मध्यरात्री ३ वाजता सोनू निगम अजय अतुलच्या स्टुडिओबाहेर गाण्याची रिहर्सल करत होता…..

अजय अतुल ही जोडगोळी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आपली वाटणारी जोडी. अजय अतुलची गाणी म्हणजे एकाचवेळी तुम्हाला नाचायला सुद्धा लावतात आणि भान हरपून गाणी ऐकायला सुद्धा लावतात. बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त डिमांड ही अजय अतुल या संगीतकार जोडीला आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी अजय अतुलची आहेत त्यापैकीच एक गाणं होतं अभि मुझमें कही…. हे गाणं आजही you tube वर टॉप हिट्स मध्ये येतं. याच गाण्याच्या निर्मितीचा हा किस्सा.

अग्निपथ हा सिनेमा अजय अतुलला मिळाला.या सिनेमातली सगळीच गाणी वाजली, देवा श्रीगणेशा,गुनगुन गुना रे ही त्यापैकीच होती. अभि मुझमे कही हे गाणं ज्यावेळी तयार होत होतं तेव्हा हे गाणं अजय अतुलने अगोदर दोन गायकांकडून गाऊन घेतलं होतं पण त्यात तो भाव आणि प्रसन्न वाटेल असा आवाज नव्हता.

मग यावर विचार सुरू झाला की हे गाणं कोण गाणार. अजय गोगावले यांचा पर्याय होता पण अजून काहीतरी स्ट्रॉंग आवाज या जोडीला हवा होता. मग त्यांना कळलं की बॉलिवूडमध्ये एकच असा आवाज आहे जो सर्वांचा फेवरेट तर आहेच शिवाय त्याचा आवाजही प्रसन्न आहे. मग अजय अतुलने सोनू निगम यांना निरोप पाठवला की ए गाणं तुम्ही गायचं आहे.

सोनू निगम स्टुडिओला आले. अजय अतुलने त्यांना गाण्याचं स्वरूप चाल वैगरे सांगितली. गाण्याची एक डबिंग झाली पण सोनू निगमचा आवाज बरोबर लागत नव्हता. त्यामुळे सोनू निगम रेकॉर्डिंग सोडून गेले. त्यामुळे अजय अतुल इतर गाण्याच्या स्ट्रिंग्स रेकॉर्ड करत बसले. दिवसभर म्युझिक ऐकून तेही थकले होते.

मध्यरात्री अतुलला फोन आला तो सोनू निगमचा की आता आवाज लागतोय. आणि सोनू निगम गाणं ऐकून दाखवायला लागला म्हणाला की आपण आत्ता रेकॉर्डिंग करूया. इकडं अजय अतुल चकित झाले सोबतच चिंतेत पडले कारण दिवसभर गाणी आणि रिदम करून त्यांचा कान बसला होता. गाणी चालू असताना अतुलच्या मोबाईलवर सोनू निगम फोन करत होता पण अतुल कॉल रिसिव्ह करत नव्हता. कारण इतक्या रात्री रेकॉर्डिंग करणं शक्य नव्हतं. म्हणून ते सोनू निगमला टाळत होते. तीन चार मिसकॉल सोनू निगमचे येऊन गेले होते.

अचानक मध्यरात्री 3 वाजता यशराज स्टुडिओचा दरवाजा उघडला तेव्हा बाहेर कोणीतरी हेच गाणं गात होतं. अजय अतुल आश्चर्याने बाहेर जाऊन बघताय तर सोनू निगम डायरेक्ट स्टुडिओला येऊन पोहचला होता आणि बाहेर तो याच गाण्याचा रियाज करत होता. पुढे हे गाणं रेकॉर्ड झालं आणि कायमचं हिट झालं.

सोनू निगम आणि अजय अतुल या लोकांनी बॉलीवूडला एक अजरामर गाणं दिलं ते म्हणजे अभि मुझमे कही…..अनेक अवॉर्ड या गाण्याला मिळाले आणि सोबतच अजय अतुल हे नाव बॉलिवूडमध्ये अजुनच ठळकपणे लोकांसमोर आलं. आज घडीला बॉलिवूडचे बहुतांशी सिनेमे अजय अतुलने संगीतबद्ध केले आहेत आणि त्यातली सगळीच गाणी तुफ्फान हिट झालेली आहेत.

अभि मुझमे कही हे गाणं you tube ला जाऊन बघा आणि खालच्या कमेंट वाचा यामध्येच अजय अतुल या जोडीने लोकांच्या काळजाला हात घातल्याचं दिसून येतं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.