टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात आला तर तो नागपूरलाच जाणार कारण…

वेदांत फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातला गेल्यानंतर आता सगळ्यांचे लक्ष टाटा एअरबस प्रोजेक्टकडे लागले आहे. २१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला हा प्रोजेक्ट आपल्याच राज्यात यावा यासाठी गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक हे राज्य प्रयत्न करत आहेत.

वेदांता प्रकल्पाच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या टीकेमुळे राज्य सरकार हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे असं सांगितलं जातंय. तसेच हा प्रोजेक्ट राज्यात आल्यानंतर तो नागपुरात सुरु होईल अशी सुद्धा चर्चा होतेय. चर्चेत असलेला हा टाटा एअरबस प्रोजेक्ट महाराष्ट्रात येईल की नाही कि दुसऱ्याच राज्यात जाईल लवकरच कळेल… 

पण यात महत्वाचं हे आहे की, या प्रोजेक्टसाठी नेमकी नागपूरचीच चर्चा का केली जात आहे?

तर यामागे कारण आहे ते म्हणजे नागपुरात असलेला मिहान सेज प्रकल्प. स्पेशल एरोस्पेस प्रोजेक्ट्ससाठी बनवण्यात आलेल्या या सेजचं पूर्ण नाव आहे मल्टी मॉडेल इंटरनॅशनल पॅसेंजर अँड हब एअरपोर्ट ॲट नागपूर. 

नागपूर शहराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकार आणि केंद्र सरकारने २००८ मध्ये नागपूर विमानतळाला लागूनच या स्पेशल इकॉनॉमिक झोनची निर्मिती सुरु केली. २००९ मध्ये याच सेजच्या नावाने मिहान कंपनीची निर्मिती करण्यात आली. या कंपनीत ५१ टक्के शेअर्स महाराष्ट्र सरकारचे आहेत तर ४९ टक्के शेअर्स केंद्र सरकारचे आहेत.

या सेझमध्ये सिव्हिल तसेच लढाऊ विमानाच्या निर्मितीसाठी आणि उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या सर्व महत्वपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यात या ८ प्रमुख सुविधांचा समावेश आहे. 

१. विमानतळ 

डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा या सेजमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाचा वापर मिहानमधील कंपन्यांना करण्यात येतो. नागपूर विमानतळावर टेक ऑफ आणि लँडिंगसाठी दोन धावपट्ट्या आहेत. तसेच या विमानतळावर जास्त गर्दी नसते त्यामुळे उड्डाण करणे सोपे जाते.

१४ लाख प्रवासी आणि ८ लाख ७० हजार टॅन मालवाहतूक करण्याची क्षमता असलेले टर्मिनल बांधले जात आहे. तसेच टर्मिनलमध्ये ५० आणि बाजूच्या भागात ५० अशी १०० विमानाची पार्किंग करण्याची जागा उपलब्ध आहे. त्यामुळे विमानतळाचे सगळे काम अगदी सुरळीत होतात. 

२. प्रशासकीय सुविधा 

मिहानमध्ये प्रोजेक्ट सुरु करण्यासाठी ज्या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात त्यासाठी एकखिडकी योजना लागू करण्यात आलेली आहे. इथे सुरु होणाऱ्या प्रोजेक्टमध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तूंसाठी आयातशुल्क माफ करण्यात आले आहे. पहिल्या पाच वर्षांपर्यंत निर्यात उत्पन्नावरील आयकरावर पूर्णपणे सूट देण्यात येते तर त्यासमोरच्या ५ वर्षात आयकरात ५० टक्के सुट दिली जाते.

इथे सुरु होणाऱ्या व्यवसायासाठी ५०० मिलियन डॉलरपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तसेच केंद्रीय आणि राज्य सरकारच्या विक्री आणि सेवा करात सुद्धा सवलत दिली जाते. 

३. कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीमेपासून दूर असलेले शहर

नागपूर शहर देशाच्या अगदी मध्यभागी आहे. पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या सीमेपासून हे शहर लांब आहेच; सोबतच सागरी सीमेपासून सुद्धा लांब आहे. तसेच नागपूरचा पट्टा भूकंपाच्या धक्यांपासून सुरक्षित आहे. त्यामुळे नागपूरला इतर शहरांपेक्षा जास्त सुरक्षित मानलं जातं.

नागपूर हे महाराष्ट्रातील तिसरं मोठं शहर आहे तसेच मुंबई-कोलकाता आणि चेन्नई-दिल्ली या चारही महानगरांच्या मध्यभागी आहे. त्यामुळे इमरजेंसी लँडिंगसाठी हे सोईचे ठिकाण आहे.

