पुरात अडकलेल्या तरुणाला वाचविण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोणाचे होते शेवटपर्यंत कळालं नाही..
चार तरुण पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यावर मासेमारीसाठी गेले होते. मात्र अचानक नदीचे पाणी वाढल्याने यातील एक तरुण नदीतच अडकून पडला. तो पोहत जाऊन एका मोठा दगडावर जाऊन उभा राहिला. त्याला वाटले काही वेळात पाण्याची पातळी कमी होईल आणि आपली सुटका होईल. मात्र, तसे झाले नाही. शेवटी ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर एका व्यावसायिकांच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने त्याची सुटका करण्यात आली. मात्र शेवट पर्यत जिल्हा प्रशासनाच्या वतीने हे हेलिकॉप्टर कोणाचे होते हे गुलदस्तात ठेवण्यात आले होते.
ही घटना आहे १४ जुलै २००९ ची.
१९ वर्षीय विकास जगदाळे हा तरुण आपल्या तीन मित्रांसोबत दुपारच्या वेळी पवना नदी पत्रात मासेमारीसाठी गेला होता. त्यादिवशी पुणे परिसरात सकाळ पासूनचा मुसळधार पाऊस होता. त्यामुळे रावेत बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आले होते.
नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढल्याने विकास व त्याच्या मित्राचा गोंधळ उडाला. हिम्मत करत विकासचे तीन मित्र पुढे आले. मात्र विकास नदीच्या मध्यभागी अडकला. त्याला चारही बाजूने पाण्याने घेरले होते. नदीच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी ही गोष्ट अग्निशामक दलाला कळविली.
थोड्या वेळातच तिथे पिंपरी-चिंचवड अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी विकासचे तीन मित्र थोडे अलीकड असल्याने त्यांना लगेच बाहेर काढले. मात्र त्यांना विकास पर्यंत पोहचता आले नाही. विकास पर्यंत पोहचण्यासाठी अग्निशामक दलाचे तब्बल ३५ जवान प्रयत्न करत होते. मात्र ते होऊ शकले नव्हते.
त्यानंतर घटनास्थळी एनडीआरएफ पथकही तिथे आले. मात्र पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की, एनडीआरएफच्या बोटी पाण्यात सोडता येत नव्हत्या. एवढे सारे प्रयत्न केल्या नंतर प्रशासनाच्या लक्षात आले की हेलिकॉप्टरच्या मदतीशिवाय तरुणाला वाचवू शकत नाही.
मुख्यं म्हणजे या सगळ्या गोंधळात संध्याकाळ झाली होती. अंधार पडत चालला होता होता. त्यामुळे अशा प्रकारे बचावकार्य होईल ही नाही असे अनेकांना वाटू लागले होते. इकडे सर्व माध्यमांवर ही घटना लाइव्ह दाखविण्यात येत होते. यामुळे प्रशासनावर दबाव वाढत चालला होता.
तेव्हा पुण्याचे जिल्हाधिकारी होते चंद्रकांत दळवी. तरुणाला वाचविण्यासाठी काय करता येईल याचा अंदाज ते दुपारपासूनच घेत होते. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी लष्कराकडे मदत मागितली होती. लष्करी अधिकाऱ्यांनी चंद्रकांत दळवी यांनी कळविले की, आम्ही हेलिकॉप्टर वापराची परवानगी वरिष्ठांकडे मागितल्याचे सांगितले होते. तर इकडे अंधार वाढत चालला होता.
त्यामुळे जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी खासगी हेलिकॉप्टर माध्यमातून तरुणाला वाचविण्याचे ठरविले. साडेपाच दरम्यान एक हेलीकॉप्टर घटनास्थळी आले. अर्ध्यातासाच्या प्रयत्नानंतर विकास जगदाळेला नदीच्या प्रवाहातून बाहेर काढण्यात आले.
त्यावेळी विकासला वाचविण्यासाठी आलेले हेलीकॉप्टर हे लष्कराचे असल्याचे जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी माध्यमांना सांगितले होते. मात्र ते हेलिकॉप्टर हे लष्कराचे दिसत नव्हते असा प्रश्न उपस्थित केला होता.
नंतर काही दिवसा नंतर चंद्रकांत दळवी यांनी स्पष्टीकरण दिले की, नदीत अडकलेल्या तरुणाला वाचविण्यासाठी लष्कराकडे मदत मागितली होती. मात्र त्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे व्यासायायिक अविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टर वापरून तरुणाला बाहेर काढल्याचे दळवी यांनी सांगितले.
पुरात अडकलेल्या एखाद्याला वाचविण्यासाठी अशा प्रकारे खासगी हेलीकॉप्टरची मदत घेण्यात आल्याची ती पहिलीच वेळ असेल. सरकारी योजना कल्पकतेने मांडणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. चंद्रकांत दळवी पुढे जाऊन पुण्याचे विभागीय आयुक्त झाले होते. ते २०१८ मध्ये निवृत्त झाले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या फोटोग्राफीसाठी ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांनी आषाढी वारीची फोटोग्राफी करताना ज्या हेलिकॉप्टरचा उपयोग केला ते हेलिकॉप्टर देखील अविनाश भोसले यांच्या मालकीचं होतं. उद्धव ठाकरे यांनी पाहावा विठ्ठल या त्यांच्या पुस्तकामध्ये अविनाश भोसले यांचे आभारही मानले आहेत.
केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नाही तर राज्यातील इतर मोठे नेतेही अविनाश भोसले यांचे हेलीकॉप्टर वापरत असल्याचे सांगण्यात येते.
सध्या अविनाश भोसले हे अडचणीत सापडले आहेत. आता ईडीने अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची जागा जप्त केली आहे. याची किमत ४ कोटी असल्याचे सांगण्यात आले आहे. पुण्यातील सरकारी जागेवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केलं होतं.
यापूर्वी परकिय चलन गैरव्यवहार प्रकरणात बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, तसेच त्यांच्या कुटुंबीयांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली होती.
हे ही वाच भिडू
- अविनाश भोसलेंच्या श्रीमंत होण्याचे किस्से ऐकायला मिळाले नाहीत तर पुण्यात येणं व्यर्थ असतं
- इतिहासातली एक गोष्ट ज्यामुळे विश्वजीत कदमांनी कृष्णा कारखान्याची निवडणूक मनावर घेतलेय…
- राजाने आईचे दागिने गहाण ठेवले आणि राज्यातलं सर्वात मोठं धरण बांधून पूर्ण केलं..