त्या शायर साहेबांना नेहरूंनी २ वर्ष तुरुंगात डांबलेलं…
शशी थरूर हे कायम चर्चेत असणारं नाव, काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी थरुर उभे होते तेव्हा त्यांनी एक शेर ट्विट केलं होता….
मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर
लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया
~ Majrooh Sultanpuri— Shashi Tharoor (@ShashiTharoor) September 28, 2022
त्यांचं हे ट्विट प्रचंड व्हायरल झालं, आधी वाटलं थरुर इंग्लिश सोडून उर्दूत बोलायला लागले म्हणून असेल. पण नंतर समजलं की विषय वेगळा आहे. पण या ट्विटवरुन थरुर यांच्यावर टीका झाली होती त्याचं कारण म्हणजे हा शेर लिहीणाऱ्या मजरुह सुलतानपुरी यांना भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी तब्बल २ वर्षांसाठी अटक केली होती.
आणि त्यासाठीचं कारण होतं मजरुह सुलतानपुरी यांनी तत्कालीन सरकारविरोधात आणि साहजिकच नेहरुंविरोधात केलेलं लिखाण.
१ ऑक्टोबर १९१९ रोजी उत्तर प्रदेशमधल्या सुलतानपूर येथे जन्मलेल्या मजरूह यांचं खरं नाव ‘आसरारूल हक खान’ असं होतं, पण लेखन सुरु केल्यानंतर त्यांनी मजरूह सुलतानपुरी असं नाव धारण केलं होतं. गीतकार आणि शायर म्हणून प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या सुलतानपुरी साहेबांसाठी शायरी ही जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या श्वासाइतकी जवळची गोष्ट होती.
१९४९ मध्ये सुलतानपुरी यांच्या आयुष्यात एक अभूतपूर्व घटना घडली. भारताच्या स्वातंत्र्याला दोनच वर्ष पूर्ण झाली होती. मुंबईत कामगारांचा एक मोर्चा निघाला होता. त्यावेळी जवाहरलाल नेहरु भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होते. या मोर्चाला संबोधित करताना सुलतानपुरी यांनी एक गझल ऐकवली.
या गझलेतल्या खादी आणि नेहरू यांच्याविरोधातील शेरमुळे मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर मोरारजीभाई देसाई यांनी मजरूह सुलतानपुरी यांची रवानगी ऑर्थर रोड जेलमध्ये केली. जेलमध्ये टाकण्यात आल्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्यासमोर सरकारची माफी मागण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.
परंतु अत्यंत स्वाभिमानी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते असलेल्या सुलतानपुरी यांनी त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला आणि जवळपास २ वर्षे तुरुंगात काढली.
तुरुंगात असतानाच्या काळात त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली.
कुटुंबाचे हाल व्हायला लागले. त्यावेळी प्रख्यात सिनेकलाकार राज कपूर त्यांच्या मदतीसाठी धावले. राज कपूर यांना सुलतानपुरी यांच्याविषयी आदर होता. याच आदरातून राज कपूर त्यांची मदत करू इच्छित होते. पण इथे परत सुलतानपुरी यांचा स्वाभिमान आडवा आला. राज कपूर यांची मदत स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.
राज कपूर यांनी मात्र या परिस्थितीतून देखील मधला मार्ग काढला. त्यांनी असा उपाय सुचवला की ज्यामुळे सुलतानपुरी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देखील होईल आणि त्यांचा स्वाभिमान देखील दुखावला जाणार नाही.
राज कपूर यांनी मजरूह सुलतानपुरी यांच्याकडून एक गीत लिहून घेतलं आणि त्याबदल्यात त्यांच्या कुटुंबियांना १००० रुपये दिले.
सुपरहिट ठरलेलं ‘एक दिन मिट जायेगा, माटी के मोल’ हेच ते गाणं होतं, जे सुलतानपुरी साहेबांनी राज कपूर यांच्या विनंतीवरून लिहिलं होतं. १९७५ साली राज कपूर यांनी आपल्या ‘धरम करम’ या चित्रपटात ते वापरलं होतं.
तुरुंगात बंदिस्त असताना देखील त्यांनी लिहिलेल्या गाण्यांना जनतेत प्रचंड लोकप्रियता मिळत होती. अनेकांच्या ओठांवर त्यांचं गाणं असायचं. शेवटी त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेसमोर सरकारला झुकावं लागलं आणि त्यांची जेलमधून सुटका करण्यात आली.
