वडील काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींशी लढलेले, मुलगा त्याच कारणावरून भाजपमध्ये गेला.
“भाजपच्या धोरणामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे प्रभावित झालेल्या जितिन प्रसाद यांनी भाजप कुटुंबात प्रवेश केला आहे,”
असं एक स्टेटमेंट समोर येतं, तेही भाजपचे खासदार अनिल बालूनी याचं आणि लगेचच तडकाफडकी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत जितीन प्रसाद भाजपात जातात हे सगळाच घटनाक्रम म्हणावा तितका धक्कादायक असला तरी हे कधीना कधी घडणारच होते, कारण २०१९ पासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा चालू होत्या.
कधीकाळी ज्या नेत्याने राजीव गांधी आणि पी.व्ही. नरसिंह राव यांच्यासारख्या बड्या नेत्यांच्या राजकीय सल्लागार पदी काम केलेले कॉंग्रेसचे निष्ठावान नेते जितेंद्र प्रसाद यांचे सुपुत्र जीतिन प्रसाद हे आज भाजपा मध्ये प्रवेश करीत आहेत हा कॉंग्रेससाठी एक मोठा लॉस म्हणावा लागेल.
राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या काँग्रेसच्या तरुण नेत्यांपैकी जितिन प्रसाद हे एक होते.
तेच जितेंद्र प्रसाद ज्यांनी सोनिया गांधींच्या विरोधात काँग्रेस अध्यक्षपदासाठीची निवडणूक लढवली होती मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत जीतिन प्रसाद यांनीही कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. २००१ मध्ये त्यांचे वडील गेले आणि जितीन यांनी भारतीय युवक कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. २००४ मध्ये उत्तर प्रदेश मधील शाहजहानपूर या लोकसभा मतदार संघात उभे राहिले आणि जिंकूनही आले, आणि संसदेतही पोहचले.
सर्वप्रथम युवक कॉंग्रेसचे सचिव, त्यानंतर डायरेक्ट लोकसभा असा दमदार राजकीय प्रवास राहिलेले जितिन कुमार हे मनमोहन सिंग सरकारमध्ये केंद्रीय मंत्री बनलेले सर्वात तरुण चेहरा होता. त्यानंतरही २००९ मध्ये जितीन यांनी धौरारा हि लोकसभेची जागा जिंकली.
त्यांना सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय देण्यात आले होते, २०११-२०१२ मध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय देण्यात आले. आणि २०१२-२०१४ मध्ये त्यांना संसाधन विकास हे खातं दिलं गेलं.
त्यानंतर २०१४ मध्ये जेव्हा काँग्रेसचा उतार सुरू झाला, तेव्हा जितिन यांनाही निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला होता.
जितीन हे २०१९ पासूनच कॉंग्रेस सोडण्याच्या तयारीत होते का ?
इतकी वर्ष सत्ता भोगली, मोठी मोठी मंत्रालये ज्या कॉंग्रेसने या नेत्यांना दिली आता हीच नेते कॉंग्रेसची या वाईट काळात साथ सोडत आहेत. हा कॉंग्रेसला लागलेला शाप म्हणावा कि पक्षाच्या नेतृत्वावरचा अविश्वास ?
आणि नेतृत्वाबद्दल बोलायचं गेलं तर, गेल्या वर्षी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिलेल्या २३ नेत्यांमध्ये जितिन प्रसाद हे देखील होते.
त्यांनीही काँग्रेसच्या सक्रिय नेतृत्व आणि संघटनात्मक निवडणुकांची मागणी केली होती.
या पत्रामुळे कॉंग्रेसच्या ‘घरातली रुसवेफुगवे’ बाहेर काढलेत म्हणून जितीन यांच्यावर उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्याच्या काँग्रेस समितीने कारवाई करण्याची मागणी करणारा ठराव संमत केला होता. त्यामुळे इतर राज्यातल्या कॉंग्रेस समितीपेक्षा इथला वाद मोठा होता.
या पत्रानंतरच जितीन यांचे कॉंग्रेसमधले महत्व कमी होत चालले होते.
उत्तर प्रदेशमधील निवडणुकीची कमान जेंव्हा प्रियांका गांधी यांच्याकडे गेली, तेंव्हा त्यांनी प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून जितीन प्रसाद यांना नाही तर अजय कुमार लल्लू यांना निवडलं.
