हिंदू, मुस्लिम,शीख एकता म्हणत त्याने काश्मिरसाठी प्राण सोडले, अन् तो धर्माने मुस्लिम होता… 

हिंदू, मुस्लिम, शीख इत्तिहाद… अर्थात हिंदू, मुस्लिम, शीख एकदा जिंदाबाद…!!!

७ नोव्हेंबर १९४२ चा दिवस.

या दिवशी काश्मिर खोऱ्यात मकबुल शेरवानीला येशू ख्रिस्ताप्रमाणे लाकडी क्रॉस करुन लटकवण्यात आलं. त्याला पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा द्यायला लावल्या. त्यांच्यावर बंदुका ताणण्यात आल्या. पण तो काय म्हणाला,

हिंदू मुस्लिम शीख इत्तिहाद.. म्हणजे एकता जिंदाबाद.. 

त्यानंतर एकामागून एक अशा चौदा गोळ्या त्यांच्या शरिरात मारण्यात आल्या. तो जागेवर संपला पण एक गोष्ट कायम करुन अन् ती म्हणजे हिंदू मुस्लिम शीख एकता जिंदाबाद…!!! 

ही गोष्ट आहे मकबूल शेरवानीची…

शेख अब्दुल्लांनी १९३९ साली आपल्या मुस्लीम कॉन्फरन्स या पक्षाचं रुपांतर नॅशनल कॉन्फरन्समध्ये केलं. मुस्लिमांसोबत हिंदू आणि शीख यांना घेवून पुढची राजकीय ध्येयधोरणं त्यांनी आखली. त्यावेळी काश्मिर खोऱ्यात एक घोषणा देखील प्रसिद्ध झाली होती. ती घोषणा होती, 

शेरे काश्मीर का क्या इरशाद? हिंदू मुस्लीम शीख इत्तिहाद..

पण दूसरीकडे बॅरिस्टर मोहम्मद अली जिना तत्कालीन भारताच्या प्रत्येक मुस्लीमबहुल भारतात द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडत होते. मुस्लीमांना स्वतंत्र राष्ट्र देण्याची मागणी होतं होती. अशीच एक सभा बारामुल्ला येथे आयोजित करण्यात आली होती. तेव्हा एका तरुणाने ही सभा उधळून लावली होती. त्या तरुणांच नाव मकबूल शेरवानी… 

हिंदू मुस्लीम शीख एकता हेच या तरुणांच स्वप्न होतं. पण दूसरीकडे राजकारणाने जोर पकडला होता. जिन्नांचा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांन्त गांधी-नेहरूंना मान्य करावा लागला होता. देशाची फाळणी होणार यात स्पष्टता आली होती. 

भारताची फाळणी झाली आणि काश्मिर खोऱ्यात युद्ध पेटलं.. 

भारत किंवा पाकिस्तानात सामिल न होता स्वतंत्र राहण्याचा निर्णय काश्मिरचा राजा हरिसिंग याने घेतला होता. 

तत्कालिन पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अलींनी काश्मिर ताब्यात घेण्यासाठी टोळधाडीची मोहिम आखली. पारंपारिक युद्धाचा मार्ग न स्विकारता पठाण कबाली टोळ्यांना शस्त्र आणि वहाने देवून काश्मिरवर आक्रमण करण्यास सांगितले. 

या टोळ्यांनी काश्मिरचा एक एक भाग काबीज करण्यास सुरवात केली. २२ ऑक्टोबर १९४७ रोजी कबाली सेनेनं डोमेल हे गाव जिंकल. त्यानंतर मुझ्झफराबाद हे ठिकाण टोळीच्या ताब्यात आलं. हे करत असताना स्थानिक मुस्लिमांनी देखील या टोळ्यांना मदत केली. पण टोळ्यांच्या ताब्यात आल्यानंतर सामान्य नागरिकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात आले. महिलांवर बलात्कार करण्यात आले. पाकिस्तानच्या ताब्यात जाण्याचा फोलपणा त्यांच्या लगेच लक्षात येवू लागला. 

या टोळधाडीला उत्तर देण्यासाठी मकबुल शेरवानीने नागरी रक्षक सेना तयार केली होती.

काहीही झालं तरी पाकिस्तानच्या या टोळीचा प्रतिकार करायचा हे त्यानं ठरवलं होतं. पण तोकड्या ताकदीवर या टोळधाडीला अडवणं शक्य नव्हतं तेव्हा भारताची मदत जोपर्यन्त मिळत नाही तोपर्यन्त या टोळधाडीला थांबवून ठेवण्याबाबतची उपाययोजना करण्यात आली. 

दूसरीकडे हरिसिंगाने भारतात विलिन होण्याच्या करारपत्रावर सही केली. भारतीय सैन्य श्रीनगरमध्ये पोहचू लागलं. पण तात्काळ प्रतिकार करण्यासाठी भारतीय सैन्याला अजून दोन दिवसांचा अवधी लागणार होता. दोन दिवसांसाठी हि टोळधाड रोखून धरण्याची जबाबदारी मकबुल शेरवानीने आपल्या अंगावर घेतली. 

त्याने कबाली सेनेचा प्रमुख असणाऱ्या खुर्शिद अन्वरचा विश्वास संपादन केला. आपण पाकिस्तानधार्जिणी आहोत अस सांगून त्याला विश्वासात घेतलं व भारतीय सेने पट्टण जवळ पोहचली असल्याची माहिती दिली. 

भारतीय सैना इतक्या जवळ आल्याचं पाहून खुर्शिदने आपला प्लॅन बदलला. पाकिस्तानकडून अजून पुरवठा घेवूनच पुढे चाल करण्याचा निर्णय त्याने घेतला व तो आहे तिथेच थांबला. अशातच दोन दिवस गेले. 

दोन दिवसानंतर खुर्शिदला समजलं की त्याला कमबुल शेरवानीने साफ फसवलं आहे. हे समजल्यानंतर मकबूलला पकडण्यात आलं. खुर्शिदच्या हातातून काश्मिर गेल्याचं दुख त्याला झालं. खुर्शिदने लाकडी क्रॉसवर त्याला लटकवून एका मागून एक चौदा गोळ्या झाडल्या. मृत्यूपूर्वी त्याला पाकीस्तान जिंदाबादचे नारे म्हणायला लावले पण त्याने अखेरपर्यन्त हिंदू मुस्लीम शीख इत्तिहादचाच नारा दिला…

त्याचं रात्री भारतीय सेनेनं बारामुल्लाचा भाग टोळ्यांच्या हातून सोडवला. ज्या दुपारी कमबुल शेरवानीला मारण्यात आलं त्याचं रात्री भारतीय सैन्याच्या ताब्यात हा प्रदेश आला. मकबुलमुळे टोळ्या श्रीनगरपर्यन्त पोहचू शकल्या नाहीत. 

भारतीय सेन्याने देखील मकबूलच्या नावाने ममोरियल हॉल बांधला. तर वर्षी ७ नोव्हेंबरला त्याच्या बलिदानादिवशी पुष्पचक्र वाहिलं जातं.  

एकतेसाठी आपल्या जिवाचा बलिदान देणारा एक काश्मिरी मुस्लीम देखील होता हेच इतिहासत कोरलं गेलं. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.