कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या अंत्यविधीसाठी उदगीरच्या मुस्लीम तरुणांनी पुढाकार घेतला आहे
जिथे हात लावायला भीत आहेत अशा वेळी रोटी कपडा बँक करतीये अंत्यसंस्कार
कोरोनाने मृत्यू झाला असे समजल्यावर कुटुंबातील सदस्य सुद्धा जवळ जात नसल्याचे असंख्य उदाहरण आहेत. नवजात बाळाला कोरोना झाल्यावर रुग्णालयात सोडून आईने पळ काढल्याची घटना झारखंड मध्ये घडली आहे.
ग्रामीण भागात तर अजूनही परिस्थिती वाईट आहे. कोरोना झाला असं समजले तर लोकं त्याकडे वळून पाहत नाहीत. मात्र,
अशावेळी लातूर जिल्ह्यातील उदगीर मधील एक संस्था आदर्श वाटावे असे काम करत आहे. अगदी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा संस्थेच्या कार्याची दखल घेतली आहे.
नेमकी काय काम करते ही संस्था
मराठवाडा-कर्नाटक सीमेवर असणाऱ्या उदगीर मध्ये ‘सलात अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्थे’ मार्फत रोटी कपडा बँक चालविण्यात येते. संस्थेचे ५० ते ५५ सदस्य असून २०१६ पासून ही संस्था कार्यरत आहे.
उदगीर शहर आणि आजूबाजूंच्या गावातील कोणाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला तर रोटी कपडा बँकचे संस्थेचे सदस्य त्यांच्यावर अंत्यसंस्कार करतात.
कोरोनाने मृत्यू झालेल्याचे अंत्यसंस्कार करणे सोपे काम नाही. कुटुंबातील सदस्य जवळ येत नाहीत. अशी परिस्थिती असताना उदगीर मधील रोटी कपडा बँक संस्थेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १६६ जणांचे अंत्यसंस्कार केले आहे. तर पहिल्या लाटेत ३७ जणांचे अंत्यसंस्कार केले आहे आणि हे त्यांचे काम सतत सुरु आहे.
रोटी कपडा बँक केवळ कोरोनामुळे मृत्यू झाला अशांचे अंत्यसंस्कार करते असे असे नाही. शहरातील ३०० बेघर नागरिकांना रोज एक वेळचे जेवण येते. गुजरात मधील एका संस्थेने रोटी कपडा बँकेला एम्बुलेंस भेट दिली आहे. संस्था रुग्णांना ही एम्बुलेंस मोफत उपलब्ध करून देते.
संस्थेचे काम पाहून राज्य सरकार आणि उदगीर नगरपंचायतीने शहरी बेघर मदत केंद्र रोटी कपडा बँकेला चालविण्यासाठी दिले आहे.
सलात अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्थेचे सचिव गौस शेख यांनी बोल भिडूशी बोलतांना सांगितले की,
गेल्या वर्षी उदगीर जवळील चौंडी गावात एका महिलेचा मृत्यू झाला. तिचा अंत्यसंस्कार करण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. आमच्या संस्थेतील सदस्यांना माहिती मिळाला नंतर आम्ही त्या महिलेचा अंत्यसंस्कार केला.
नागरिकांमध्ये कोरोना बद्दल खूप भीती आहे. कोरोनाची चाचणी करून घेत नाही. नंतर मृत्यू झाल्यावर सरकार कडून मदत मिळत नाही. कोरणामुळे मृत्यू झाल्यावर कुटुंबातील सदस्य अंत्यसंस्कार करण्यास नकार देतात. त्यावेळी आमची संस्था पुढे जाऊन त्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार करते. त्यासाठी कोणतेही शुल्क घेण्यात येत नसल्याचे शेख यांनी सांगितले.
माणुसकीची भिंत नावाची संकल्पना वापरून २ लाख कपडे जमा केले आणि ते गरजवंताला दिले असल्याचे शेख यांनी सांगितले.
शेख हे उदगीर मधील गुलशन उर्दू प्राथमिक शाळेत शिक्षक आहे. शेख आणि त्यांचे सहकारी आप आपली कामे करून संस्थेला हातभार लावतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कार्याची दखल
मन की बात कार्यक्रमात ३० एप्रिल २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोटी कपडा बँकेच्या कामाचा गौरव केला आहे. यानंतर गुजरात मधील अंध मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेने एक एम्बुलेंस भेट दिली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ट्वीट करून रोटी कपडा बँकेच्या काम मोठे असल्याचे सांगितले आहे.
उदगीर येथील पत्रकार श्रीनिवास सोनी यांनी बोल भिडूशी बोलतांना सांगितले की,
रोटी कपडा बँक संस्था उदगीर शहरात अनेक दिवसापासून कार्यरत आहेत. मात्र, कोरोना काळात संस्थेचे काम उठून दिसते. बेघर असणाऱ्या असंख्य लोकांना एक वेळ जेवण देण्याचे काम रोटी कपडा बँक गेली अनेक वर्ष करत आहे.
कोरोनामुळे मृत्यू झाल्यावर भीतीमुळे घरचे सुद्धा जवळ जात नाहीत. अशावेळी रोटी कपडा बँक उदगीर शहर आणि जवळील गावात जाऊन कोरोना मुळे मृत्यू झालेल्याचे अंत्यसंस्कार करत आहे.
हे ही वाच भिडू
- कोरोनाच्या काळात भारतात घडलेल्या काही पॉजिटीव्ह गोष्टी माहित करून घ्यायला हव्या.
- कोरोनावरच्या उपायाचा सांगली पॅटर्न आता २ इंजेक्शनमध्ये आजार बरा होणार आहे भिडू
- खरंच आंध्रप्रदेशच्या खासगी रुग्णालयात कोरोना बाधितांवर मोफत उपचार होत आहेत का?