तसेच उत्तर प्रदेश कॉंग्रेस च्या कोणत्याच समितीमध्ये जितीन प्रसाद यांना ठेवलं नाही. अनेक राजकीय हालचाली व्हायच्या त्यात जितीन यांना जवळजवळ दुर्लक्षित केले जात होते. प्रियांका गांधींच्या या वागणुकीमुळे जितीन यांनी उघड तर कधी छुपी नाराजी व्यक्त केली होतीच.
तेवढ्यात ते २०१९ मध्ये भाजपात जाणार असल्याच्या चर्चा जोरात होत्या. पण या बाबत त्यांनी कधीच प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. मात्र त्यांनी २०२० मध्ये ब्राह्मण चेतना परिषद स्थापन करून ब्राह्मनांचे संघटन करायला सुरुवात केली. त्यांच्या या हालचाली ते भाजपात जाणार याचे संकेत नक्की करत होत्या असं म्हणायला हरकत नसावी.
जितीन प्रसाद यांचा भाजपला कितपत फायदा होणार ?
राहुल गांधी यांचे निकटवर्तीय नेत्यांमधले जवळपास सर्वच तरुण नेते हळू हळू भाजपच्या वाटेवर आहेत. त्यातले एक जितीन प्रसाद. त्यांचे वडील एक कॉंग्रेसचे निष्ठावान नेते मानले जायचे, त्यांनी सांभाळलेली महत्वाची पदे इत्यादींमुळे जितीन इतर नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवणार नाहीत असं वाटायचं.
शिवाय कॉंग्रेसमधील युवक कॉंग्रेसपासूनचे ते मंत्र्यापर्यंतची पदे जितीन यांनी सांभाळली.
उत्तर प्रदेशमधील येणाऱ्या निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी भाजपात जाणे हे उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक मोठे वळण म्हणावे लागेल. आता त्याचा भाजपला फायदा होणारच.
कारण युपी मधील एक ब्राम्हण समजाचा चेहरा म्हणून जितीन समोर येतीलच, असंही त्यांनी २०२० मध्ये ब्राह्मण चेतना परिषदेद्वारे जमवलेले ब्राम्हण संगठन हा त्यांचा मुख्य मतदाता असू शकतो.
युपीच्या एकूण लोकसंख्येपैकी १२% हे ब्राम्हण आहेत. त्यामुळे सगळेच पक्ष या संख्येला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतायेत. त्यातल्या त्यात जितिन प्रसाद हे ब्राम्हणांचे मुद्दे उठवण्यात जितीन आघाडीवर असल्याचे त्यांच्या उपक्रमावरून दिसत आहे. त्यामुळे या संघटनाचा फायदा भाजप ला नक्कीच होईल.
हि नेमकी ब्राह्मण चेतना परिषद काय आहे ?
युपी मध्ये ब्राम्हणांवर होणारया कथित हिंसाचाराला रोखण्यासाठी जितीन यांनी युपी च्या प्रत्येक जिल्ह्यात ‘टी-२०’ नावाची टीम बनवण्याची घोषणा केली होती.
ह्या टीम चे संघटन म्हणजे ‘ब्राह्मण चेतना परिषद’ होय. हि टीम थोडक्यात पिडीत ब्राम्हण कुटुंबाना कोर्ट कचेरीच्या केसेस लढण्यासाठी कायदेशीर जी काही मदत लागेल ती हि टीम करेल.
थोडक्यात याला ब्राम्हणांनी ब्राम्हणांसाठी बनवलेली संघटना म्हणता येईल.
या व्यतिरिक्त जितीन यांनी या संघटनेला काही रिटार्यड ब्यूरोक्रेट्स जोडून घेतले आणि एडवाइजरी कमेटी स्थापन केली गेली जी पिडीताना मार्गदर्शन मंडळ म्हणून काम करेल. सध्या या परिषदेचे अध्यक्ष म्हणून रिटार्यड आयएएस ऑफिसर व्ही.पी मिश्रा आहेत.
उत्तरप्रदेशमध्ये प्रियांका गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नव्याने उभारणी घेण्याच्या प्रयत्नात होती मात्र आज जितीनप्रसाद यांच्या भाजप प्रवेशामुळे त्याला मोठा झटका बसलेला आहे.
हे ही वाच भिडू.
- बंगालचा धुरळा बसल्यावर भाजप उत्तरप्रदेश निवडणुकांच्या तयारीला लागला आहे
- या बाहुबलीची दहशत ठेचून काढली आणि युपीमध्ये आदित्यनाथांचा योगीराज सुरु झाला..
- कित्येक वर्षांपासून युपी, बिहार गरीबच का राहिले आहेत ?
- केसरींना धक्के मारून हाकललं आणि सोनिया गांधीनी काँग्रेस आपल्या हाती घेतली.