४. प्रशिक्षित मनुष्यबळ 

नागपूर शासकीय आयटीआय हे महाराष्ट्रातील उत्तम इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इंस्टीट्युटपैकी एक आहे. यात विमानाची बांधणी आणि दुरुस्तीचे कोर्स शिकवले जातात. सोबतच बाकी संस्थांमध्ये सुद्धा याचे कोर्स उपलब्ध आहेत त्यामुळे विमान कंपन्यांसाठी लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ इथे सहज उपलब्ध होते. 

५. एअर इंडियाचा एमआरओ प्लांट 

मिहानमध्ये एअर इंडिया इंजिनियरिंग सर्व्हिसेसचा प्लांट आहे. या प्लांटमध्ये एअर बस आणि बोईंग या दोन्हीप्रकारच्या विमानाची दुरुस्ती केली जाते. इथे विमानाचे सुटे पार्ट, विमानाची बांधणी, दुरुस्ती आणि सर्व्हिसिंगची कामं केली जातात. एअर इंडिया आता टाटा कंपनीच्या हातात असल्यामुळे टाटा एअरबसला दुरुस्तीच्या कामासाठी नव्याने प्लांट उभारण्याची गरज उरणार नाही.  

६. इंधनाची सुविधा 

मिहानमध्ये भारत पेट्रोलियम कंपनीचे जेट फ्युल भरण्याची व्यवस्था आहे. मध्यवर्ती विमानतळ आणि ४ एरोस्पेस कंपन्या इथे असल्यामुळे इंधनाची व्यवस्था कायम सुरळीत ठेवण्यात येते. भारतात सर्वाधिक ४५ टक्के जेट फ्युल हे भारत पेट्रोलियमकडून विकले जाते. तसेच भारताच्या संरक्षण सेक्टरमधील विमानांना याच कंपनीमार्फत इंधन पुरवले जाते. त्यामुळे इंधनाच्या बाबतीत मिहान परिपूर्ण आहे.

तसेच हे मध्य भारतातील सगळ्यात मोठे विमानतळ असल्यामुळे इमर्जंसी इंधन भरण्यासाठी सुद्धा नागपूर विमानतळाचा वापर केला जातो.

७. नागपूरला यापूर्वी आलेल्या कंपन्या देखील मेन फॅक्ट ठरतो.

मिहानची निर्मिती करतांना एमआयओ प्लांट आणि जेट फ्युलसाठी एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम या दोन सरकारी कंपन्या तर इथे आलेल्याच होत्या. परंतु २०१३ मध्ये मॅक्स ऐरस्पेस आणि २०१७ मध्ये रफाईल विमान बनवणारी दसॉ-रिलायंस या कंपनी सुद्धा मिहानमध्ये आलेल्या आहेत.

सोबतच ब्राह्मोस मिसाईल्सचे उत्पादन सुद्धा नागपुरातच केले जाते. नागपुरात ब्रह्मोसचा प्लांट असल्यामुळे संरक्षण आणि गुप्तचर विभागाचे चांगले नेटवर्क इथे आहे. त्यामुळे संरक्षण साहित्य असलेल्या टाटा एअरबस प्रोजेक्टसाठी ही जागा उत्तम आहे. 

८. प्रोजेक्टसाठीच्या पायाभूत सुविधा लागतात त्या नागपूरला आहेत. 

विमान निर्मितीचा प्रोजेक्ट उभा करण्यासाठी आवश्यक असलेली जमीन, वीज, पाणी, उत्तम रस्ते, रोड आणि रेल्वेची कनेक्टिव्हीटी या सर्व सुविधा नागपूर मिहानमध्ये उपलब्ध आहेत. लवकरच सुरु होत असलेला समृद्धी महामार्ग, भारताची मध्यवर्ती मालवाहू रेल्वे, विजेसाठी जवळच औष्णिक प्रकल्प आणि पाण्यासाठी तोतलाडोह सारख्या मोठ्या धरणाची उपलब्धता नागपूरमध्ये आहे.

यासोबतच मिहानमध्ये सॉफ्टवेअर, फूड प्रोडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स आणि नागपूर एम्ससारखी हेल्थकेअर सुविधा सुद्धा इथे उपलब्ध आहे. 

मिहानमुळे नागपूर एक डिफेन्स आणि कार्गो हब म्हणून उदयाला आलेला आहे. महाराष्ट्र आणि  देशातील इतर शहरांच्या तुलनेत नागपूरमध्ये या सुविधा जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच राज्य सरकारकडून विदर्भातील गुंतवणुकीला विशेष सवलती दिल्या जातात त्यामुळे टाटा एअरबस प्रोजेक्टसाठी नागपूर हे अगदी उत्तम ठिकाण आहे. म्हणूनच या प्रोजेक्टसाठी महाराष्ट्रात आणायचं ठरलंच तर नागपूर हा एकमेव पर्याय बेस्ट ठरतो.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.