अफगाण्यांना धडकी भरवणाऱ्या शूर योद्ध्याचा वाडा कोपरगावात दुर्लक्षित राहिलाय..
नगर जिल्ह्यातील कोपरगाव साखर कारखान्यांचा गाव म्हणून फेमस. गावात महाशिवरात्रीला भरणाऱ्या यात्रेचा सुद्धा तितकाच डंका असतो. पण या कोपरगावाला खरी ओळख मिळते ती राघोबा दादांच्या वाड्यामूळे.
रघुनाथराव उर्फ राघोबा दादा म्हणजेच श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे सुपुत्र. प्रचंड महापराक्रमी पण तितकेच शीघ्रकोपी. मराठ्यांचा अटकेपार झेंडा पोहचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. अफगाणिस्तानचा सुलतान अहमदशाह अब्दालीचा लेक तैमूर शाह दुर्राणी याला लाहोर मधून पळवून लावलं. शिंदे होळकर यांच्या सेनेसह अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेला पेशावरसुद्धा जिंकला.
रघुनाथराव पेशवे आणि मराठा सेनेची धडकी अफगाण सैन्याला देखील बसली होती. हि राघो भरारी पेशावरच्या पुढे पर्यंत देखील पोहचली असती पण रघुनाथराव पुण्याच्या राजकारणाच्या ओढीने आततायीपणे परतले. त्यांच्या याच चुकीचा परिणाम पुढे पानिपतात अब्दालीकडून मराठ्यांचा मोठा पराभव झाला. सेनापती पेशवे सदाशिवराव,पेशव्यांचे वारसदार विश्वासराव मारले गेले. अगणित सैन्य संपत्ती लुटली गेली. या धक्यात रघुनाथरावांचे जेष्ठ बंधू नानासाहेब पेशवे यांचा मृत्यू झाला.
नानासाहेब पेशवे यांच्या नंतर माधवराव पेशवे सत्तेत आले. राघोबादादां त्यांचे काकाश्री. पण रघुनाथराव पेशवे यांची महत्वाकांक्षा आणि पाताळयंत्री स्वभाव यामुळे त्यांना कोपरगावात नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. भलेही राघोबादादा नजरकैदेत होते, पण आपल्यासाठी त्यांनी तिथं भव्य वाडा बांधला.
गावच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर कोपरगाव आणि आसपासचा परिसर पुराणकथांनी समृध्द आहे. १३व्या शतकात हा परिसर देवगिरीच्या यादव राजांच्या ताब्यात होता. त्यानंतर इथे बहामनी राज्य आले. पुढे निजामशाही आणि मोगलांनी इथं आपलं वर्चस्व गाजवलं.
पण, कोपरगावला खरं ऐतिहासिक महत्त्व मिळलं, ते पेशव्यांच्या काळात.
१७८२ मध्ये श्रीमंत थोरले माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यात पेशवाईच्या पदावरून एकदा संघर्ष पेटला. त्यानंत राघोबाबादादांनी कोपरगांव येथील बेटात उंच चौथरा तयार करून भव्य असा वाडा बांधला.
तर माधवराव जिवंत असताना राघोबा दादांना हातपाय काय हलवता आले नाही. मात्र, नंतरच्या काळात कट-कारस्थानं रचून त्यांनी पेशवे पदाच्या गादीवर आलेला धाकटा पुतण्या नारायणराव पेशवे यांना मारून टाकलं.
श्रीमंत नारायण पेशवेंच्या मृत्यूनंतर पेशवाईचा इतिहास बदलला. राघोबा आणि आनंदीबाईंना न्यायासनापुढे उभं केलं गेलं. न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी आनंदीबाईंना कोपरगांव इथं नजरकैदेत ठेवलं तर राघोबादादांना देहांताची शिक्षा ठोठावली.
राघोबादादांची देहान्ताची शिक्षा प्रत्यक्षात झाली नाही. पण नंतर त्यांनाही कोपरगावच्या वाड्यात नजरकैदैत ठेवण्यात आले.
तसा हा वाडा पेशवाईला शोभेल असाच होता. गोदावरीच्या तीरावर २० फूट उंचीच्या चौथाऱ्यावर तो बांधलेला. वाड्यातल्या दिवाणखान्यातील छताचं नक्षीकाम डोळ्यांचे पारडं फिटणारं आहे.वाड्यात दिवाणखाना, दरबारहॉल, स्त्री पुरुषांसाठी कोठीघर, मुदपाकखाना, नाटकशाळा, घोड्यांच्या पागा होता.
याचं वाड्यात राघोबादादांनी ११ डिसेंबर १७८३ रोजी अखेरचा श्वास घेतला, मात्र अंत्यविधी त्यांच्या इच्छेनुसार हिंगणे वाड्यात करण्यात आला. कोपरगावच्या वाड्यात आनंदीबाईंनी समाधी उभी करून वृंदावन उभ केलं.
राघोबादादांच्या मृत्यूनंतर आनंदीबाई आणि त्यांची मुलं ऑक्टोबर १७९२ पर्यंत म्हणजे तब्बल ९ वर्षे याचं वाड्यात राहिल्या. मात्र, एकामागून एक अशा वाईट घटना घडल्याने आनंदीबाईंनी अखेर नाशिकच्या आनंदवल्लीला जायचं ठरवलं.
पुढे हा वाडा इंग्रजांनी ताब्यात घेतला. आपल्या अनेक सरकारी कामासाठी त्यांनी या वाड्याचा वापर केला. मात्र, इंग्रजांच्या जाण्यानंतर या वाड्याला कोणी वालीच उरला नाही. आणि वाडा तसाच पडून राहिला.
आपल्या नक्षीकाम आणि कलाकुसरीने आकर्षित करणारा हा वाडा आज मात्र पूर्णतः कोलमडून गेलाय.
वारा, वादळ, पाऊसाने लाकडी दरवाजे, खिडक्या, महिरपी जमीनदोस्त झाल्या. वाड्याचं वैभव असणारा मोठा चौकही उध्वस्त झालाय. वाड्याच्या आत एक तळघर सूद्धा आहे, पण अलिकडच्या काळात ते कोणीही उघडण्याचा प्रयत्न केलेला नाही.
दरम्यान, वाड्यातून बेटापर्यंत नदीच्या खालून भुयारी मार्ग आहे, असं म्हणतात की, या मार्गाने कधी कधी सैन्याच्या गुप्त हालचाली केल्या जातात.
या वाड्याचं जतन व्हावं म्हणून सरकारी अधिकारी बऱ्याच वेळा इथं येऊन भेट देऊन गेलेत. सध्या हा वाडा पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असून तिथं डागडूजीचं काम सुरू आहे.
हे ही वाच भिडू
- बाजीराव पेशवेसुद्धा पिलाजीराव जाधवरावांना युद्धशास्त्रातला गुरू मानायचे
- उत्तर प्रदेशमधील मराठी बोलणारं गाव, इथेही एकेकाळी शनिवार वाडा होता..
- नानासाहेब पेशवे कोल्हापूरच्या छत्रपतींना संपवणार होते.