संपूर्ण जगाला टेन्शन दिलेला प्रश्न TCS ने सोडवला आणि भारताच्या सॉफ्टवेअर क्रांतीला सुरवात झाली…
1995 – 96 चा तो काळ. सॉफ्टवेअर उद्योगात भारताची जागतिक उलाढाल विलक्षण वेगाने वाढत होती. 1985 मध्ये लाखाची भाषा बोलणारा हा उद्योग 1995 मध्ये अब्जाची भाषा बोलू लागला. भारताच्या सॉफ्टवेअर क्षेत्रातील या विलक्षण प्रगतीला अनेक गोष्टी सहाय्यभूत ठरल्या.
1995 साला पासून केंद्र सरकारने सॉफ्टवेअर क्षेत्राच्या विकासासाठी अवलंबलेल अनुकूल धोरण, सॉफ्टवेअर क्षेत्रातील उद्योजकांची दूरदृष्टी आणि त्यांनी साधलेला गतिमान विकास, संगणक आणि तंत्रज्ञानाच्या शिक्षणाचा झालेला प्रसार , तसंच भारत आणि अमेरिका यांच्यातील वेळांचा अनुकुल फरक यासारख्या काही गोष्टींमुळे सॉफ्टवेअर उद्योगाला गती मिळाली. इंग्रजी भाषेवर चांगला जम असलेल्या कुशल भारतीय तंत्रज्ञांनी आपली कुशल गुणवत्ता सिद्ध करून आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वास मिळवला.
जागतिक स्तरावरील काही घडामोडींचा फायदाही भारतीय सॉफ्टवेअर उद्योगाला मिळाला.
1995 मध्ये संगणकाचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या विकसित देशांना, विशेषता अमेरिकेला ‘वायटूके’ समस्येनं ग्रासले. तोपर्यंत संगणकावर दिनांक दोन नोंदवताना वर्ष शेवटच्या 2 अंकांमध्ये म्हणजे 1991 चं 91मध्ये नोंदवण्याची पद्धत असायची. त्यामुळे भविष्यात कॉम्प्युटरला काळाचा बोध होणार नाही. त्यामुळे कॉम्प्युटर वरच्या सगळ्या डेटाचा काही उपयोग होणार नाही, ही भीती होती.
20 व्या शतकातून 21 व्या शतकात जाणं त्यावेळी कॉम्प्युटर क्षेत्रासाठी अवघड होऊन बसले होत. कारण संपूर्ण जग काम करत असणाऱ्या प्रोग्राममध्ये 31 डिसेंबर 1999 नंतर कोणतीच तारीख नव्हती. याच समस्येला ‘ वाय टू के ‘ म्हंटलं गेल.
टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टीसीएस) या भारतीय सॉफ्टवेअर कंपनीने अमेरिकेतल्या आय. बी.एम या सॉफ्टवेअर कंपनीसाठी विकसित केलेल्या एका सॉफ्टवेअर टूलव्दारे हा प्रॉब्लेम सोल्व्ह होऊ शकतो, हे स्पष्ट झालं. त्यामुळे भारतातील सॉफ्टवेअर सेवांची गुणवत्ता ठळकपणे सिद्ध होऊन अमेरिकेसोबत जगभरातून भारतात सॉफ्टवेअर सेवांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली.
टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रोची लक्षणीय कामगिरी
पुढे 2001- 02 मध्ये अमेरिकेत डॉट कॉम उद्योग अल्पजीवी ठरून सॉफ्टवेअर उद्योगात मंदीची लाट आली तेव्हा त्यातून सावरण्यासाठी खर्चात कमी करण्याची गरज अमेरिकन कंपन्यांना भासू लागली. भारतातून स्वस्तात मस्त सॉफ्टवेअर सेवा उपलब्ध होत असल्याने त्यांनी भारताला अधिक प्राधान्य दिलं.
2004 पर्यंत भारतातील सॉफ्टवेअर कंपन्यांची संख्या तीन हजारापेक्षा जास्त झाली. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आणि इतर प्रमुख भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांची जागतिक बाजारपेठेत जोरदार मुसंडी मारली.
मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या टॉपच्या कंपनी सोबत अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात आल्या. भारतात संगणक आणि माहिती – तंत्रज्ञानाच्या उच्च शिक्षणाचाही प्रसार या काळात झाला. त्यामुळे सॉफ्टवेअर उद्योगाला दरवर्षी सुमारे दिड लाख कुशल कर्मचारी उपलब्ध होऊ लागले. डिसेंबर 2000 मध्ये सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 4 लाख 10 हजार होती. ती मार्च 2004 मध्ये 5 लाख 33 हजारांवर पोहोचली. यामुळे भारत हे सॉफ्टवेअर जगातील महत्वाचं डेस्टीनेशन बनलं.
2000 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानूसार जगातील 500 प्रमुख बड्या कंपन्यांपैकी 185 कंपन्या त्यांच्या सॉफ्टवेअर विषयक गरजा भारतातील सॉफ्टवेअर कंपन्यांकडून भागवायच्या.
1995 नंतरच्या काळात भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांनी जागतिक स्तरावर ठसा उमटवला. मार्च 1999 मध्ये अमेरिकेच्या नॅसडॅक या शेयर बाजारात नोंद होणारा इन्फोसिस ही पहिली भारतीय सॉफ्टवेअर कंपनी बनली. त्यापाठोपाठ 2000 मध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज मध्ये विप्रोची नोंद झाली. मार्च 2003 मध्ये विप्रोचे प्रमुख अझीम प्रेमजी यांचा जगातील पहिल्या 10 श्रीमतांमध्ये सामावेश झाला. 2004 मध्ये या दोन्ही कंपन्यांची उलाढाल एक अब्ज डॉलरहून अधिक झाली. तर टीसीएस ही सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी आशियातली सर्वात मोठी कंपनी ठरली.
हे ही वाचा भिडू.
- टाटांनी LIC ला संकटातून बाहेर काढलं आणि त्यातून TCS देखील मोठी केली
- टिसीएस जगातील सर्वात मोठ्ठी आयटी कंपनी झाली आहे..
- भारतात औद्योगिक क्रांती करणाऱ्या जे.आर.डी टाटानांही इंजिनियरिंग करायला जमल नाही.