पंतप्रधान होणार का विचारल्यावर हा नेता चक्क नकार देऊन घरातून पळून गेला…

ग्रामपंचायत सदस्याची इच्छा काय असते? तर सरपंच व्हायचं. नगरसेवकाची इच्छा काय असते. तर नगराध्यक्ष व्हायचं. जिल्हा परिषद सदस्याची इच्छा काय असते? तालुक्याचा आमदार व्हायच. आमदार झाल्यावर इच्छा असते मंत्री व्हायची.

आता समाधान इथंच होतं का? तर नाही. मंत्र्याला मुख्यमंत्री, खासदाराला केंद्रात मंत्री आणि केंद्रातील मंत्र्याला पंतप्रधान. असा काय तो चढता क्रम असतो. म्हणजे इच्छा असते म्हणून राजकारण पुढे चालेल असते. म्हणून सत्तेची आणि खुर्चीची स्वप्न पडतात. ती देखील सतत वरच्या क्रमांकावर जाणारी.

पण तुम्हाला कोणी सांगितल कि असे एक दिग्गज भारताच्या राजकारणात होवून गेलेत ज्यांनी पंतप्रधान पदाची ऑफर धुडकावून लावली होती ? तर पटेल का? नसेल पटलं तरी, पटवून घ्या.

 कारण या दिग्गजाचं नाव होते, व्ही. पी. सिंग. अर्थात, विश्वनाथ प्रताप सिंग.

हा किस्सा आहे १९९६ सालचा. १९९६ ते १९९९ हा काळ म्हणजे भारतीय राजकारणातील आजवरचा सर्वात अस्थिर काळ समजला जातो. कारण याच काळात देशाने ५ वेळा पंतप्रधानांना शपथ घेताना पहिले होते.

तर त्यावेळी म्हणजे १९९६ साली केंद्रात अटल बिहारी वाजपेयी याचं १३ दिवसाचं सरकार पडलं होतं. देशाच्या राजकीय इतिहासात असं प्रथमच घडलं होतं की एखाद्या पंतप्रधानांच सरकार इतक्या कमी कालावधीत कोसळलं होतं.

पुरेसं संख्याबळ सोबत नसताना अटल बिहारी वाजपेयी यांनी सरकार तर स्थापन केलं होतं, परंतु लोकसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक खासदारांची संख्या न जुळवता आल्यानं अपयश आलं आणि विश्वासमत प्रस्तावावरील मतदानापूर्वीच अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

वाजपेयींचं १३ दिवसाचं सरकार कोसळलं.

यानंतर देशात १३ वेगवेगळ्या पक्षांच्या आघाडीचं जम्बो सरकार स्थापन होऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिलेले एच.डी. देवेगौडा देशाचे पंतप्रधान झाले.

परंतु एच.डी. देवेगौडा हे देखील पंतप्रधानपदासाठी ‘संयुक्त मोर्चा’ची पहिली पसंती नव्हते. एच.डी. देवेगौडा संयुक्त मोर्चाचे नेते म्हणून समोर येण्याची कहाणी देखील अशीच रंजक आहे.

काँग्रेसच्या विनाशर्त पाठींब्यावर संयुक्त मोर्चाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाल्यानंतर संयुक्त मोर्चासमोर देखील प्रश्न होता तो नेता निवडीचा. मात्र या प्रश्नाच्या उत्तराचा शोध येऊन थांबला आणि एका नावावर सर्वांचंच एकमत होतं. ते नाव म्हणजे देशाचे माजी प्रधानमंत्री विश्वनाथ प्रताप सिंग. त्यांनी या आधी १९८९ ते १९९० या काळात ११ महिन्यांसाठी देशाचे पंतप्रधानपद भूषवले होते.

मात्र व्ही.पी. सिंग स्वतः १९९६ साली पुन्हा पंतप्रधान बनण्यास उत्सुक नव्हते. त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे आपला नकार कळवला होता.

व्ही.पी. सिंग यांनी नकार कळवल्यानंतर देखील संयुक्त मोर्चाची नेतेमंडळी व्ही.पी. सिंग यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करत होती. त्यामुळेच त्यांचा होकार मिळवण्यासाठी संयुक्त मोर्चातील नेते काही नेते थेट त्यांच्या घरी गेले. व्ही.पी. सिंग यांनी अत्यंत आदरातिथ्याने त्यांचं स्वागत केलं, त्यांना चहापाण्यासाठी विचारलं.

मात्र दुसऱ्या बाजूला आपल्या नकारावर देखील ठाम राहिले.

पण संयुक्त मोर्चाची नेतेमंडळी देखील आपला आग्रह सोडायला तयार नव्हते. काहीही झालं तर व्ही. पी. सिंग यांचा होकार घेतल्याशिवाय उठायचं नाही हा चंगचं या नेत्यांनी बांधला होता. जेव्हा हे व्ही.पी. सिंग यांच्या लक्षात आलं त्यावेळी ते घराच्या मागच्या दरवाज्यातून आपल्या गाडीत बसून दिल्लीच्या आजूबाजूच्या रस्त्यावर फेरफटका मारायला निघून गेले.

पण इतकडे जवळपास दुपारच्या ४ वाजेपर्यंत संयुक्त मोर्चाची मंडळी व्ही.पी. सिंग यांची वाट बघत होते. परंतु अखेरपर्यंत व्ही. पी. सिंग काही आले नाहीत. शेवटी व्ही.पी. सिंग यांनी फोन करून कळवलं की कृपया आपली वाट बघू नये. आपण नेतेपद स्वीकारण्यास इच्छुक नाही. यानंतर ही जबाबदारी देवेगौडा यांच्याकडे आली. आणि १ जून १९९६ साली त्यांनी देशाचे अकरावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

माजी पंतप्रधान देवेगौडा आणि इंदर कुमार गुजराल यांनीच एका मुलाखतीदरम्यान हा किस्सा सांगितला आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.