मराठा साम्राज्याने निर्माण केलेली पहिली वेल प्लॅन्ड सिटी देशाची राजधानी बनली..

सातारा शहर. मराठ्यांच्या राजधानीचे ठिकाण. या सातारा शहरामध्ये बसून थोरल्या शाहू छत्रपतींनी अवघ्या भारतभर आपले राज्य प्रस्थापित केले. आजही सातारा शहर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय गोष्टींमध्ये प्रमुख भूमिका बजावत आहे. या महत्वपूर्ण शहराची स्थापना केली होती मराठा छत्रपतीने..

१७०८ साली थोरले शाहू मराठ्यांचे चौथे छत्रपती झाले. या काळात मराठ्यांनी संबंध दक्षिणेत तुफान घोडदौड सुरू केली होती.

मराठ्यांनी बचावात्मक धोरण सोडून आक्रमक पवित्रा स्वीकारला होता. थोरल्या शाहू छत्रपतींना दिल्ली खुणावत होती. याचदरम्यान, शाहू छत्रपतींनी किल्ल्यावरून पायउतार होऊन जमिनीवर राजधानी निर्मिण्याचे योजले. आज सातारा शहर अस्तित्वात आहे, त्या ठिकाणी पूर्वी कसलेही मौजे गाव अथवा कोणताही कसबा नव्हता. मराठा छत्रपतीने नव्याने निर्माण केलेले हे पहिलेच शहर. वाडी, गाव, कसबा असा विकास होत होत शहराची निर्मिती होत असे.. पण थेट ‘शहर’ म्हणून जन्माला आलेले ‘सातारा’ पहिलेच शहर होय.

मराठ्यांच्या इतिहासात घडून गेलेली विलक्षण घटना म्हणून याची नोंद करावीच लागेल.

शाहू महाराजांनी शहराच्या निर्मितीच्या वेळी अनेक व्यापारी आणि रहिवासी पेठा वसवल्या. ‘सदाशिव पेठ’ ही प्रमुख व्यापारी पेठ होती. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, माची पेठाही वसवल्या गेल्या. शाहू छत्रपतींनी आपले जुने सहकारी ‘ज्योत्याजी केसरकर’ यांच्या नावाने केसरकर पेठही वसवली होती.

या कामी छत्रपतींना ‘बसवंत आप्पा कासुरडे’ उर्फ ‘बसाप्पा खोजे’ यांची प्रचंड मदत झाली.

महाराणी विरुबाई यांचे बसाप्पा मानलेले भाऊ. त्यांच्या नावाने वसलेली पेठ आजही सातारा शहरात आहे. याच बसाप्पांनी शिखर शिंगणापूरच्या मोठा महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केला. शहरात पाणीपुरवठा व्हावा या दृष्टीने आधुनिक पद्धतीचे लहान आणि मोठे कालवे शहरातून बांधण्यात आले. शाहू छत्रपतींची दूरदृष्टी बघा, ही यंत्रणा साताऱ्यात सन १७१५ सालीच अस्तित्वात आली.. पण, पुणे आणि कोल्हापूर येथे पाणीपुरवठा यंत्रणा येण्यास अनुक्रमे ‘१७५९’ आणि ‘१७९२’ साल उलगडावे लागले.

पेठांबरोबरच राजसपुरा, व्यंकटेश पुरा, चिमणपुरा, कानपुरा, रघुनाथपुरा हे पुरेसुद्धा अस्तित्वात आले. १७२१ नंतर मल्हार पेठ, यादो गोपाळ पेठ, दुर्गा पेठ यांनीही साताऱ्याच्या विकासात भर घातली. सातारा राजधानीच्या शहराप्रमाणे शोभून दिसू लागले. विशेष म्हणजे त्याकाळी शहराचा दर्जा फक्त साताऱ्यालाच होता. अवघ्या हिंदुस्थानच्या छत्रपतींचे निवासस्थान साताऱ्यास होते, त्यामुळे शहराच्या डामडौलात कोणतीही कमी नव्हती.

इसवी सन 1719 ते 1749 याकाळात हिंदुस्थानचे राजकीय आणि लष्करी केंद्र म्हणून सातारा नावारूपास आले.

‘सातारा’ ही मराठा साम्राज्याची सर्वात शक्तिशाली राजधानी ठरण्याचे कारण म्हणजे, १७०८ ते १७४९ च्या काळात या राजधानीवर कधीही हल्ला झाला नाही. त्याशिवाय कोणत्याही आपत्तीत ५०,००० सैन्य लगेच सातार्यात जमा होऊ शकेल अशी व्यवस्था थोरल्या शाहू छत्रपतींनी करून ठेवली होती.

‘हुजुरातीची फौज’ नेमणारे थोरले शाहू महाराज पहिले मराठा छत्रपती. त्यामुळे सातारा सर्वात ताकदवान राजधानी बनली. ‘रायगड’ मराठ्यांची एकेकाळची राजधानी..

परंतु इसवी सन १६८९ मध्ये ती मोगलांनी जिंकली. थोरल्या शाहू छत्रपतींच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मराठ्यांच्या सत्तेचे केंद्र पुण्यास हलले. पण, पुणे शहर सुद्धा शत्रूच्या ताब्यात गेले, लुटले गेले अथवा कित्येकदा शत्रूच्या हल्ल्याला बळी पडले. पण सातारा शहरावर इसवी सन 1708 नंतर कधीही हल्ला झाला नाही.

सातारा शहर फक्त मराठ्यांची राजधानीच नाही तर देशाची ‘राजकीय’ राजधानी बनली. मराठ्यांच्या शक्तीचे केंद्र बनले. म्हणूनच, सातारकरांनी आणि प्रजेनी शाहूंना मानवंदना म्हणून साताऱ्याला ‘शाहूनगरी’ असे हि नाव दिले.

अशी ही गोष्ट.. मराठ्यांच्या सर्वात बलाढ्य राजधानीची.. मराठ्यांनी निर्माण केलेल्या पहिल्या ‘well-Planned City’ ची..

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.