लतादीदींचा घसा बसला, पण ऐनवेळी पुष्पा पागधरेंनी लावणी गाऊन अजरामर केली…

आपल्याकडील कृषी प्रधान संस्कृतीमुळे पावसाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे अलीकडे हा पाऊस खूप लहरी झाला आहे. पण आपल्या सिनेमात दिग्दर्शकाच्या हुकमी अस्त्राने कधीही पाऊस पडत असल्याने पावसाची अनेक गाणी धो धो वाहत असतात.

अशाच एका पावसाळी गाण्याची ही जन्म कथा… 

आपले दादा कोंडके त्यावेळी त्यांचा पहिला मराठी सिनेमा ‘सोंगाड्या’च्या चित्रीकरणात व्यस्त होते. आपल्या पहिल्याच सिनेमात लताच्या आवाजात एखादं तरी गाणं असावं अशी त्यांची फार इच्छा होती. त्यांनी संगीतकार रामभाऊ कदमांशी तसं बोलूनच ठेवलं होतं. वसंत सबनीस यांच्याकडून त्यांनी एक मस्त लावणी लिहून घेतली.

लावणीचे बोल होते ‘नाही कधी का तुम्हास म्हटले दोष न द्यावा फुका, अहो राया मला पावसात नेऊ नका..’ लताबाईंच्या सोबत रामभाऊंनी रिहर्सल सुरू झाल्या. दादा इकडे कोल्हापूरात शूटींगमध्ये व्यस्त होते. त्यांनी रामभाऊंना लवकरात लवकर ती लावणी रेकॉर्ड करून ती पाठवायला सांगितली.

राम कदमांनी लगेच ताडदेव स्थित बॉम्बे लॅब बुक करून लताला सकाळी नऊ वाजता रेकॉडींग करीता बोलावले. 

लताबाई वेळेवर आल्या पण ‘आज घसा बरोबर नाही आज रेकॉर्डींग नको’ असं म्हणून निघून गेल्या. रामभाऊंवर जणू बॉम्बच पडला. रेकोर्डिंगचे भाडे, इतर खर्च मराठी चित्रनिर्मात्याच्या आवाक्याच्या बाहेरचा होता. तिकडे दादा या लावणीची वाट पाहत खोळंबून बसले होते. रेकॉर्डींग रद्द करणे  कुणालाच परवडणारे नव्हते.

मग काय मार्ग काढायचा?

त्यांचा एक ढोलकीपटू होता पंडीत विधाते नावाचा. रामभाऊंनी त्याला बोलावले व सांगितले, ‘आत्ताच्या आत्ता माहिमला जा आणि पुष्पा पागधरेला घेवून या. येताना टॅक्सीतच तिला गाण्याची चाल समजून द्या व जमलं तर रिहर्सल करून घ्या! पण गाणं आज रेकॉर्ड झालचं पाहिजे.’

ठरल्याप्रमाणे पुष्पा पागधरे आल्या आणि एक दोन टेकमध्येच लावणी रेकॉर्ड झाली सुध्दा! रामभाऊंनी लगोलग दुपारीच ती कोल्हापूरला दादांकडे पाठवून दिली आणि सुटकेचा निश्वास सोडला.

पण खरी गंमत पुढेच आहे. दोन दिवसांनी राम कदम कोल्हापूरला गेले. तिथल्या जवळच्या रेंदाळ या गावी सिनेमाचं शूट चालू होतं. रामभाऊला पाहताच दादांनी त्यांना मिठी मारली. आनंदाने ते म्हणाले ‘अरे काय सुंदर लावणी बनवली आहेस आणि लताने काय बेफाम गायलीय. युनिट मधील सर्व लोक पागल झालेत त्या लावणीने.आम्ही कालच चित्रीकरण सुध्दा करून टाकले.’

राम भाऊंनी त्यांचा उत्साह कमी झाल्यावर बाजूला घेवून रेकॉर्डींगची ’खरी स्टोरी’ दादांना सांगितली. आता आश्चर्यचकीत व्हायची पाळी दादांची होती.

ज्या स्वराला सारे युनिट, खुद्द दादा, लताचा समजत होते तो आवाज तिचा नसून पुष्पा पागधरेचा आहे हे मान्य करायला त्यांना फार वेळ लागला!

आपल्याकडे एक म्हण आहे ‘दाने दाने पे लिखा…’ त्याच चालीत आता म्हणावे लागेल ‘गाने गाने पे लिखा है…’

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.