ते एक वाक्य बोलले नसते तर अडवाणी आज देशाच्या पंतप्रधानपदी दिसले असते

गोष्ट आहे दोन हजारच्या दशकातली. प्रमोद महाजन यांच्या शायनिंग इंडिया कॅम्पेनचा परिणाम भाजपने केंद्रातली सत्ता गमावली होती. अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रचारात देश पिंजून काढूनही त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. कोणाला वाटत नसताना धक्कादायक निकाल लागून काँग्रेसची सत्ता आली.

सोनिया गांधींनी मन कि आवाज ऐकून पंतप्रधानपद नाकारलं आणि डॉ.मनमोहन सिंग सत्तेत आले.

इकडे भाजपमध्ये देखील अनेक बदल घडून आले. अटलबिहारी वाजपेयी यांनी आपण राजकारणातून हळूहळू संन्यास घेत असल्याचे सूतोवाच केले. वयोमानामुळे त्यांचा सार्वजनिक कार्यक्रमातील वावर कमी झाला होता. निवडणुकीतील पराभवाचे खापर फुटलेले प्रमोद महाजन बॅक फुटला गेले होते. सुषमा स्वराज, अरुण जेटली व इतर दुसऱ्या फळीतील नेतृत्व अजून चाचपडत होतं.

भाजपची सत्ता एक हाती लालकृष्ण अडवाणी यांच्या कडे आली होती.

खरे तर यापूर्वीच लालकृष्ण अडवाणी भाजपचे पंतप्रधान झाले असते. पन्नास वर्षे राजकारणात असलेल्या अडवाणींनी पक्षाची सर्वप्रकारची चढउतार पाहिली होती. जनसंघ विलीन करून ते भाजप स्थापण्यात ते वाजपेयींच्या इतकेच आघाडीवर होते.

नव्वदच्या दशकात कट्टर हिंदुत्वाची भूमिका आणि रामजन्मभूमी आंदोलन या महाजनांनी सुचवलेल्या आयुधांच्या साह्याने त्यांनी पक्षात मोठे बदल केले. वाजपेयींची मवाळ भूमिका अडवाणींनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर बदलली. त्यांची रामरथयात्रा प्रचंड गाजली. बाबरी मशीद पडण्यास त्यांची भूमिका सर्वात महत्वाची मानली गेली. भाजपला निवडणुकांमध्ये या रथयात्रेचा प्रचंड उपयोग झाला.

फक्त दोन खासदारांचा पक्ष म्हणून हिनवल्या गेलेल्या भाजपला अडवाणींनी सत्तेच्या दारात नेऊन उभं केलं.

मात्र जेव्हा भाजपला केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी इतर मित्र पक्षांची मदत घ्यावी लागणार होती. लालकृष्ण अडवाणी यांची कट्टर हिंदुत्व हाच त्यांचा वीक पॉईंट मानला गेला. इतर पक्षांनी त्यांच्या ऐवजी सर्वसामावेशक चेहरा असलेल्या वाजपेयींना निवडलं. अडवाणींनी देखील त्यावेळी मोठं मन दाखवलं. ते देशाचे गृह मंत्री व पुढे उपपंतप्रधान देखील बनले. १९९८ ते २००४ या काळात वाजपेयींच्या खालोखाल सत्ताकेंद्र म्हणून त्यांना ओळखलं गेलं. मंत्रिमंडळातील अनेक निर्णयात देखील त्यांची छाप असायची.

मात्र आता २००४ नंतर अडवाणी हेच भाजपचे सर्वेसर्वा झाले होते. पुढच्या निवडणुकीत किंवा त्या पूर्वीही काँग्रेसचे सरकार पाडून पंतप्रधान बनायची महत्वाकांक्षा अडवाणी बाळगून होते.

फक्त अडचण एकच होती, कट्टर हिंदुत्व

आपली हि इमेज सर्वसामान्य लोकांमध्ये जरी फेमस असली तरी त्याचा राजकीय तोटा होतोय हे अडवाणींना पटलं होतं. इमेज मेकओव्हर करणे हाच त्याच्या वरचा उपाय होता. यासाठी त्यांनी सुधीन्द्र कुलकर्णी यांना आपला सल्लागार नेमलं. आपण देखील सर्वसमावेशक भूमिका असणारा नेता आहोत हे दाखवण्यासाठी अडवाणींनी प्रयत्न सुरु केले.

अशातच जून २००५ मध्ये त्यांचा पाकिस्तान भेटीचा दौरा ठरला.

खरं तर भारत पाकिस्तान अमन कि आशा मैत्रीचा हा काळ होता. वाजपेयींनी लाहोर दिल्ली बस सुरु केली आणि दोन्ही देशातील तणाव निवळण्यासाठी प्रयत्न सुरु केले.डॉ.मनमोहन सिंग यांच्या कळत हि मैत्री अजून दृढ झाली. क्रिकेटचे सामने, दोन्ही देशातील मोठे नेते एकमेकांच्या देशात दौऱ्यावर येणे या माध्यमातून बॉर्डरवरचा तणाव देखील कमी होण्यास सुरवात झाली होती.

