दरवेळी विरोधक कंबर कसतात आणि दरवेळी जयंत पाटील हिशोब चुकता करतात..

प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पुणे पदवीधरच्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या अरुण लाड यांनी एकहाती बाजी मारत विजय मिळवला. पण मुळात ही निवडणूक अरुण लाड यांच्यासाठी प्रतिष्ठेची नव्हतीच. इथे प्रतिष्ठा लागलेली ती जयंत पाटलांची.

निवडणूकीपूर्वी एकमेकांवर शेलक्या टिका करण्यात आल्या. भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी तर जयंत पाटील हे तालुक्याचे नेते म्हणून मर्यादित राहिले असते अशी टिका केली. पण जयंत पाटलांसाठी ही पहिली वेळ नव्हती.

जयंत पाटील हिशोबाला किती पक्के आहेत हे सांगण्यासाठीच हा लेख. 

२००९ च्या त्या महाराष्ट्र विधानसभेच्या इलेक्शन होत्या. जयंत पाटलांना अस्मान दाखवायचं म्हणून विरोधकांनी कंबर कसलेली.  वैभव नायकवडी रोड रोलर घेवूनच मैदानात उतरलेलं. शिट धोक्यात वाटत्या म्हणून गावागावात पैजा लागायला चालू झालत्या.

मुळात जयंत पाटलांच्या विरोधात पैजा लागणंच टेन्शन वाढवणारी गोष्ट होती. अशात राजू शेट्टी नावाचं वादळ नव्यानं धूरळा उडवत होतं. राजू शेट्टींनी वैभव नायकवडींच्यासाठी सभा घेतली. शेट्टींनी वैभव नायकवडींचा हात हातात घेतलां आणि गर्जना केली,

“ह्या दाढ्याचं प्रस्थापितांच थडगं बांधल्याशिवाय राहणार नाहीत..”

निकालं लागलां. नेहमीप्रमाणे जयंत पाटील निवडून आले.

त्यानंतर पुलाखालनं बरच पाणी गेलं. आत्ता राजू शेट्टी आणि जयंत पाटील एका गाडीतून फिरतात. एक काळ होता जेव्हा जयंत पाटलांच्या विरोधात राजू शेट्टींनी राज्याचं वातावरण तापवलं होतं. पण आत्ता तस नाही..

असाच दूसरा इतिहास राजारामबापू पाटील आणि वसंतदादांच्या स्पर्धेचा..

राजारामबापू आणि वसंतदादा हा वाद पुर्ण महाराष्ट्राच्या परिचयाचा. या वादातून राजारामबापूंच्या विरोधात सर्वसामान्य समजल्या जाणाऱ्या विलासराव शिंदेना ताकद देण्याचं काम वसंतदादांनी केलं. राजारामबापू निवडणूकीत पडले. राजारामबापू म्हणजे जयंत पाटलांचे वडील.

एका पिढीनंतर जयंत पाटील हे माननीय जयंत पाटील झाले होते. पतंगराव आणि आर.आर आबा यांच्या राजकारणात स्वत:च नाणं खणखणीत वाजवाय सुरवात झाली होती. पण या सगळ्यात कुठतरी बापाच्या पराभवाचा वचपा काढायचं शिल्लक राहिलं असावं.

जयंत पाटलांनी सांगली महानगर पालिकेत लक्ष घातलं. स्वत: चौकाचौकात खुर्च्या टाकून सभा घ्यायला सुरवात केली. आणि सांगली महानगर पालिका दादा घराण्याच्या ताब्यातून हिसकावून घेतली.

एकेकाळचां हिशोब जयंत पाटलांनी जिल्ह्याचा नेता होवूनच पुर्ण केला.

राजकारणाचा हिशोब जयंत पाटलांना चांगला जमतो पण प्रशासनाचा हिशोब पण या माणसानं तितक्याचं ताकदिनं पेललां आहे.

संपुर्ण महाराष्ट्राच्या हे लक्षात आलं ते जयंत पाटलांनी व्हिलचेअरवर बसून अर्थसंकल्प मांडला तेव्हा. २००१ सालच्या सुरवातील जयंत पाटील तिरूपतीला गेले होते. तसे ते सत्यसाईबाबांचे भक्त. सत्यसाईबाबा आणि बालाजी असं एकत्रित दर्शन घेवून जयंत पाटलांची गाडी महाराष्ट्राच्या दिशेनं येवू लागली.

तोच पुटपुर्थीच्या दरम्यान जयंत पाटलांचा ॲक्सीडेंट झाला. जीवावर आलेल्या या धक्यातून जयंत पाटील बचावले पण गावागावात अफवांनी जोर पकडला. ॲक्सीडेंट देखील तसाच होता. याच काळात त्यांना अर्थमंत्री म्हणून विधानसभेत अर्थसंकल्प सादर करायचा होता.

गंभीर असणाऱ्या जयंत पाटलांनी हा हिशोब देखील पाठीमागं ठेवला नाही. ते व्हिलचेअरवरुन मंत्रालयात आले आणि अर्थसंकल्प जाहिर केला…

जयंत पाटील कोणाचा हिशोब मागे सोडत नाहीत अशी म्हण स्थानिक पातळीवर बोलली जाते. जेव्हा इस्लामपूरच्या एका मित्राला पदवीधर इलेक्शनबाबतीत फोन केला तेव्हा तो म्हणाला होता,

टप्यात येवूदे की, मग बघ…

आज अरुण लाड यांच्या विजयामुळे चंद्रकांत पाटलांचा हिशोब देखील जयंत पाटलांनी चुकता केला.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.