मोहितेंनी फक्त २३ वर्षांच्या पोराला महामंडळावर घेतलं आणि त्याने गावोगावी एसटी पोहचवली..

महाराष्ट्र परिवहन महामंडळ म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी एसटी. ही लालपरी ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते. गाव तिथे रस्ता ,रस्ता तिथे एसटी हे महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे. पण तुम्हाला माहिती आहे का पण महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात एसटी नेली कोणी?

ते होते पतंगराव कदम 

पतंगराव कदमांचा सांगली जिल्ह्यातील सोनसळसारख्या दुष्काळी व काहीशा दुर्गम परिसरात एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्म झाला. गावात कोणतीही शिक्षणाची सोय नसल्यामुळे प्राथमिक शाळेत जाण्यासाठी ते दररोज पाच किलोमीटरची पायपीट करीत. त्यांनी कुंडल गावी वसतिगृहात मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्या गावातील ते पहिलेच मॅट्रिक.

कॉलेजचं शिक्षण पतंगरावांनी रयतमध्ये कमवा व शिका या योजने अंतर्गत घेतलं. चांगला मुलगा म्हणून यशवंतराव चव्हाणांच्या ते संपर्कात आले. पुढे पुण्यात आले. पुण्यात आले तेव्हा पतंगराव कदमांकडे भांडवल म्हणून मॅट्रिक पास आणि टिडी चं शिक्षण होतं. जून्या काळी शिक्षक होण्यासाठी टिडीची परिक्षा पास होण्याची आवश्यकता असायची.

याच भांडवलावर वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी सदाशिव पेठेत १० बाय १० च्या एका खोलीत भारती विद्यापीठाची स्थापना केली.

या संस्थेचे संस्थापक होते पतंगराव कदम. संस्थेत एक क्लार्क होता त्याच नाव पतंगराव कदम आणि संस्थेत एक शिपाई देखील होता त्याचं नाव देखील पतंगराव कदम. थोडक्यात काय तर वन मॅन आर्मी काम चालू होतं. सगळं काम पतंगराव स्वत: करायचे.

याच काळात पतंगराव कदमांचा संपर्क लोकनेते यशवंतराव मोहिते यांच्याशी आला. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची धडपड करणारा हा मेहनती हरहुन्नरी तरुण यशवंतरावांच्या नजरेत भरला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पतंगराव कदमांनी सामाजिक व राजकीय जीवनात पाऊल टाकलं.

यशवंतराव मोहिते यांना पतंगरावांनी आयुष्यभरासाठी आपला गुरु मानलं.

१९६८ मध्ये यशवंतराव मोहिते परिवहन मंत्री झाले. त्यांची इच्छा होती कि पतंगराव कदमांना एसटी महामंडळाचे संचालक बनवायचे. तेव्हा पतंगरावांचं वय फक्त २३ वर्षे इतकं होत. त्यांच्या नावावर वाद होऊ शकतो म्हणून यशवंतराव मोहितेंनी पक्षश्रेष्ठींची परवानगी घेण्याचं ठरवलं. त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते सांगलीचे लोकनेते वसंतदादा पाटील.

यशवंतराव मोहिते दादांना म्हणाले,

‘‘दादा, तुमच्या जिल्ह्यातील खानापूर तालुक्‍यातील हा तरुण मुलगा आहे. त्याला एस.टी. बोर्डावर घ्यायचा माझा विचार आहे. तुमची संमती हवी.’’

वसंतदादा म्हणाले,

‘‘भाऊ, तुम्ही म्हणताय मग तो नक्कीच चांगला मुलगा असणार.’’

सांगली जिल्ह्यातील असूनही वसंतदादांच्या पतंगराव कदमांशी कधी संपर्क आला नव्हता. त्यांनी त्यांची माहिती घेण्यासाठी खानापूरचे तत्कालीन काँग्रेसचे आमदार संपतराव माने यांना विचारले. त्यानंतर संपतरावनानांनी पतंगरावांची ओळख दादांना सांगितली. परंतु, दादांनी पतंगराव कदम यांची ओळख आपण का विचारत आहोत, याबाबत काहीही नानांना सांगितले नाही. दादांनी ते अचूक टाळले.

फक्त २३ वर्षे वयाच्या या तरुणाला यशवंतराव मोहितेंनी १ जुलै १९६८ रोजी एस. टी. महामंडळाचे संचालक केले.

त्याकाळात राज्यातले मोठमोठे दिग्गज नेते एसटीचे संचालक असायचे. त्यांना महामंडळाची इम्पाला गाडी दिली असायची. अशा या स्थानावर तरुण मुलाला संधी देणे म्हणजे अनेकांची भुवया उंचावल्या होत्या. पण यशवंतराव मोहिते आणि वसंतदादा पाटील यांच्या सारख्या नेत्यांच्या पाठिंब्याने या संधीचे सोने करीत पतंगरावांनी गाव तिथे एसटी सुरू केली. ग्रामीण व दुष्काळी भागातील हजारो तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. १९६८ ते १९७३ अशी पाच वर्षे ते संचालक राहिले.

एकेकाळी सोनसळ ते शेणोली असा पाच किलोमीटरचा प्रवास रोज पायी करून शिक्षण पूर्ण केलेल्या या तरुणाने आपल्याच गावात नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात एसटी नेली. वाहतुकीच साधन नाही म्हणून कोणाचं शिक्षण अडू नये हे स्वप्न त्यांनी पाहिलेलं. परिवहन मंत्री यशवंतराव मोहिते डोंगराप्रमाणे पाठीशी राहिल्यामुळे त्यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.