४ वेळा मुख्यमंत्री पद हुकलेले नितीन पटेल म्हणतायत अकेला नहीं, जिसकी बस छूटी
किस्मत से ज्यादा और समय से पहले किसी को कुछ नहीं मिलता !
हे तुम्ही कुठं ना कुठं ऐकलंच असेल. काहींना ते खरं वाटत, काहींना नाही. पण हे घडलंय गुजरातच्या एका नेत्यांबरोबर. म्हणजे काही म्हणी काही माणसांना तंतोतंत लागू पडतात. त्यातलेच एक आहेत नितिन पटेल.
या नेत्याचं मुख्यमंत्री पद एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल चारदा हुकलंय..
त्याच झालं असं कि, भाजपशासित गुजरातमध्ये नवीन मुख्यमंत्री निवडल्यानंतर काही तासांनी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, ज्यांना पुन्हा एकदा हे पद नाकारण्यात आलं त्यांची चर्चा सुरु झाली.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी पदाचा राजीनामा दिला आणि लगेचच गांधीनगर येथील भाजप मुख्यालय ‘कमलम’ इथं पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. ज्यात भूपेंद्र पटेल यांची पुढील मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर नितीन पटेल हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर मानले जात होते. मात्र इकडं झालं काहीतरी वेगळंच.
त्यानंतर संध्याकाळी मेहसाणा शहरातील एका कार्यक्रमात पटेल यांनी स्वतःच आपले मुख्यमंत्री पद किती वेळा हुकलंय ते सांगितलं. आणि वरून म्हंटले पण,
मैं अकेला नहीं हैं, जिनकी बस छूट गई। मेरे जैसे कई अन्य हैं।
पण हे नितीन पटेल आहेत तरी कोण ?
नितीन पटेल हे गुजरातमधील मेहसाणा येथून आमदार आहेत. त्यांनी मेहसाणा येथून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलय. नंतर गुजरात विद्यापीठांतर्गत सीएन आर्ट्स आणि बीडी कॉलेजमधून बी.कॉम.मध्ये द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण घेतले. गुजरात मधल्या कडव्या पाटीदार वर्गाशी संबंधित असलेले, नितीन पटेल यांची राजकीय कारकीर्द नगरपालिकेचे सदस्य म्हणून सुरू झाली. यानंतर १९९० मध्ये ते प्रथमच आमदार म्हणून निवडून आले. म्हणजेच विधानसभेत ३१ वर्षांचा अनुभव असलेले नितीन पटेल सध्याच्या सरकारमध्ये खूप वरिष्ठ आहेत.
१९९५ मध्ये जेव्हा पटेल दुसऱ्यांदा आमदार झाले, तेव्हा त्यांचा प्रभाव पाहून पक्षाने त्यांना कॅबिनेट मंत्री बनवलं. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी वित्त, आरोग्य, कृषी, महसूल, सिंचन आणि शहरी विकास ही खाती सांभाळली. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पटेल हे तेलाचे व्यापारी असून शिवानी कॉटन इंडस्ट्रीजचे मालक आहेत. त्याच प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे की त्यांच्याकडे ९ कोटी रुपयांची अचल मालमत्ता आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत.
मग आता सगळ्याच बाबतीत वरिष्ठ असणाऱ्या या पटेलांच मुख्यमंत्री पद कधी कधी हुकलयं.?
तर पहिल्यांदा,
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी अनेक नेत्यांची नावे पुढे येऊ लागली. यातल एक नाव पटेल यांचंही होत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या अगदी थोडेच दिवस आधी, नितीन पटेल माध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हंटले होते की, मोदीजी जेव्हा देशाचे पंतप्रधान बनतील, तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्रीपद ग्रहण करताना मला आनंद होईल. पण माशी कुठं शिंकली माहित नाही. २०१४ मध्ये पक्षाने आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्री बनवलं.
आता दुसऱ्यांदा,
गुजरातमध्ये २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नितीन पटेल यांना मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यानंतरचे दुसरे सर्वात शक्तिशाली नेते मानले जात होते. २०१५-२०१६ च्या पाटीदार आंदोलनानंतर आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकण्यात आले.
तेव्हाही असं झालं होत की या पटेल समाजाचे मन वळवण्यासाठी पुढची जबाबदारी नितीन पटेल यांच्यावर सोपवली जाऊ शकते. पण नंतर शीर्ष नेतृत्वाने विजय रुपाणी यांना मुख्यमंत्री बनवून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. झालं, २०१७ ची संधी पण गेली.
आता तिसऱ्यांदा,
२०१७ च्या निवडणुकीत पाटीदारांची नाराजी असूनही, नितीन पटेल त्यांच्या बाजूने बऱ्याच मतदारांना एकत्र करण्यात यशस्वी झाले. यानंतर, जेव्हा भाजप सत्तेत आल, तेव्हा उघड उघड म्हंटल गेल की, नितीन पटेल मुख्यमंत्री होतील, परंतु हायकमांडने विजय रुपाणी यांची पुन्हा एकदा निवड केली आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याच पटेलांच स्वप्न धुळीस मिळालं.
और अब की बार भूपेंद्र पटेल,
२०२२ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुका होणार आहेत. आणि अगदी एक वर्ष आधी भाजपने विजय रुपाणी यांना काढून भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री केल. आणि पुन्हा एकदा नितीन पटेल यांच स्वप्न भंगलं.
नितीन पटेलांच एवढं स्ट्रगल बघून एक ओळ लिहावीशी वाटते ती म्हणजे,
भाई सब्र का फल मीठा होता है, ये तो सुना था पर पटेलजींका सब्र खत्म ही नहीं हो रहा ।
हे हि वाच भिडू
- गुजरातला फाईट देऊन मराठवाड्याच्या केशर आंब्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली
- म्हणून गुजरातमध्ये पाटीदार आंदोलनाची भाजपला मोठी भीती बसली आहे..
- चंद्रकांत पाटलांच्या रूपात गुजरातला पहिला मराठी मुख्यमंत्री मिळणार असं बोललं जात होतं..