गोपीचंद पडळकरांनी खरच मंगळसूत्र चोरल होतं का..? 

मंगळसुत्र चोरल्याचा आरोप आपल्यावर झाला होता तेव्हा जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. ते कसं चाललं. आता मात्र माणसं जरा नोटीस आली की रडतात. 

गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर टिका करताना जून्या घटनेचा संदर्भ दिला.

पडळकरांवर मंगळसुत्र चोरीचा आरोप झाला होता व त्यावरून त्यांना तुरूंगात जाव लागलं होतं. शिखर बॅंकेतल्या कथित घोटाळ्याच्या आरोपावरुन अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांना अश्रू अनावर झाले. दूसऱ्या बाजूला गोपीचंद पडळकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गोपीचंद पडळकर यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांनी बारामतीतून उभा राहण्याची इच्छा व्यक्त केली.  पडळकरांनी देखील लागलीच अजित पवारांवर टिका करताना वरील घटनेचा संदर्भ देत टिका केली. 

हा झाला कालचा मुद्दा पण मुख्य प्रश्न उरतो तो म्हणजे पडळकरांनी खरच मंगळसूत्र चोरलं होतं का? त्यांना त्यावरून अटक करण्यात आली होती का? 

बोलभिडूवर खरं काय ते सांगा असे प्रश्न विचारण्यास सुरवात झाल्यानंतर बोलभिडू कार्यकर्त्यांनी ठरवलं की या घटनेच्या खोलात जायचं. स्थानिक नागरीक, पत्रकार यांना विचारायचं. खानापूर आटपाडी परिसरातील स्थानिक नागरीक, पत्रकार आणि समर्थक व विरोधक यांना विचारल्यानंतर जी माहिती समोर आली ती तुमच्यासमोर. 

लोक सांगतात ही घटना आहे २००८-२००९ ची. 

आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघात पडळकरांनी गट बांधण्यास सुरवात केली होती. या दरम्यानच्या काळात विरोधात असणारा गट आणि त्यांच्यात छोटेमोठे वादविवाद होत असत. त्यातूनच झालेल्या एका भांडणात त्यांच्यावर मंगळसूत्र चोरीची केस टाकण्यात आल्याच सांगण्यात येत. अधिक तपशीलात गेल्यानंतर गटातटाच्या भांडणाचा यात संबध नसल्याची माहिती देण्यात आली.

आटपाडी येथील हरीभाऊ पाटील यांनी सांगितल की,

तेव्हा पडळकर यांची हवा होत होती. गावागावातले तरुण पडळकरांच्या मागे उभा राहू लागलेले. अशातच एका लग्नसमारंभात गोपीचंद पडळकर आपल्या तरुण कार्यकर्त्यांसोबत गेले होते. तिथे विरोधी गटातील काही लोक देखील आले होते. स्टेजवर जात असताना धक्काबुक्कीच निमित्त झालं आणि दोन्ही गट एकमेकास भिडले. अशा वेळी लग्नसमारंभात उपस्थित असणाऱ्या काही महिला देखील मध्ये आल्या. भांडणामध्ये त्यांना देखील धक्काबुक्की झाली.

याच गोष्टीचा फायदा घेवून पडळकरांवर मारामारी, भांडणे याचसोबत मंगळसूत्र चोरीचे कलम देखील लावण्यात आले. बऱ्याचदा आरोप म्हणून कोणताही आरोप नेत्यांवर लावला जातो. तसेच या घटनेच स्वरुप होतं. त्याहून अधिक काहीच नाही. 

या प्रकरणात किरकोळ कारवाई सोडता पडळकरांवर कोणतीच ठोस अशी कारवाई झाली नव्हती. या घटनेनंतर टेंभू योजनेच्या पाण्याच्या संदर्भातून विरोधक उपोषणाला बसणार होते. मात्र उपोषण करुन थोडीच पाणी मिळत अशी भूमिका घेवून गोपीचंद पडळकर व त्यांच्या समर्थकांनी करवडी येथील टेंभूच्या कार्यालयावर हल्लाबोल केला होता. त्यामध्ये शासकिय कामात अडथळा आणणे, शासकिय कर्मचाऱ्यांना धमकावणे याबद्दल त्यांना तुरूंगात रहाव लागलं होतं.

थोडक्यात काय तर समर्थक असोत वा विरोधक गोपीचंद पडळकर यांच्यावर व्यक्तिगत भांडणाचा आकस घेवून मंगळसुत्र चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याच लोक सांगतात. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.