एकदा कार ओव्हर टेक करण्यावरून आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांच्यात बाचाबाची झाली होती
राज्य सरकारवर टीका करताना भाजपचे आमदार आमदार नितेश राणे यांनी परवा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून वातावरण तापण्याची शक्यता दिसताच नीतेश यांनी काल ट्वीट करून आपले शब्द मागे घेतले आहेत.
काय म्हणाले होते नितेश राणे
१२ आमदारांचं निलंबन केल्याच्या निषेधार्थ भाजपनं विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवर प्रति विधानसभा भरवली होती. यावेळी विरोधी पक्षांच्या अनेक आमदारांनी सरकारवर टीका केली. शिवसेना व मुख्यमंत्र्यांना सातत्यानं लक्ष्य करणाऱ्या नीतेश राणे यांनाही प्रति विधानसभेत बोलण्याची संधी मिळाली.
यावेळी नीतेश राणे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवत म्हणाले होते. आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का? त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, त्यांच्या या वक्तव्याचे बुधवारी तीव्र पडसाद उमटले.
मुंबईत शिवसैनिकांनी रस्त्यावर येत नीतेश राणे यांचा पुतळा जाळला व माफीची मागणी केली होती.
यानंतर नितेश राणे यांनी ट्वीट करून दिलगिरी व्यक्त केली
नीतेश राणे यांनी ट्वीट करत आपले शब्द मागे घेतले आहेत. ‘विधान भवनाबाहेर काल भाषण करताना आदित्य ठाकरे यांच्याबद्दल मी जे बोललो, त्याबाबत अनेकांचा गैरसमज झाला आहे. माझ्या वक्तव्यामुळं कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास माझे शब्द मागे घेतो.
वैयक्तिक टीका करण्याचा माझा हेतू नव्हता, असं नीतेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
In my yesterday’s speech outside the Vidhan Sabha in which I had mentioned about Aditya T which was wrongly understood by many.. if at all it has hurt any ones sentiments I take back my words.. didn’t mean to get too personal!
— nitesh rane (@NiteshNRane) July 7, 2021
ठाकरे आणि राणे परिवारातील वाद नवा नाही
ठाकरे आणि राणे परिवारातील वाद काही नवा नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सगळ्यात जवळचे नारायण राणे असणारे पुढे जाऊन ठाकरे परिवारचे सर्वात मोठे विरोधक बनल्याचा इतिहास आहे.
शिवसेनेचे फायर ब्रांड अशी ओळख असणारे नारायण राणे अंतर्गत वादामुळे २००५ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला होता. नारायण राणे यांनी त्यानंतर शिवसेनाला ज्या-ज्या ठिकाणी कोंडीत पकडता येईल ती एकही संधी सोडली नाही. यात नारायण राणे यांच्या बरोबर त्यांची दोन्ही मुले निलेश आणि नितेश राणे हे सुद्धा मागे नव्हते.
मध्यंतरी २०१७ मध्ये नारायण राणे हे कॉंग्रेस मधून भाजप मध्ये आले.
२०१९ राज्यात सत्तांतर झाले आणि शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार मध्ये सामील झाली. यानंतर विरोधाची धार अधिकच वाढली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकाही संधी नारायण राणे आणि निलेश राणे यांनी सोडली नाही.
आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांच्या काय वाद झाला होता
नितेश राणे आणि आदित्य ठाकरे हे दोन्ही तरुण नेते १७ सप्टेंबर २०११ रोजी आप-आपल्या ताफ्यासह घरी निघाली होते.
भायखळ्याहून दादरकडे जाणाऱ्या नितेश राणे यांच्या गाड्यांच्या ताफ्याने आदित्य ठाकरे यांच्या गाडीला ओव्हर टेक केले आणि कोण पुढे राहणार यावरून वाद झाला होता. हा वाद एवढा चिघळला की, दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरुध्द वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
त्यावेळी आदित्य ठाकरे यांची ओळख युवासेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा मुलगा अशी होती. तर नितेश राणे हे स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष होते.
नितेश राणे यांच्या गाड्यांच्या ताफ्याने आदित्य ठाकरेंच्या गाडीला वरळीच्या फोर सिजन हॉटेलसमोर ओव्हरटेक केले त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झडली असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर दोघांच्याही अंगरक्षकांनी या ‘राड्याची’ माहिती वरळी पोलिस ठाण्यात दिली होती.
यावेळी आदित्य ठाकरे आणि नितेश राणे या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे सांगण्यात आले. या दोन मोठ्या नेत्यांच्या मुलांचा वाद राज्यभर गाजला होता. त्यावेळी नारायण राणे हे कॉंग्रेस मध्ये होते आणि राज्यातील आघाडी सरकार मध्ये अवजड उद्योग मंत्री होते.
मागचे ४ दिवस नितेश राणे हे आदित्य ठाकरे यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप आदित्य ठाकरे यांच्या अंगरक्षकाने केला होता. तशी माहिती सुद्धा त्यांनी वरळी पोलीस ठाण्यात दिली होती.
राज्यातील दोन बड्या नेत्यांच्या मुलांमधील या वादाची अधिक माहिती पोलिसांकडून दिली नव्हती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे होती. मात्र त्यात नक्की दोष कोणाचा हे पोलिसांनी स्पष्ट केले नव्हते. यानंतर आदित्य ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी वरळी पोलीस ठाण्यासमोर नितेश राणे यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती.
त्यानंतर नितेश राणे आदित्य ठाकरे यांच्या सोबत शाब्दिक बाचाबाची झाली नसल्याचे सांगितले होते. गेली दहा वर्ष हा वाद जरी समोरासमोर होत नसला तरी नितेश राणे हे आदित्य ठाकरे यांच्यावर सोशल मिडीयावरून सतत टीका करत असल्याचे पाहायला मिळते.
हे ही वाच भिडू
- त्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे सुरुवात झाली.
- या गोष्टींमुळे नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद देऊन ताकद दिली आहे
- उद्धव ठाकरेंवर नाराज होऊन पक्ष सोडलेले पहिले शिवसैनिक म्हणजे भास्कर जाधव