भारतात कुठल्याही धर्मा विरुद्ध बोललं तर काय शिक्षा होऊ शकते ? कायदा काय सांगतो?

नुपूर शर्मा प्रकरणाच्या चर्चेत सद्या एकच प्रश्न विचारला जातोय ते म्हणजे नुपूर शर्माला कधी अटक होणार ?

भाजप नेत्या नूपूर शर्माच्या अटकेची मागणी करणारी अनेक आंदोलनं झालीत, देशात अनेक राज्यांमध्ये हिंसाचाराच्या घटनाही घडल्यात, अनेक ठिकाणी आक्षेपार्ह घोषणाबाजीही करण्यात आली. त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. 

मात्र केंद्र सरकारकडून अजून तरी काही रिऍक्शन नसेल आली मात्र पोलीस प्रशासनाने नुपूर शर्मांच्यावर कायदेशीर कारवाई केलीय..

पक्षानेही त्यांच्यावर पक्षीय कारवाई करत त्यांना पक्षातून सस्पेंड केलं. पण या प्रकरणाने असा काही पेट घेतला ज्याचे पडसाद अगदी आखाती देशांपर्यंत पसरले. त्याचे परिणाम म्हणजे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली.

मग प्रश्न येतो कि नुपूर शर्माला अटक केली जाऊ शकते का ? त्यांनी केलेला गुन्हा काय होता ?

तर नुपूर शर्मा प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद बोलल्या. ज्यामुळे हिंसाचाराला खतपाणी मिळालं. मग या प्रकरणावरून आपण काय धडा घ्यावा ? ते म्हणजे कुठल्याही धर्मा विरुद्ध अपमानास्पद बोलणं टाळावं…असा गुन्हा जर आपण केला तर गंभीर शिक्षा होऊ शकते. हे सगळं आपण ऐकूनच आहोत मात्र साधा प्रश्न सर्वांनाच पडतो तो म्हणजे, 

भारतात कुठल्याही धर्मा विरुद्ध बोललं तर काय शिक्षा होऊ शकते ? कायदा काय सांगतो? याबद्दल माहिती घेऊया..

नुपूर शर्मा यांच्या प्रकरणात त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे नोंद केले गेलेत, कलम १५३ अ, १५३ ब, २९५ अ, २९८ आणि ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद आहे. आरोपपत्रात नमूद केल्याप्रमाणे त्यांना ९० दिवसांच्या आत कधीही अटक होऊ शकते. 

या चार परिस्थितीत पोलीस नुपूर शर्माला अटक करू शकतात, जर पोलिसांना वाटत असेल की,

  • नुपूर शर्मा पळून जाऊ शकतात..
  • नुपूर शर्मा साक्षीदारांना धमकावत असेल तर…
  • नुपूर शर्मा तपासात ढवळाढवळ करेल असेल तर..
  • शर्मा यांच्याकडून केलेल्या गुन्ह्याची पुनरावृत्ती होऊ शकते असे वाटत असेल तर.

नेमकं आपण बोलल्यावर हे कलम १५३ अ, १५३ ब, २९५ अ, २९८ आणि ५०५ कलम लागू होतात? 

धार्मिक गटांत, दोन धर्मांमध्ये द्वेष वाढवणे, धार्मिक भावना भडकावणे, एखाद्या व्यक्तीच्या/गटाच्या  धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने केलेलं हेतूपरस्पर वक्तव्य करणे, समुदायाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धेचा अपमान करणे, एखाद्याची भावना दुखावण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक व आक्षेपार्ह कृत्यं करणे इत्यादी.

यातील कलम २९५ अ काय सांगते ?

कलम १५३ अ म्हणजे समाजात धार्मिक तेढ निर्माण करणे.  तर कलम २९५  अंतर्गत, आपल्याकडून झालेल्या वक्तव्यातून, शब्दातून, लिखाणातून, गाण्यांतून, व्हिडिओतून, कोणत्याही धर्माच्या, जातीच्या, वर्गाच्या भावना दुखावल्यास, भडकावल्यास किंव्हा धर्माचा अपमान केल्यास हा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्याची गंभीर शिक्षा म्हणजे तुम्हाला थेट कारावास होऊ शकतो तीही ३ वर्षांची. सोबतच दंड देखील भरावा लागतो. कलम २९५ अ या कलमाअंतर्गत केलेला गुन्हा हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा असतो. देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात तुमच्याविरुद्धच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंद होऊ शकतो.

याआधीही कलम २९५ अ अंतर्गत कारवाई केल्याची प्रकरणे घडून आलीत, 

  • स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याच्या विरोधात कलम २९५ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्या एका स्टॅन्डअप कॉमेडी शोमध्ये हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर मुनव्वर फारुकीवर गुन्हा दाखल झाला आणि त्याला न्यायालयीन कोठडीही देण्यात आली.
  •  ‘अ सुटेबल बॉय’ या वेब सीरिजमध्ये मंदिरातील परिसरात किसिंग सिन दाखवल्याबाबत नेटफ्लिक्सच्या दोन कर्मचाऱ्यांवर कलम २९५ अ अंतर्गत कारवाई केलेली.
  • ‘तांडव’ या सीरिजच्या वेळेस निर्मात्यांवर कलम १५३ अ अंतर्गत कारवाई झालेली.

याबाबत असाही एक मुद्दा चर्चिला जातो कि, कलम १९ (१) नुसार भारतीय नागरिकाला सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचे आणि मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. मग कलम २९५ अ  हे त्यात अडसर ठरतंय..

याचबाबत रामजीलाल मोदी प्रकरण हे महत्वाचं उदाहरण आहे. उत्तर प्रदेश घटनापीठाने या प्रकरणावर विधान केलेलं कि, “एखाद्या धर्माबाबत जाणीवपूर्वक, हेतुपुरस्पर आक्षेपार्ह विधान जे सामाजिक शांततेला आणि सुव्यवस्थेला बाधा आणणारे ठरत असेल तर हे  कलम २९५ अ अंतर्गत गुन्हा दाखल करणे व्यक्तीस्वातंत्र्याचं कलम १९ (१) (अ) उल्लंघन करणारी ठरत नाही”

इथे हे ही नमूद केलं आहे की, हे कलम केवळ अशाच प्रकरणे/कृत्यांवर शिक्षा करते ज्यामध्ये एखाद्या  धार्मिक भावनांचा अपमान केला जातो, अशाच कृतीमध्येच या कलमाअंर्गत कारवाई होते.

भारतात कुठल्याही धर्मा विरुद्ध बोलतांना जरा नुपूर शर्मा प्रकरण आणि वर नमूद केलेलं कलमं आणि त्याअंतर्गत होणारी कारवाई लक्षात ठेवा म्हणजे झालं.. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.