 खरतरं, मूळच्या अडवाणी यांचा जन्म कराचीतला पण फाळणीनंतर त्यांच कुटुंब भारतात आलं. त्यानंतर पहिल्यांदाच अडवाणी पाक भेटीवर गेले. त्यांच्या आपल्या जन्मठीकाणाबद्दलच्या अनेक आठवणी होत्या. त्यांना उजाळा द्यावा यासाठी व दोन्ही देशातील संबंध दृढ करण्यासाठी भारताचा विरोधी पक्ष नेता या नात्याने अडवाणी पाकिस्तानला आले.

त्याकाळी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष लष्करशहा मुशर्रफ हे होते.

सिंध मध्ये आपल्या भूमिपुत्राचं जोरदार स्वागत करण्यात आलं. अडवाणी सहकुटूंब या दौऱ्यावर आले होते. त्यांनी आपली पत्नी व मुलीसह अनेक स्थळांना भेटी दिल्या. आपल्या जुन्या घराचे दर्शन घेतले. हि भेट राजकीय असल्यामुळे त्यांनी पाकिस्तानच्या अनेक नेत्यांशी देखील गाठ घेऊन चर्चा केली.

याच दौऱ्या दरम्यान अडवाणी कराची येथे असलेल्या जीनांच्या मजारला – कबरीला भेट द्यायला गेले. पाकिस्तानचे राष्ट्रपिता मानल्या गेलेल्या मोहम्मद अली जिना यांच्या समाधीवर त्यांनी पूष्पचक्र अर्पण केले. यानंतर तिथल्या पत्रकारांशी बोलताना त्यांना जीनांबद्दल प्रश्न विचारण्यात आले.

त्यावेळी बोलण्याच्या ओघात अडवाणींनी जिना यांचं कौतूक केलं.बॅरिस्टर जीना हे धर्मनिरपेक्ष नेते होते असं ते म्हणाले. ती पत्रकार परिषद संपली मात्र याचे पडसाद दूर भारतात उमटले.

अडवाणी यांनी जिना यांच्या प्रशंसेमूळं भाजपमध्ये वादळ उठलं. कार्यकर्त्यांना हि गोष्ट जराही रुचली नव्हती. एरवी अडवाणी यांचे गोडवे गाणारे भाजप  नेते आणि संघ परिवार तापले.

भारताच्या फाळणीला बॅरिस्टर जीना जबाबदार आहेत,अशी त्यांची पहिल्यापासून भूमिका होती. बॅरिस्टर जीना हे जातीयवादी – व्दिराष्ट्रवादी आणि देशाचा घात करणारे नेते होते अशी प्रतिमा तयार होण्यास संघाचा मोठा वाटा होता. मात्र अडवाणींनी पाकीस्तान जाऊन अचानक खळबळजनक विधान केल्यामुळे अडवाणी सगळ्यांच्या निशाण्यावर आले.

वास्तविक, वाजपेयी यांच्या उदारमतवादी प्रतिमेमुळे भाजपाला देशभर मित्रपक्ष जोडण्यात यश आलं होतं. या पार्श्वभूमीवर रथयात्रेनंतर कडवे हिंदूत्ववादी ही प्रतिमा बदलून उदारमतवादी नेता अशी प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अडवाणींनी जीनांची प्रशंसा केली होती. आणि त्यादृष्टीनेच त्यांचे स्वीय सचिव सुधेंद्र कुलकर्णी यांनी अडवाणींच्या भाषणाचा मसुदा तयार केलेला होता, असं त्यावेळी म्हंटलं गेलं होतं. पण संघ परिवाराला या सर्व गोष्टी त्यांच्या सिद्धांत तत्वाविरोधात वाटल्या.

राजीनामा दिला अनं परत मागे घेतला

भारतात हा सगळा गोंधळ सुरू असताना अडवाणी पाकिस्तानात होते. तिथल्या वास्तव्यास आपलं विधान मागे घेण्यास त्यांनी नकार दिला आणि पक्षाध्यक्षपदाचा आपला राजीनामा पाठवून दिला. हा वाद काय जास्त काळ चालला नाही, ज्यानंतर अडवाणींना राजीनामा मागे घ्यावा लागला. तेव्हा अडवाणी समर्थकांना वाटले कि या संपूर्ण प्रकरणावर पडदा पडला आहे. पण तस घडलं नाही.

२००९ च्या निवडणुकीत भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून उतरलेल्या अडवाणींना संघाच्या कार्यकर्त्यांनी म्हणावी तेवढी मदत केली नाही. उलट काँग्रेसने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली तेव्हा उत्तर देण्यासाठी देखील कोणी नव्हतं. ती निवडणूक जिंकण्यात अडवाणी अपयशी ठरले. जिना यांचं कौतुक केल्यामुळे दुसऱ्या फळीतील मोदी, पर्रीकर असे त्यांच्या जवळचे नेते देखील दूर गेले होते. यासगळ्याचा फटका त्यांना बसला.

पडूही जेव्हा २०१४ सालच्या लोकसभा निवडणूक आल्या तेव्हा भाजपने अडवाणींच्या ऐवजी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड केली. त्यांनी हि निवड सार्थ ठरवत भाषला न भूतो न भविष्यती असा विजय मिळवून दिला. त्यांनी नव्या नेतृत्वाला साधी दिली, याचाच परिणाम सर्व जेष्ठ नेते अडगळीत फेकले गेले. पंतप्रधान बनण्याचं अडवाणींचं स्वप्न कायमचं भंग झालं होतं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.