नुसरत फतेह अली खानला बघून गीतकार आनंद बक्षी रडू लागले.
कव्वालीचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते ते म्हणजे नुसरत फतेह अली खान. त्यांच्या संगीताने आपण सगळेच भारावून जातो. त्यांच्या आवाजाची पट्टी , गाण्यातल्या हरकती अंगावर शहारे आणतात. संगीत क्षेत्रात त्यांचं योगदान खूप महत्वाचं आहे. जितकं संगीतकार लोकांचं महत्व आहे तितकच गीतकार लोकही महत्वाचे आहे. त्यापैकी एक महत्वाचे गीतकार म्हणजे आनंद बक्षी.या दोन दिग्गज लोकांचा आजचा किस्सा…
१९९९ साली आलेल्या ‘ कच्चे धागे ‘ या चित्रपटासाठी नुसरत फतेह अली खान साहेबांनी संगीताची जबाबदारी स्वीकारली होती. आनंद बक्षी गीतकार म्हणून काम बघत होते. हे दोघेजण पहिल्यांदाच एकत्र काम करत होते. हा चित्रपट मिलन लूथराचा दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट होता.
नुसरत फतेह अली खान यांचा हा शेवटचा बॉलीवूड अल्बम होता.
कच्चे धागे या चित्रपटात अजय देवगण, मनीषा कोईराला, सैफ आली खान हे मुख्य भूमिकेत होते.
नुसरत फतेह अली खान हे या चित्रपटाच्या निम्मिताने भारतात आले आणि मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये एक महिनाभर ते राहिले होते. त्यावेळी त्यांचं वजन जास्त वाढलं होतं. कच्चे धागेची गाणी बनवायचं चाललं होतं. पण गंमत अशी की सिनेमाचा संगीतकार असलेल्या नुसरत साहेबांना तब्येतीच्या कारणामुळे ते प्रवास करणे टाळावे लागत होते.
अखेर त्यांनी आनंद बक्षीना निरोप पाठवला की मला भेटायला हॉटेलामध्ये यावे.
आनंद बक्षिना जेव्हा हा निरोप मिळाला तेव्हा त्यांना वाटलं की हा नुसरतचा इगो आहे स्वत स्टुडिओ मध्ये न येत मला तिकडे बोलावतो आहे. त्यांच्या मनात नुसरत साहेबांविषयी अढी पडली. जेव्हा संगीताची प्रक्रिया सुरु झाली तेव्हा आनंद बक्षीनी नुसरत साहेबांना एक गाणं लिहून पाठवलं आणि नुसरत साहेबांनी ते गाणं रिजेक्ट केलं.
पुढचे दहा पंधरा दिवस हेच चालू राहिलं.
आनंद बक्षी गाणं लिहून पाठवायचे आणि नुसरत अली ते गाणं रिजेक्ट करायचे. जेव्हा नुसरत अली खान एखादी धुन बनवून आनंद बक्षिना पाठवायचे तेव्हा बक्षी ती धुन रिजेक्ट करायचे.
एक दिवस वैतागून नुसरत फतेह अली खान म्हणाले की,
” उचला मला आणि घेऊन चला आनंद बक्शीच्या घरी .”
त्यावेळी आनंद बक्षी हे एका बिल्डींगच्या पहिल्या मजल्यावर राहायला होते. जेव्हा त्यांनी बघितलं की जिन्यातून नुसरत फतेह अली खान साहेबांना सात आठ लोकं उचलून घेऊन येत आहे तेव्हा ते लहान मुलासारखे रडू लागले. हात जोडले आणि म्हणाले
मी पण काय गैरसमज डोक्यात पाळून ठेवला. चला आता मी तुमच्यासोबतच राहीन. आणि तेव्हा कुठे हा अल्बम पूर्ण झाला.
नंतर आनंद बक्षींनी सांगितलं की मला खूप आनंद झालाय की मी नुसरत साहेबांसोबत काम केलय. त्यांच्या सुंदर शब्दांना नुसरत साहेबांनी उत्तम रीतीने न्याय दिला.
या चित्रपटात एका नवीन गायकांला संधी नुसरत साहेबांनी दिली होती त्यात हंसराज हंस हा होता. जेव्हा हंसराजला नुसरत साहेबांनी गीत ऐकवलं तेव्हा हंसराज म्हणाला हे इतक्या उंच पट्टीतलं गाणं आहे मला नाही जमणार तेव्हा नुसरत म्हणाले
हे बघ इथ भारतात इतके सारे गायक आहे त्यांपैकी मी तुला बोलावलंय , तू निश्चिंत होऊन गा , मला सगळ्यांसमोर तोंडावर पाडू नको.
तेव्हा हंसराजने गाणं गायलं.
या चित्रपटात सुखविंदर सिंग, लता मंगेशकर, अलका याद्निक या मंडळींनीही नुसरत फतेह अली खान यांच्या संगीतात गायनाची संधी सोडली नाही. या चित्रपटात एक कव्वाली व्हर्जन होतं जे नुसरत साहेबांच्या एका कव्वालीचा जो तुकडा होता तो सुखविंदर सिंगने गायला होता. पुढे ते गाणं जबरदस्त हिट झालं ते गाणं होतं ,
तेरे बिन नै लगदा दिल मेरा ढोलना….
अशा प्रकारे हा संगीतमय चित्रपट त्यावेळी चांगला चालला आणि नुसरत फतेह अली खान आणि आनंद बक्षींचा किस्साही तितकाच गाजला.
हे ही वाच भिडू :
- बॉलीवूडने नुसरत फतेह अली खां साहेबांकडून चोरलेली गाणी !
- बॉलीवूडला कात टाकायला भाग पाडणारं ‘मंडी हाऊस’ आहे तरी काय ?
- पार्टी असो वा लग्न, दलेर मेहंदीच्या गाण्यावर नाचल्याशिवाय मजा येत नाही
- १९४२ लव्ह स्टोरीचं सक्सेस बघणं आर.डी.बर्मन यांच्या नशिबात नव्हतं.