१९९३ ते २०२० : दिल्लीचा निकाल अशा प्रकारे बदलत गेला.
दिल्ली विधानसभेच्या पहिल्या निवडणूका झाल्या होत्या त्या १९९३ साली. या पहिल्याचं इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीने सत्ता स्थापन केली होती. आज विधानसभेचा निकाल लागला. दिल्ली विधानसभेची ही सातवी निवडणुक होती. या सात निवडणूकांमध्ये वारं नेमकं कुणाच्या बाजूने झुकतं गेलं ते पाहूया.
१) पहिल्या निवडणुका १९९३.
दिल्लीच्या पहिल्याच निवडणुकीत ७० जागांपैकी भाजपने ४९ जागा जिंकल्या होत्या. कॉंग्रेसच्या वाट्याला तेव्हा फक्त १४ जागा आल्या होत्या. तर ७ जागा इतर पक्षांना मिळाल्या होत्या. भाजपचे दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मदनलाल खुराना यांनी शपथ घेतली. पुढच्या पाच वर्षात साहिब सिंह वर्मा आणि सुषमा स्वराज देखील मुख्यमंत्री राहिल्या.
टक्केवारी : टोटल मतदान ६१.७५ टक्के झालं होतं पैकी भाजपच्या मतांची टक्केवारी ४७.८२ टक्के होती तर कॉंग्रेसच्या मतांची टक्केवारी ३४.४८ इतकी होती.
२) दूसऱ्या निवडणूका १९९८.
दूसऱ्या निवडणूका झाल्या त्या १९९८ साली. यावेळी मात्र स्पष्ट बहुमत कॉंग्रेसच्या बाजूने झुकलं. ७० पैकी ५२ जागा कॉंग्रेसच्या वाट्याला आल्या. भाजप फक्त १५ जागांवर विजयी झाले. कॉंग्रेसमार्फत शिला दिक्षित यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. शिला दिक्षित विरूद्ध भाजपच्या तत्कालिन मुख्यमंत्री सुषमा स्वराज असा सामना रंगला होता.
टक्केवारी : एकूण ४८.९ टक्के मतदान या निवडणूकीत झाले. कॉंग्रेसला ४७.७६ टक्के मते मिळाली तर भाजपला ३४.०२ टक्के मते मिळाली होती.
३) तिसऱ्या निवडणूका २००३.
सलग दूसऱ्या वर्षी सत्तेत येण्याचा करिष्मा कॉंग्रेसने करुन दाखवला. ७० जागांपैकी कॉंग्रेसला ४७ जागांवर विजयी मिळाला. मात्र मागील वर्षीपेक्षा यावेळी कॉंग्रेसच्या पाच जागा कमी झाल्या. तर भाजपला एकूण २० जागांवर समाधान मानावे लागले. शिला दिक्षित यांच्या विरोधात भाजपमार्फत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून विजय कुमार मल्होत्रा यांना पुढे करण्यात आले होते. शिला दिक्षित यांनी सलग दूसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
टक्केवारी : एकूण ५३.४२ टक्के मतदान झाले यामध्ये कॉंग्रेसला ४८.१३ टक्के मतदान झाले तर भाजपला ३५.२२ टक्के मतदान झाले.
४) चौथ्या निवडणूका २००८.
ना हरा ना पिला दिल्ली मैं बस शिला ही शिला. दिल्लीवरती आपली निर्विवाद सत्ता असल्याचं शिला दिक्षित यांनी सिद्ध करुन दाखवलं. चौथ्या निवडणूकांमध्ये कॉंग्रेसने ७० पैकी ४३ जागांवर विजय मिळवला. भाजपला २३ जागांवर समाधान मानावे लागले. यावेळी देखील भाजपमार्फत विजय कुमार मल्होत्रा यांना ंमुख्यंमंत्रीपदाचे दावेदार म्हणून समोर करण्यात आले होते. मात्र शिला दिक्षित यांच्या विरोधात त्यांचा निभाव लागला नाही. शिला दिक्षित यांनी सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
टक्केवारी : यावर्षी एकूण ५७.६० टक्के मतदान झाले त्यापैकी ४०.३१ टक्के मतदान कॉंग्रेसला झाले तर भाजपला ३६.३४ टक्के मतदान झाले.
