पायी वारी रद्द झाल्यामुळे शासनाच्या महसूलाबरोबरच अनेकांचा रोजगारही बुडणार आहे…

जून महिन्यात एकीकडे बळीराजा पेरणीची तयारी करत असतांना दुसरीकडे गावोगावचे वारकरी आषाढी वारीसाठी आळंदीत दाखल होत असतात. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढी पायी वारी रद्द करण्यात आली आहे. केवळ मानाच्या १० पालख्याचं उपस्थितीत संतांच्या पादुका एसटीने पंढरपूरला पाठविण्यात येणार आहे.

यावेळी वारकऱ्यांच्या सर्व प्रथा-परंपरा जपल्या जाव्यात यासाठी शेवटच्या दीड किलोमीटरचे वाखरीपासूनचे अंतर मानाच्या पालख्यांना पायी जाण्यासाठी प्रशासनाने परवानगी देण्यात आली आहे.

पण तरीही कोरोनामुळे महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांना यंदा आषाढी पायी वारीला मुकावे लागणार असल्याची चिन्हे आहेत. उन्ह- पाऊस याची तमा न बाळगता शेकडो वर्षापासून नित्यनियमाने वारकरी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत असतात.

लाखो वारकरी एकाच वेळी पायी चालत असल्याने वारीची एक अर्थव्यवस्था तयार झाली आहे. जी वारी दरम्यान समांतर सुरु असते. पायी वारी रद्द झाल्याने या अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिमाण होणार आहे. याचा बोल भिडूने घेतलेला आढावा.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या दोन वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरच्या दिशेने जातात. यात लहान-मोठ्या १५० दिंड्याच्या माध्यामतून १० लाखांपेक्षा जास्त वारकरी सहभागी होत असतात. हे वारकरी आळंदी, देहू, पैठण, मुक्ताईनगर येथून पंढरपूरसाठी पायी वारी करतात.

महाराष्ट्राच्या कान्याकोपाऱ्यातून लाखो वारकरी पायी वारी साठी आळंदीत दाखल होतात. यासाठी आपल्या गावातून बस, रेल्वे, जीपच्या माध्यामतून येत असतात.

बस

२०१८ सालचा विचार केला त्यावेळी राज्यभरातून आषाढी वारीसाठी पंढपूरला एसटी महामंडळाच्या वतीने  ३ हजार ७८१ बस सोडण्यात आल्या होत्या. तसेच वारी सुरु होण्यापूर्वी राज्यभरातून पुण्यासाठी हजारो विशेष बस सोडण्यात येतात. पुण्यावरून मग हे वारकरी पीएमपीच्या माध्यामतून आळंदीला जातात.

वारी रद्द झाल्याने एसटी महामंडळाला करोडो रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे.

त्याच वर्षी रेल्वेच्या वतीने ७२ विशेष रेल्वे पंढरपूरसाठी राज्यभरातून पाठविण्यात आल्या होत्या. या सर्व रेल्वेचे रिजर्वेशन फुल्ल झाले होते.

खासगी वाहने

महाराष्ट्र राज्य वाहन मालक चालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी बोल भिडूशी बोलतांना सागितले की, दरवर्षी ३०० ट्रक आणि एक ते दीड हजार खासगी बस वारी निम्मित पंढरपूरला जात असतात. वारी रद्द झाल्याने राज्यातील या सर्व वाहन मालकांचे १० कोटींन पेक्षा जास्त नुकसान झाले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

किराणा दुकान

पायी वारीत कुटुंबाच्या कुटुंब सहभागी होत असतात. आळंदी ते पंढरपूर असा १८ ते १९ दिवस हे चालत असतात. एकाच वेळी सर्व वस्तू सोबत घेवून प्रवास करणे शक्य नसते. त्यामुळे दोन ते तीन दिंड्या मागे एक किराणा दुकान असते. वारकरी रोजच्या लागणाऱ्या सर्व गोष्टी या दुकानांमधून घेत असतात. वारी रद्द झाल्याने या सर्व दुकानदारांचे आर्थिक नुकसान होणार आहे.

मुक्कामाच्या ठिकाणी यात्रा

ज्ञानेश्वर माऊली पालखीचा विचार केल्यास वारी दरम्यान १५ ठिकठिकाणी मुक्काम होते. सासवड सारख्या ठिकाणी २ दिवस पालखी मुक्कामाला असते. या प्रत्येक ठिकाणी यात्रा भरते. मुक्कामच्या ठिकाणी पालखीच्या आजूबाजूंच्या ५० गावाचे लोक येतात. त्याठिकाणी मोठ्ठी यात्रा भरते.

वारी रद्द झाल्याने यात्रेत लहान-मोठे दुकान लावून मिळणाऱ्या फायद्याला मुकावे लागणारे आहे.

जेवण बनविणाऱ्या १५ हजार लोकांचा रोजगार हिरावला

साधारण १५० लहान- मोठ्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने वेगवेगळ्या मार्गाने येतात. प्रत्येक दिंडी सोबत एक आचारी, जेवण बनविणारी ८ ते १० जण आणि तंबू ठोकणारे ३ ते चार जण सोबत असतात. हे लोक पगारी असतात आणि त्यांचा उदरनिर्वाह हा या कामातून चालतो.

१ हजार वारकऱ्यांचा जेवण बनवायला १० ते १२ जण तरी लागतात. जेवण बनविणारी १५ हजार सोबत असतात.

वारी रद्द झाल्याने या सर्व कामगारांचा रोजगार हिरावला जाणार आहे.

वर सांगितल्या प्रमाणे साधारण १०  हजार खासगी वाहने वारीत सहभागी होतात. त्यावर असणारे ड्रायव्हर यांचे पोट पाणी वारीवर अवलंबून असते.  खासगी वाहनावरील ड्रायव्हरला  पगार व्यतिरिक्त  भत्ता देण्यात येतो यातून त्यांना चांगले पैसे मिळत असतात. मात्र गेल्या २ वर्षापासून वारी रद्द होत असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे ड्रायव्हर कबीर चव्हाण याने सांगितले.

वारीचे अभ्यासक सचिन पवार यांनी बोल भिडूशी बोलतांना म्हणाले की, वारीच्या माध्यामतून वारकरी दरवर्षी शासनाला प्रत्यक्ष कोट्यावधीचा महसूल देतो. वारी रद्द झाल्याने हा महसूल शासनाला मिळणार अन्ही. वारीत १० लाखांपेक्षा जास्त वारकरी सहभागी होत असतात. त्यांच्या माध्यमातून एक समांतर अर्थव्यवस्था चालत असते.

वारकऱ्यांच्या दिंड्याला एक चालक असतो. दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या जेवण, नाश्ता आणि राहण्यासाठी १ ते दीड हजारांची भिसी घेतली जाते. यातून सुद्धा मोठे पैसे बाजारात येतात. वारी रद्द झाल्याने लहान मोठ्या सर्वच घटकांना आर्थिक फटका बसणार असल्याचे सचिन पवार यांनी सांगितले. 

फोटो क्रेडिट- अप्पा चंदा चौगुले जयसिंगपूर 

Leave A Reply

Your email address will not be published.