चक्रीवादळांनाही नावं असत्यात, पण ते ठेवतं कोण…..? येणाऱ्या चक्रीवादळाचंही नाव ठरलंय…
सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं चक्रीवादळ तयार झालं असून या वादळाची तीव्रता आणि धोका वाढतोय. मंदौस चक्रीवादळानं भारतातील दक्षिणेकडच्या राज्यात थैमान घातल्याचं वृत्त आहे. सध्या या चक्रीवादळाचा फटका तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यांना बसतोय.
या राज्यांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर आणखी वाढू शकतो असा अंदाज असल्यानं बऱ्याच ठिकाणी शाळांना सुट्टी दिली गेलीय. आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोट्टापासून काही अंतरावर चक्रीवादळ जमिनीवर शिरेल असा अंदाज वर्तवला गेलाय.
चेन्नईमध्ये बचावकार्यासाठी एनडीआरएफ सज्ज:
चेन्नई शहरापासून हे चक्रीवादळ दक्षिण-पूर्व दिशेला सुमारे १५० किलोमीटर अंतरावर आहे. सतर्कता म्हणून चेन्नईतील शाळांना सुट्टी जाहीर केली असून कॉलेज आणि युनिव्हर्सिटीच्या परिक्षांना थोडा काळ स्थगिती दिली आहे.
चेन्नईमध्ये हे चक्रीवादळ शिरल्यास मोठं नुकसान होऊ शकतं हे लक्षात घेऊन एनडीआरएफ आणि राज्य सुरक्षा दलाचे एकूण ४०० कर्मचारी तैनात करण्यात आलेत. याशिवाय १६,००० पोलिस कर्मचाऱ्यांसह १,५०० होमगार्ड्सही तैनात आहेत.
आता या चक्रीवादळाला मंदौस हे नाव कसं मिळालं हे समजून घेण्यासाठी मुळात चक्रीवादळांना नावं देण्याची पद्धत नेमकी काय असते आणि ती कशी सुरू झाली ते पाहुया…
चक्रीवादळांचं नाव कश्याप्रकारे ठरवलं जातं?
तर चक्रीवादळांना नावं देण्याची प्रथा ही १९५३ साली सुरू झाली. अमेरिकेतल्या मायामी इथं असलेल्या नॅशनल हरिकेन सेंटर ॲण्ड वर्ल्ड मेटिरिओलॉटिकल ॲार्गनायझेशन या संस्थेनं वादळ आणि चक्रीवादळांना नावं द्यायला सुरूवात केली. ही संस्था संयुक्त राष्ट्रांची एजन्सी आहे.
ही संस्था युरोपकडील चक्रीवादळांना नावं द्यायची पण, हिंदी महासागरात मुळातच कमी चक्रीवादळं येतात. त्यामुळे, ही संस्था सुरूवातीच्या काळात आपल्याकडच्या वादळांना नावं द्यायचीच नाही. आता नावं न दिल्यामुळे व्हायचं असं की, इतिहासात या वादळांची नोंद ठेवणं कठीण व्हायचं. त्यामुळे हिंदी महासागरातल्या चक्रीवादळांनाही नावं ठेवणं गरजेचं आहे हे लक्षात आलं.
आपल्याकडच्या चक्रीवादळांना नावं देण्याची पद्धत:
मग, २००४ साली संयुक्त राष्टांच्या त्या एजन्सीनं नावं ठेवण्याची पद्धत बंद करण्यात आली आणि ज्या देशाजवळ किंवा देशामध्ये वादळ येईल त्या देशानेच नाव ठरवायचं असं ठरलं. हे ठरल्यानंतर मग हिंदी महासागराशी संबंधित असलेल्या भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, म्यानमार, मालदीव, ओमान आणि थायलँड या ८ देशांनी एकत्र येऊन ६४ नावं ठरवली.
२०१८ मध्ये या ८ देशांच्या यादीमध्ये इराण, कतार, सौदी अरेबिया, यूएई ही पाच नावं जोडली गेली. आता एकूण १३ देशांनी मिळून ठरवलेल्या नावांपैकी एक नाव हे या चक्रीवादळांना दिलं जातं. त्याची पद्धत अशी असते की, या यादीतील प्रत्येक देशानं काही नावं ठरवून द्यायची असतात. त्यातील निवडक नावांची मग यादी तयार केली जाते आणि मग त्यातील नावं एक एक करून चक्रीवादळांना दिली जातात.
२०२० साली भारताने १६९ नावांची यादी दिली होती. त्यापैकी १३ नावं ही फायनल यादीसाठी निवडली गेली.
नाव निवडण्याची पद्धत काय असते?
सर्व देशांची नावं ही अल्फाबेटीकली लावली जातात या देशांनी दिलेलं एक-एक नाव मग येणाऱ्या चक्रीवादळांना दिलं जातं. अल्फाबेटीकली पहिलं येणाऱ्या देशानं सुचवलेलं पहिलं नाव हे सर्वात आधी त्यानंतर अल्फाबेटीकली दुसरा येणाऱ्या देशानं सुचवलेलं पहिलं नाव अश्या प्रकारे नावं ठरवली जातात.
याच पद्धतीचा वापर करून भारतातील दक्षिणेकडील राज्यांना धडकत असलेल्या या चक्रीवादळाला युएईने दिलेलं ‘मंदौस’ हे नाव देण्यात आलंय.
मंदौस हा शब्द मुळात अरबी भाषेतला आहे. अरबी भाषेत मंदौस या शब्दाचा अर्थ खजिन्याची पेटी असा आहे. आता मंदौस हे नाव संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएई ने ठेवलं होतं. आता हे नाव काही चक्रीवादळ आल्यानंतर ठरवलं जात नसतं. मग, हे नाव नेमकं कोण ठरवतं? आणि कधी ठरवलं जातं?
आता यानंतर येणाऱ्या चक्रीवादळाचं नाव हे थायलंडने दिलेलं ‘सितरंग’ असणार आहे.
हे ही वाच भिडू:
चक्रीवादळ आलं आणि हसतं खेळतं धनुषकोडी भुतांचं गाव बनलं…
भारताला एक राष्ट्रपती चक्रीवादळामुळे मिळाले आहेत