५) पाचव्या निवडणूका २०१३
या वर्षी दिल्ली येथील अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा करिष्मा होता. इतिहासात पहिल्यांदा दोन पक्षात चालणाऱ्या पारंपारिक लढतीत तिसऱ्या पक्षाने मुसंडी मारली होती. भाजपला सर्वांधिक म्हणजे ३४ जागा मिळाल्या होत्या व त्या खालोखाल असणाऱ्या आम आदमी पक्षाच्या २८ जागांची चर्चा अधिक होती.
सलग तीन वेळा, सलग पंधरा वर्ष व सलग १९९८ ते २०१३ वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या शिला दिक्षित यांचा मानहानिकारक पराभव झाला होता. त्यांच्या पक्षाला फक्त ८ जागा मिळाल्या होत्या. तरिही या त्रिशंकू अवस्थेत कॉंग्रेसने डाव खेळून केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला व त्यामुळे केजरीवाल पाचव्या विधानसभेचे मुख्यमंत्री होवू शकते.
मतांची टक्केवारी : या निवडणूकीत सर्वाधिक म्हणजे ६६.०२ टक्के मतदान झाले होते. यामध्ये भाजपला ३३ टक्के, आपला २९.५ टक्के तर कॉंग्रेसला २४.६ टक्के मतदान झाले होते.
६) सहाव्या निवडणूका २०१५.
कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर उभा राहिलेला आम आदमी पक्ष सत्तेत जास्तकाळ टिकू शकला नाही. काम करुन देत नसल्याच्या मुद्यावरून केजरीवालांनी दोनच वर्षात राजीनामा दिली. दिल्ली विधानसभेच्या सहाव्या निवडणूकींची घोषणा झाली. निकाल हाती आला तेव्हा केजरीवालांनी इतिहासिक कामगिरी केली होती. त्यांनी ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळवला. भाजपला फक्त ३ जागा मिळाल्या तर कॉंग्रेसने एतिहासिक कामगिरी करुन शून्य जागांवर विजय मिळवला.
केजरीवाल दूसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले.
मतांची टक्केवारी : मागील वर्षाचा विक्रम मोडीत काढत यावर्षी दिल्लीमध्ये ६७. ४७ टक्के मतदान झाले. यामध्ये आप पक्षाला ५४.०३ टक्के, भाजपला ३२.०३ टक्के तर कॉंग्रेसला फक्त ९.७ टक्के मतदान मिळाले.
७) सातव्या निवडणूका २०२०.
सातव्या निवडणूकांचे निकाल आज जाहिर होत आहेत. दिल्लीमध्ये NRC, CAA विरोधात सुरू असणारे वातावरण, शाहिनबाग आणि आप सरकारने केलेले काम अशा अनेक गोष्टी दिल्लीच्या प्रचारात अजेंड्यावर होत्या. मात्र दिल्लीकरांनी दिल्लीमध्ये झालेल्या कामांना प्राधान्य दिले.
बस प्रवास, प्राथमिक शाळेचा विकास, प्रशस्त रुग्णालय अशा प्रत्येक प्राथमिक क्षेत्रातल्या महत्वपुर्ण कामांमुळे आप पक्षाने पुन्हा मुसंडी मारून आत्तापर्यन्त ६३ जागांवर आघाडी मिळवली आहे. भाजपने ०७ तर कॉंग्रेसने शून्य जागा मिळवून आपला गतवर्षीचा विक्रम कायम ठेवला.
हे ही वाच भिडू.
- बिहार के लाला मनोज तिवारी दिल्लीचा मुख्यमंत्री बनेल काय?
- दिल्लीचा तीन वेळा मुख्यमंत्री बनण्याची किमया फक्त शीला दिक्षीत यांनाच जमली होती.
- रामलीला मैदानावर अनंत झाल्या आहेत राजकीय लीला !!