नागा साधुंचा लाडका, लाईटवाला “मुल्ला” .
शाळेत घेतली जाणारी प्रतिज्ञा, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. लहानपणी खूप गोष्टी मोठेपणी विसरल्या जातात. सारे भारतीय माझे बांधव आहेत हि त्यातलीच एक गोष्ट. धर्माच्या, जातीच्या नावावर आपल्यातले कित्येकजण आपआपले गट करुन राहतात. मग दंगली होता. सारेच मुस्लीम कसे वाईट असतात हे एकीकडे सांगितलं जातं. हिंदूचा द्वेष आणि लव्ह जिहादची भाषा दुसरीकडे शिकवली जाते.
पण या साऱ्यात सरळ साध आयुष्य जगणारी माणसं आपलं भारतीय असणं आपणाला शिकवून जातात.
हि गोष्ट,
नागा साधुंच्या लाडक्या असणाऱ्या लाईटवाल्या मुल्लांची.
लाईटवाले मुल्ला अर्थात उत्तरप्रदेशातल्या मुज्जफरनगरचे मोहम्मद महमूद. त्यांच वय आहे ७६ वर्ष. मुज्जफरनगरच्या एका भागात गेल्या चाळीस वर्षांपासून त्यांच इलेक्ट्रॉनिकच दुकान आहे. त्याच बरोबर घरामध्ये लागणाऱ्या लाईटफिटींगच काम देखील ते करतात.
सुमारे ३३ वर्षांपुर्वी त्यांची भेट एका नागा साधुसोबत झाली होती. धर्माचा कुठलाही आडपडदा न ठेवता दोघेजण पहिल्यांच भेटीत मनसोक्त बोलले होते. आपल्याला कुंभमेळ्या असणारं कुतूहल त्यांनी नागा साधूंना बोलून दाखवलं. हे ऐकून नागा साधूंनी त्यांना कुंभमेळ्याला घेवून जाण्याच वचन दिलं.
बोलल्याप्रमाणे नागा साधू त्यांना घेवून कुंभमेळ्यात घेवून गेले देखील. त्यांना पहिल्या भेटीतच नागा साधूंच्या सर्वात जुन्या समजल्या जाणाऱ्या जुना आखाडा मध्ये रहायला मिळाले.
मोहम्मद मोहमुद म्हणतात,
“पहिल्यांदा मी इथे आलो होतो तेव्हा अघोरी प्रकार पाहून भिती वाटली होती. पण प्रत्येक धर्माच्या परंपरा असतात. हळुहळु मी प्रत्येकाबरोबर बोलू लागलो. धर्माची कोणतीच अडचण न जपता प्रत्येकाने मला आपुलकीने वागवलं.”
या क्षणापासून त्यांचे आणि जुना आखाड्यातील साधूंचे मैत्रीचे संबध प्रस्थापित झाले. मोहम्मद मोहमुद यांनी लाईटफिटीगंचे काम येत असल्याने कुंभमेळ्याच्या दरम्यान जुना आखाड्यात लाईट लावण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांनी ती जबाबदारी घेतली आणि ती आजतागायत संभाळली देखील.
कुंभमेळ्यात जुना आखाडामध्ये सर्वात लाडक व्यक्तिमत्व कोण असेल तर ते लाईटवाले मुल्ला आहेत. त्यांना याच नावाने नागा साधू ओळखतात. ते देखील न चुकता दरवर्षी आपली जबाबदारी पार पाडतात. कुंभ मेळ्याच्या दरम्यान जुना आखाड्यामधे लाईटची संपुर्ण जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात येते. जिथे मुक्काम आहे त्या ठिकाणी जावून लाईट लावणं. आणि कुंभमेळा पार पडेपर्यन्त लाईट संबधीत असणारे सगळ्या गोष्टींची जबाबदारी संभाळण्याच काम त्यांच्यामार्फत केलं जातं.
हे ही वाचा.
- फिर भी दिल हैं हिंदुस्तानी..
- आदित्यनाथांच्या गुरूंचे गुरु, यांच्यामुळे रामजन्मभूमी आंदोलन सुरु झाले..
- अकबर बादशहा नसता तर आज इलाहाबादचं अस्तित्वच नसतं !