आहेत. म्हणजे चणे आहेत पण खायला दात नाहीत अशी अवस्था झाली आहे.
मूळचा उस्मानाबादच्या असलेल्या आणि सध्या पुण्यात एमपीएससी करत असलेला शिवराज कुंभार म्हणाला,
कोरोना काळानंतर जनजीवन पूर्ववत होत असतांना परीक्षा राज्यसेवा परीक्षा विविध करणे देऊन दोन वेळेस पुढे गेली आहे. यात विद्यार्थ्यांचा संयम सुटत आहे.
मी गेले दीड वर्ष विद्यार्थी अभ्यास करत होते. याचा वेगळाच खर्च होता. पुस्तके, रूम, लायब्ररी, जेवण, प्रवास खर्च, मोबाईल, असा महिना कमीत कमी १० हजार रु खर्च होतोच. एवढं करूनही परीक्षा होण्याची शाश्वती कमीच. त्यातच २०१८ पासूनचे काही विद्यार्थी अजून जॉइनिंगच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे या सर्व व्यवस्थेची चीड येतेय.
तर ठेंभूर्णीचा सुरज पाटील म्हणतो,
मी २०१७ पासून एमपीएससीचा स्टडी करतोय, पण मागच्या २ वर्षांपासून जाहिरात निघालेली नाही. माझ्यासह बऱ्यापैकी स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्याचे पालक हे शेतकरी आहेत, पुण्यात राहण्याचा जवळपास दहा ते बारा हजार खर्च होतो. एवढा खर्च विद्यार्थी व पालक पेलू शकत नाहीत. सारखीच जर परीक्षा पुढे गेली तर पुण्यात राहण्याचा खर्च वाढत जातो.
दुसऱ्या बाजूला परीक्षा झालीच तर त्याचे निकाल लवकर लागत नाहीत. निकाल लागला तर त्यांची पोस्टिंग लवकर होत नाही. म्हणजे स्टडी करत असताना पण त्रास आणि निकाल लागल्यावर पण त्रास अशी सध्याची स्थिती आहे.
पुण्यात राहणार राकेश पाटील म्हणतो,
परीक्षा होत नसल्यामुळे सध्या प्रचंड टेन्शन आहे. या टेन्शनमध्ये अभ्यास देखील होत नाही. लॉकडाऊनमध्ये देखील पुण्यात राहायचं म्हंटलं माझी परिस्थिती आधीच साधारण आहे, घरच्यांकडून पैसे मागताना चार वेळा विचार करावा लागतो.
सोबतच महिन्याच्या शेवटी हा महिना निघाला आता पुढचा कसा हा प्रश्न असतो. MPSC मधून आर्थिक स्थिरता येईल म्हंटलं होतं पण आता घरी पैसे मागायची देखील लाज वाटते.
याच सगळ्या परिस्थितीमुळे सध्या हे सगळे मुले एकूणच अक्षरशः वैतागलेले दिसून येत आहेत, मात्र आता सरकार आणि आयोग यावर काय निर्णय घेणार, जाहिरात आणि परीक्षा कधी होणार हे बघावं लागणार आहे.
हे हि वाच भिडू
- आरक्षण रद्द : MPSC च्या नियुक्ती, निवड व प्रवेश प्रक्रियेत असणाऱ्या मुलांच काय होणार..
- आरक्षणाच्या वादात MPSC पास झालेल्यांना ९ महिन्यानंतर पण नियुक्ती दिलेली नाही.
- मी चार वर्ष MPSC त झटलो, आज माझ्या कंपनीचा टर्नओव्हर महिन्याला दहा लाखांचा आहे..!!