मोदींच्या राजकीय कारकिर्दीची सुरवात 43 वर्षांपुर्वीची मोरबीची दुर्घटना ठरली होती..
एखादी दुर्घटना घडली की त्यांचे पडसाद जसे समाजावर पडतात तसेच ते राजकारणावर देखील पडतात. अशा दुर्घटनांना जबाबदार ठरवून त्या नेत्यांना संपूर्ण आयुष्यातून उठवलं जातं. अनेकांची राजकीय कारकिर्द देखील अशा दुर्घटनांनंतर संपलेली आहे. पण काही दुर्घटना एखाद्या व्यक्तीसाठी राजकारणाचा उदय देखील ठरतात.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मोरबीच्या दौऱ्यावर आहेत. मोरबीमध्ये पुल तुटल्याने झालेल्या दुर्घटनेनंतर त्यांनी हा दौरा आखला. पण याच ठिकाणच्या एका दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा गुजरातच्या व्यासपीठावर आले होते..
ही गोष्ट आहे 43 वर्षांपूर्वीची..
तारिख होती, 11 ऑगस्ट 1979..
या दिवस मोरबी शहरासाठी आजही काळा दिवस समजला जातो. मोरबी शहराजवळून वाहणाऱ्या मच्छू नदीवर तेव्हा धरण बांधण्यात येत होतं. अचानक झालेल्या पावसामुळे व नसलेल्या समन्वयामुळे हे धरण ओव्हरफ्लो झालं आणि फुटलं. दूपारच्या दरम्यान संपूर्ण पाण्याच्या प्रवाहाने मोरबी शहर गिळंकृत केलं.
एका क्षणात हजारों माणसांना जलसमाधी मिळाली. हजारो जनावरं वाहून गेली. पाण्याचा प्रवाह इतका होता की बाहेरून कोणतीही मदत पोहचवणं अशक्य होतं..दूसरी गोष्ट सांगितली जाते की मोरबीचं धरण फुटल्याची माहिती 15 तास उलटून गेल्यानंतरही प्रशासनाकडे नव्हती.
जेव्हा पाणी उतरू लागलं तेव्हा ठिकठिकाणी प्रेतांचा ढिग साठला होतो. मोरबी शहरात सर्वत्र जनावरांचे माणसांच्या प्रेतांचा ढिगारा झाला होता. अनेक प्रेतांचे तुकडे झाले होते तर अनेक प्रेतं कुजली होती. त्याचा वास सर्वत्र असल्याने मदतकार्य करणं साधी गोष्ट नव्हती.
तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते बाबूभाई पटेल.
तर या घटनेची जबाबदारी ज्यांच्याकडे आली होती ते जलसंधारण खात्याचे मंत्री होते केशुभाई पटेल.
केशभाई पटेल मोरबीला पोहचले होते पण पाण्याचा प्रवाह, ठिकठिकाणी साठलेला चिखल व प्रेतांचा ढिग पार करून मोरबीत जाणं त्यांच्यासाठी शक्य झालं नाही. पण इथे लष्करासोबत उभे राहिले ते संघाचे स्वयंसेवक..
कोणत्याही दुर्घटनेनंतर मदतकार्यासाठी धावून जाण्याची प्रथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जोपासली होती. या दुर्घटनेनंतर अनेक स्वयंसेवक उत्सुर्तपणे मोरबीच्या दिशेने रवाना झाले…
यापैकीच एक होते पंतप्रधान नरेंद्र मोदी..
नरेंद्र मोदी तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुर्णवेळ प्रचारक म्हणून काम पहायचे. संघाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची उठबस वाढली होती. संघाचे वरिष्ठ नानाजी देशमुख यांच्यासोबत नरेंद्र मोदी चैन्नईच्या दौऱ्यावर होते. त्यांना मोरबीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच नरेंद्र मोदी देखील मोरबीला मदत कार्य करण्यासाठी आले. मोरबीत येवून त्यांनी संघस्वयंसेवकांचा समन्वय साधण्यास सुरवात केली.
या दुर्घटनेच्यावेळी इंदिरा गांधीमार्फत देखील मोरबीचा दौरा आखण्यात आला. पण झालं अस की ठिकठिकाणी असणाऱ्या कुजलेल्या सडलेल्या प्रेतांचा वास इंदिरा गांधींना सहन झाला नाही व त्यांनी नाकाला रुमाल लावून हा दौरा आटोपता घेतला. शिवाय त्यांच्यासोबत आलेल्या 22 व्हिआयपी लोकांमुळे प्रशासनामार्फत 8 तासांसाठी मदतकार्य बंद ठेवण्यात आलं.
या गोष्टींचा इंदिरा गांधी व कॉंग्रेससाठी खूप निगेट्विव्ह प्रचार झाला. उलटपक्षी स्वयंसेवकांनी केलेल्या कामांची प्रशंसा झाली व इथेच नरेंद्र मोदी पुढे आले. या घटनेनंतर ते गुजरातमध्ये देखील सक्रिय व्यासपीठांवर जावू लागले तसेच संघात देखील त्यांच बळ वाढत गेलं..
हा प्रसंग नरेंद्र मोदींच्या आयुष्यातला पहिला प्रसंग सांगण्यात येतो जेव्हा मोदी हे पहिल्यांदा सक्रियपणे समोर आले होते.
हे ही वाच भिडू