हिंदी चित्रपटसृष्टीवर गीतकार म्हणून दीर्घकाळ आपलं साम्राज्य गाजवलेल्या मजरूह सुलतानपुरी यांना खरं कधीच चित्रपटसृष्टीत यायचं नव्हतं. त्यावेळच्या अनेक शायरांप्रमाणेच गीतकार म्हणून काम करणं आपल्या प्रतिष्ठेला शोभत नाही, असं त्यांचं मत होतं. पण शेवटी त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आणि एकापेक्षा एक असे जबरदस्त हिट गाणी बॉलीवूडला दिली.
सर्वप्रथम १९४५ साली सुलतानपुरी साहेब एका मुशायऱ्यात सहभागी झालेले असताना फिल्म प्रोड्युसर ए.के.कारदार यांच्या नजरेत ते भरले आणि त्यांनी सुलतानपुरी यांच्यासमोर आपल्या चित्रपटासाठी गीतलेखन करण्याचा प्रस्ताव ठेवला.
कारदार यांचा हा प्रस्ताव सुलतानपुरी साहेबांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावला परंतु कारदार यांनी आपली जिद्द सोडली नाही.
आपल्या चित्रपटासाठी कुठल्याही किमतीवर गीतलेखक म्हणून कारदार यांना सुलतानपुरीच हवे होते. त्यामुळे त्यांनी सुलतानपुरी यांचे गुरु जिगर मोरादाबादी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी समजावून सांगितल्यानंतर शेवटी सुलतानपुरी साहेब गीतलेखनासाठी तयार झाले. १९४६ साली कारदार यांच्या ‘शहाजहा’ चित्रपटाच्या गीतलेखकाच्या स्वरुपात त्यांची बॉलीवूडमध्ये एंट्री झाली.
‘शहाजहा’मधीलच त्यांनी लिहिलेलं आणि के.एल. सहगल साहेबांनी गायलेलं ‘जब दिल ही टूट गया, अब जी के क्या करेंगे’ प्रचंड गाजलं. स्वतः के.एल. सहगल साहेबांना हे गाणं खूप आवडलं. त्यामुळे आपल्या मृत्युनंतर अंत्ययात्रेत हे गाणं वाजवलं जावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.
के.एल. साहेबांकडून मिळालेली ही पावतीच मजरूह सुलतानपुरी यांच्याबद्दल सर्व काही सांगून जाते. कुठल्याही कलाकारासाठी आपल्या कलाकृतीला मिळालेलं यापेक्षा चांगलं दुसरं प्रशस्तीपत्र काय असू शकतं..?
एकदा चित्रपटसृष्टीत पदार्पण झाल्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. जवळपास ६ दशकं बॉलीवूडमध्ये सक्रीय राहिलेल्या सुलतानपुरी साहेबांनी ३०० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी ४००० पेक्षा अधिक गाणी लिहली. ‘तेरे मेरे मिलन की ये रैना’, ‘हमे तुमसे प्यार कितना, ये हम नही जानते’, ‘इक लडकी भिगी भागी सी’, ‘वो मेरे दिल के चैन’ ही त्यांच्या सुपरहिट गाण्यांची काही उदाहरणे.
१९६४ सालचा ‘दोस्ती’ प्रचंड गाजला. याच चित्रपटातील ‘चाहुंगा मै तुझे सांझ सवेरे’ या गीतासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराच्या फिल्मफेअर पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं.
पुढे १९९३ साली मजरूह सुलतानपुरी साहेबांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान समजल्या जाणाऱ्या ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी ते दादासाहेब फाळके पुरस्कार पटकावणारे बॉलीवूडमधील पहिले गीतकार ठरले होते.
मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिलेले शेर, गाणी आजही आपल्या ओठांवर आहेत, पण त्यांची प्रकर्षानं आठवण होते, ती नेहरुंनी केलेल्या अटकेनंतरही दाखवलेल्या स्वाभिमानामुळेच.
हे ही वाच भिडू:
- इकबाल बानो यांनी ‘हम देखेंगे’ गात पाकिस्तानी लष्करशहाच्या आदेशांना पायाखाली तुडवलं होतं…
- तिला विसरायचं कितीही ठरवलं, तरी जॉन एलियामुळं ते शक्य नाही…
- जेव्हा पंडित नेहरूंच्या नातवाला महात्मा गांधींच्या नातवानं आव्हान दिलं होतं