एका टॅक्स अधिकाऱ्याच्या पुढाकारातुनं महाराष्ट्रात फळांचा केक कापण्याचा ट्रेंड आलायं
वाढदिवस म्हंटल की केक इज मस्ट. अगदी बारक्या पोरापासून ते ८०-९० वर्षाच्या आजोबांपर्यंत सगळ्यांच्या वाढदिवसाला केक हा असतोयच. मग ती व्यक्ती कोण आहे यावर त्या केकची साईज, फ्लेवर असं सगळं डिपेंड करतं. जर कोणी मोठा पुढारी वगैरे असला तर अगदी चार टप्प्याचा केक असतोय…
पण सध्या महाराष्ट्रात याच केकसाठीचा एक नवीन ट्रेंड सुरु झालायं. आता क्रीमचा नाही तर ओरिजनल फळांचा केक कापायचा अशी मोहीम सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
आयडिया काय आहे, तर केकसारखीच ताज्या फळांची रचना करायची आणि ही फळे कापून वाढदिवस साजरा करायचा! यातून एक नवा पायंडा, नवी पद्धत सुरु करण्याच्या निर्धाराने गावोगावी मित्र-नातेवाईकांत असे फळांच्या केकचे फोटो सध्या शेअर करत आहेत.
थोडक्यात काय तर यात फळांवर प्रक्रिया करून बनवलेला नाही तर ओरिजनल फळांचाच केक कापायचा.
त्याच झालेलं असं की, नांदेडमध्ये वस्तू आणि सेवा कर विभागात सहायक आयुक्त असेलेले एकनाथ पावडे यांच्या पुढाकारातून मागच्या एका वर्षांपासून शहरामध्ये पूर्णारोडला विषमुक्त भाजीपाला आणि फळ यांचा स्वतंत्र बाजार भरवला जातो. दररोज २ तास हा बाजार चालतो.
गेल्या आठवड्यात १० मार्च रोजी पावडेंच्या पत्नीच्या वाढदिवस होता. त्यांनी या बाजारातून येताना टरबूज, पपई, कलिंगड अशी फळ घरी घेऊन आले. आणि केक ऐवजी आपण फळ कापायची असं सांगितलं. यामागं उद्देश एवढाच होता की, क्रीमचा केक खाणं टाळावं आणि सोबतचं या उपक्रमामधून शेतकऱ्याच्या फळाला आपल्यामुळे थोडं का होईना पण मार्केट मिळावं.
त्यांनी हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि तिथपासून ट्रेंड चालू झाला.
त्यानंतरची पुढची स्टेज अशी, की ‘होय आम्ही शेतकरी समूहा’ने हा ट्रेंड पुढे नेला. त्यांनी तर त्यांच्या फेसबूक पेजवर या फळांच्या केकची थेट स्पर्धाच जाहीर केली असून, त्यात आकर्षक बक्षिसं दिली जाणार आहेत. येत्या २५ तारखेला याचा निकाल जाहीर होणार आहे.
यात कलिंगड कापण्यापासून सुरू झालेला हा पायंडा अधिक टिकावू आणि शाश्वत कसा होईल, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. विशेषतः लहान मुलं खुश होतील, अशाप्रकारे टरबजू-खरबूज, द्राक्षे, सफरचंद, संत्री, डाळिंबे, केळी यासह स्ट्रॉबेरी, किवी, अननस अशा फळांची निवड आणि मांडणी करायची, तो वाढदिवस साजरा करायचा आणि त्याचा फोटो ‘होय आम्ही शेतकरी टीम’ला पाठवायचा.
आता या व्हायरल ट्रेंडची पार्श्वभूमी शेती क्षेत्रात पत्रकार असलेले दिपक चव्हाण सांगतात,
चालू महिन्यात द्राक्ष, केळी, टरबूज-खरबूज अशा सगळ्या हंगामी फळांची कमी कालावधीत मोठी पुरवठावाढ झाली. परिणामी बाजारभाव या फळांचे भाव गडगडले. अशातच लॉकडाऊनच्या अफवा आणि भीतीमुळे व्यापाऱ्यांकडून कमी दराने बोली लागणे, निर्यातीसाठी कंटेनर शॉर्टेज आदी समस्यांची भर पडत गेली.
किरकोळ विक्रीत फळे चढ्या दरात विकली जात असली तरी फार्मगेट किंमती उत्पादन खर्चाच्या खाली पोचलेल्या.
आणि नेमकं अशा स्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी वाढदिवसाला केकऐवजी फळांचा पर्याय पुढे आणला आणि टायमिंग जुळल्यानं तो महाराष्ट्रातल्या गावागावात पसरला. मागच्या हंगामात सीताफळ, पेरू, डाळिंब अशा फळांनाही बाजार मिळाला नव्हता.
आता यातला दुसरा भाग असा कि,
आपण फळ पुरेशा प्रमाणात खात नसल्याची तक्रार वारंवार केली जाते. आपल्या रोजच्या जेवणात फळे-भाज्या सॅलड्स घेत नाहीत, अशी देखील एक ओरड होतं असते. पण या केकमुळे आपल्या पोटात फळं तर जातात, त्या सोबतच क्रीमचा एक केक घेतला तर तो कमीत कमी ५०० ते ७०० रुपयांना असतो, आणि त्यातून शरीराला विशेष असा फायदा देखील होतं नाही.
हा फळांच्या केकचा वाढदिवस जास्तीत जास्त १०० ते १५० रुपयांमध्ये होऊन जातो.
त्यामुळे पैसे तर वाचतातच शिवाय, शेतकऱ्यांच्या फळाला बाजारपेठ मिळती, आणि आपल्या पोटात देखील फळ जातात. या भावनेतूनच वाढदिवसाला केकऐवजी फळे उपक्रमाला अधिक गती मिळाली.
सोशल मीडियावर कायमचं काही तरी हटके आणि चर्चेत राहणारे ट्रेंड येत असतात, मात्र यातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच विधायक असतात. त्यातील हा फळ केक एक. अमरावतीमध्ये लवकरच याच दुकान देखील सुरु होणार आहे.
हे हि वाच भिडू.
- महाराष्ट्रातला हा शेतकरी खरेखुरे वाघ विहरीच्या मोटेला जुंपून शेती करायचा
- बाळासाहेबांचा आदेश झुगारून भुजबळ शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सहभागी झाले.
- शेतकरी अडचणीत असताना राजकारण न करता मदत कशी करायची असते हे यशवंतरावांकडून शिकावं