त्या एका पत्रामुळे मराठी भाषेला एक नवा शब्द मिळाला, ” महापौर “
या स्टोरीमागे आहेत गणपत महादेव नलावडे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सहकारी आणि हिंदुमहासभेचे वरिष्ठ नेते.
गणपतराव नलावडे यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी पुणे होती. त्यांच्या वडिलांचा तंबाखूचा कारखाना होता. तो बंद करून वडील पुढे शेती करू लागले. गणपतराव मॅट्रिकपर्यंतच शिकले. त्यांनी सन १९२२मध्ये एक छापखाना काढला. त्या छापखान्यातून ते ‘संग्राम’ नावाचे साप्ताहिक छापून प्रसिद्ध करीत.
नलावडे यांना धंद्यापेक्षा समाजकार्यात मोठा रस होता. याचमुळे काही वर्षांनी ते साप्ताहिक बंद पडले. हिंदुत्ववादी विचारांच्या नलावडे यांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याकडे आकर्षण निर्माण झाले. १९२८ ते १९५४ या काळात गणपतराव आधी पुणे नगरपालिकेचे, आणि १९५० साली महानगरपालिका झाल्यावर तिचे सदस्य बनले. हिंदू महासभा स्थापन झाल्यावर त्याचे कार्य राज्यपातळीवर नेण्यात पुण्याच्या गणपत नलावडे यांचा सिंहाचा वाटा आहे.
१९४२ साली ते नगरपालिकेचे चेअरमन झाले, व कालांतराने पुणे महापालिकेचे मेयर.
पुण्याचा मेयर म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली. तेव्हाचा एक प्रसंग सांगितला जातो. असं म्हणतात कि गणपतराव नलावडे यांनी सावरकरांना या विजयाची बातमी पाठवली तेव्हा सावरकरांनी लगेच अभिनंदनाचे पत्र पाठवले नाही.
गणपतरावांना आश्चर्य वाटलं. एके संध्याकाळी ते पुण्याच्या मेयर बंगल्यात अस्वस्थपणे कशाची तरी वाट पाहत होते. अचानक शिपायाने वर्दी दिली. रत्नागिरी हुन कोणीतरी जगताप म्हणून माणूस आला आहे. त्याने एक चिठ्ठी आणली आहे. खुश झालेल्या गणपतराव नलावडे यांनी गडबडीत ती चिठ्ठी फोडून पाहिली.
“प्रति श्री. गणपत महादेव नलावडे यांस, सप्रेम नमस्कार. पुण्याची धुरा आता समर्थ हातांत आलीये म्हणायची! तुम्ही ही नवस्वीकृत भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडालच, यात मला किंचितही शंका वाटत नाही. तुम्हाला या जबाबदारीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
मात्र माझे घोडे या ‘मेयर’ शब्दाच्या तटावर अडले होते. त्यासाठी पर्यायी शब्द काही सुचत नव्हता आणि तुम्हाला ‘मेयर’ म्हणून शुभेच्छा देणे मनाला पटत नव्हते. आता काहीच सुचणार नाही, असे वाटत असतानाच एक शब्द स्फुरला — महापौर!”
हे पत्र लिहिलं होत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी.
“महापौर”
गणपतराव नलावडे १९६४ साली महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेवर निवडून गेले. मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बॅंकेचे ते ४४ वर्षे चेअरमन होते आणि एकूण सहा वेळा बॅंकेचे अध्यक्ष झाले. ते १९५४ ते १९६२ या कालावधीत महाराष्ट्र प्रांतिक हिंदुमहासभेचे नेते होते. गांधींची हत्या झाल्यावर गणपतराव नलावडे यांचा छापखाना राजकीय गुंडांनी १९४८ साली जाळला. गांधीहत्येत सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांना १९४८मध्ये आणि १९५०मध्ये असा दोन वेळा चारचार महिने तुरुंगवास भोगावा लागला.
हे ही वाच भिडू.